लिची हे उष्णकटिबंधीय प्रदेशात येणारे सदाहरित फळ असून, जगातील सर्वोत्कृष्ट फळांपैकी एक आहे. या फळाचा उगम चीनमधील आहे, असा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आढळतो. प्रामुख्याने या फळाचे उत्पादन भारत, बांगलादेश, दक्षिण तैवान, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका आणि उत्तर व्हिएतनाम या देशांत घेतले जाते. भारतामध्ये आसाम, बिहार, ओडिशा, पंजाब, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच इतर राज्यात काही प्रमाणात लिची या फळ पिकाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी आसाममधील तेजपूर लिची आणि बिहारमधील शाही लिचीला भारत सरकारच्या जीआय रजिस्ट्रीने जीआय प्रमाणपत्र दिले आहे. आजच्या भागामध्ये जीआय मानांकन मिळालेल्या तेजपूर लिची या नावाने प्रचलित असलेल्या लिची फळाविषयी माहिती करून घेऊयात.
पूरक हवामान परिस्थिती तेजपूर हे शहर आसामची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. तेजपूर हे आसाममधील पाचवे सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर ब्रह्मपुत्र नदीच्या उत्तरेला वसलेले आहे. हे शहर फक्त ऐतिहासिक नसून या शहराला निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केलेली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. येथे लिची या फळाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. येथे उत्पादित होणारी लिची वैशिष्टपूर्ण आहे.
उत्तर-पूर्व विभागीय कृषी विपणन निगम लिमिटेड (NERAMAC) या संस्थेने या लिचीचे वेगळेपण ओळखून जीआय मानांकन मिळण्यासाठी २९ ऑगस्ट २०१३ मध्ये जीआय रजिस्ट्रीकडे अर्ज सादर केला होता. साधारणपणे दीड वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर २७ मार्च २०१५ मध्ये त्यांना जीआय मानांकन मिळाले आहे. जीआय मानांकन मिळाल्यामुळे या लिचीला मागणी वाढली आहे. तसेच नवीन बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. उत्पादनात वाढ झाली आहे. या लिचीला अमेरिका तसेच स्वित्झर्लंडमध्ये जीआय मानांकन मिळाल्यामुळे चांगली मागणी आहे. लिचीचे पीक तेजपूर शहर आणि पोरवा या दोघांमध्ये असणाऱ्या "लिचू पुखुरी" या भागात घेतले जाते. लिचू पुखुरी हे तेजपूरपासून ३ किमी अंतरावर आहे. येथे सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते. जीआय नोंदणीनंतर या लिचीचे लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पोरवामधील जवळजवळ ५५ हेक्टर क्षेत्रामध्ये या लिचीच्या बागा आहेत. उत्तर-पूर्व विभागीय कृषी विपणन निगम लिमिटेड (NERAMAC) यांच्या माहितीनुसार १९५४ मध्ये पोरवा या गावात लिचीचे उत्पादन घेण्यास सुरवात झाली होती. या ठिकाणी जीआय नोंदणीनंतर लिचीची गुणवत्ता टिकवण्यासाठी किंवा चांगली रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे, त्याचबरोबर येथील शेतकरी शेतीबरोबरच रोपवाटिका व्यवसाय करत आहेत. तेजपूर लिचीच्या झाडांना साधारणपणे फेब्रुवारीमध्ये फुले येण्यास सुरवात होते. मे महिन्यात फळे तयार होतात. जूनमध्ये या फळांची काढणी सुरू होते. फळे साधारणपणे तीन दिवस टिकतात. साधारणत: वार्षिक उत्पन्न सरासरी ७००० ते ८००० फळे जुन्या झाडांना, तर ३००० ते ४००० फळे नवीन झाडांकडून मिळतात. वरिष्ठ कृषी विकास अधिकारी, तेजपूर, यांच्या अहवालानुसार तेजपूर लिचीचे सरासरी उत्पन्न १६०० किलो प्रतिहेक्टर एवढे आहे. तेजपूर लिची खाण्याचे फायदे
काही सरकारी नोंदीनुसार तेजपूर लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण मुबलक असल्याने लिची खाण्याने शरीरातील पाणी संतुलित ठेवण्यास मदत मिळते. पचनक्रिया सुधारते, वजन कमी करण्यासाठी मदत करते आणि जीवनसत्व क असल्यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घशाचे आजार पसरण्यापासून प्रतिबंधित करते. लिचीचा वापर ताजे असताना जास्त केला जातो. या लिचीला विशिष्ट आकार, आकर्षक चमकदार लाल रंग, स्वादिष्ट चव आणि नैसर्गिकरीत्या पौष्टिक आहे. जीवनसत्व ‘क’ चे प्रमाण जास्त असल्यामुळे जीवनसत्व क चा मुख्य स्राेत मानला जातो आणि पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम हे पौष्टिक घटकसुद्धा मुबलक प्रमाणात आहेत. जीवनसत्व ब काही प्रमाणात आढळते. या लिचीच्या गराचा रंग किंचित करडा पांढरा आहे. एका फळाचे वजन २५ ते ३० ग्रॅम असून, भारतात येणाऱ्या सर्व लिचीच्या वजनापेक्षा जास्त आहे. साखरेचे प्रमाणही इतर लिची जातींपेक्षा जास्त आहे. या फळांमध्ये उत्तर-पूर्व विभागीय कृषी विपणन निगम लिमिटेड यांच्या माहितीनुसार फायबरचे प्रमाण ६ ते ६.५ टक्के एवढे आहे. साखर १५.५ ते १६.२ टक्के, कर्बोदके १८.२ ते १८.५ टक्के, प्रथिनांचे प्रमाण ०.७१ ते ०.७३ टक्के आहे. एस्कॉर्बिक ऍसिड प्रति १०० ग्रॅम मध्ये साधारणत: ५४ मि.ली. ग्रॅम इतके आहे. संपर्क ः गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ (लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)