मोसंबीला भरपूर फुले लागतात, फळधारणाही भरपूर होते, परंतु एकूण फुलांच्या ०.५ ते १ टक्का इतकीच फळे काढणीपर्यंत हाती लागतात. म्हणून फळगळ ही मोसंबी पिकातील गंभीर समस्या आहे. फळधारणेपासून ते फळ काढणीपर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे फळगळ होते. नैसर्गिक कारणाव्यतिरिक्त, देठांच्या इजेमुळे, रोगांमुळे व फळमाशी आणि फळरस शोषण करणाऱ्या पतंगामुळे अर्धी कच्ची फळे पिवळी पडतात, सडतात व गळतात. फळगळ काही विशिष्ट काळात अतिशय तीव्र व जास्त प्रमाणात असते. मोसंबी मध्ये सुध्दा सुमारे १ ते २ लाखावरील फुलापैकी फक्त ०.२ ते २ टक्के एवढीच फळामध्ये रुपांतरीत होतात. या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या फुलगळीची इतर बरीचशी कारणे असली तरी यासाठी मुख्यतः वातावरणातील आर्द्रता, कीड व रोग इत्यादी कारणीभूत आहेत. फुलगळ, फळगळ खालील प्रमाणे होते.
फळझाडावर फुलांची निर्मिती झाल्यानंतर ती उमलत असताना त्यांची गळ होत असते. दुसरी फुलगळ १५ ते २५ दिवसांनंतर होते. या वेळी ज्या फुलांचे फळधारणेत रुंपातर झाले नाही अशी फळे गळून पडतात. फळधारणा झालेली अती लहान फळेदेखील गळून पडतात. बोरांच्या आकारांची व त्यापेक्षा मोठी झाल्यानंतर पक्व होईपर्यंत वाढ झालेली फळे देखील गळून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. वाढ झालेल्या फळात इथिलिन तयार होते व त्यामुळे फळगळ होत असते. ढगाळ वातावरणात बुरशीचा प्रादुर्भाव होऊन देठाजवळ काळे डाग पडतात आणि फळे मोठ्या प्रमाणात गळून पडतात यालाच कोलेटोट्रीकम बुरशी असे म्हणतात. याच वातावरणात आर्मडस्केल कीडीचा प्रादुर्भाव होऊनही फळे मोठ्या प्रमाणात गळतात, त्यासाठी एकत्रितरीत्या बुरशीनाशक आणि कीटकनाशक फवारावे. यामध्ये कार्बेन्डाझीम २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात आणि डायमेथोएट १.५ मिली प्रति लिटर पाण्यात किंवा मॅन्कोझेब अधिक मेटालेक्झील हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात आणि अॅसिफेट १ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे. प्रकाश सापळ्यांचा उपयोग करावा. रात्री बागेत १०० वॅटचे बल्ब अधून मधून लावावेत. याखाली केरोसिन किंवा कीटकनाशकयुक्त पाणी असलेले पसरट भांडे ठेवावे. विद्यूत प्रवाह नसल्यास गॅसबत्तीचा वापर करता येईल. पतंग प्रकाश झोताकडे आकर्षित होऊन धडक देतात आणि भांड्यातील पाण्यात पतंगाला आकर्षित करून मारण्यासाठी विषारी आमिषांचासुध्दा वापर करता येईल. त्यासाठी १० लिटर पाण्यात ५०० ग्रॅम गूळ आणि २० मि.लि. क्लोरपायरीफॉस मिसळून आमिषाचे द्रावण तयार करावे. साधारणत: २५० मि.लि. द्रावण मोठे तोंड असलेल्या डब्यात टाकून ते झाडावर टांगावेत. यासाठी रिकाम्या झालेल्या कीटकनाशकांच्या डब्यांचा वापर करता येईल. या पतंगाच्या अळ्या गुळवेल, वासनवेल किंवा तत्सम तणांवर उपजीविका करीत असल्यामुळे परिसरातील या तणांचा नायनाट करावा. खाली पडलेली फळे नियमित वेचून खड्ड्यात पुरून टाकावीत. रात्री ७.०० वाजताच्या दरम्यान ओलसर कचरा जाळून बागेत धूर करावा. परंतु यामुळे झाडांना इजा होणार नाही यांची दक्षता घ्यावी. मॅन्कोझेब अधिक मेटालेक्झील हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून पंधरा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. या उपाययोजनांचा एकात्मीक पद्धतीने अवलंब केल्यास रस शोषण करणाऱ्या पतंगामुळे होणारी फळांची गळ काही प्रमाणात कमी करता येईल. झाडे रोगग्रस्त, कीडग्रस्त, दुखापत झालेली अथवा जास्त वयाचे असणे. झाडामध्ये ऑक्झीन या संजीवकाचे असंतुलन असणे. कर्ब:नत्र गुणोत्तरामध्ये असंतुलन. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता व झाडाची उपासमार. पाण्याच्या ताण किंवा अतिरिक्त वापर. ओलिताचे व्यवस्थापन बरोबर नसणे, कमी किंवा आधिक पाण्यामुळे फळझाडांस ताण बसतो त्यामुळे फळ गळण्यास सुरुवात होते. संतुलित पाण्याचा वापर असल्यास फळझाडांवरील फळांना ताण बसत नाही. आंबिया बहाराची फळगळ रस शोषण करणाऱ्या पतंगामुळेसुध्दा होते. या किडीचे प्रौढ पतंग सांयकाळी ७ ते ९ दरम्यानच्या काळात फळांतील रस शोषण करतात. त्या ठिकाणी सुईच्या जाडीचे छिद्र तयार होते. त्यामुळे रोगजंतूना प्रवेश करण्यास मार्ग तयार होतो. रसात साखरेचे प्रमाण असल्यामुळे जंतुची वाढ होते. छिद्राभोवती फळे सडायला लागतात आणि फळे मोठ्या प्रमाणावर गळू लागतात. फळकुज (फायटोप्थोरा) मुळेही मोठ्या प्रमाणात फळांची गळ होते. डॉ. संजय पाटील, ९८२२०७१८५४ (प्रभारी आधिकारी, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना)