पाणी व चाराटंचाईमुळे जनावरांमध्ये क्षार व जीवनसत्त्वाचा अभाव दिसून येतो, तर बऱ्याच वेळा जनावरांचा कुपोषणाने मृत्यू होतो. याकरिता पशुपालकाने चाऱ्याची सोय असेल त्या प्रमाणातच उत्पादक जनावरांचे संगोपन करणे गरजेचे आहे. जनावरांमध्ये गरजेनुसार पिण्यासाठी पुरेसे पाणी व चारा मिळत नसल्यास आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. तीव्र पाणीटंचाईचा सर्वांत जास्त दुष्परिणाम नवजात वासरे, गाभण जनावरे व दुधाळ जनावरांमध्ये विशेषतः जाणवतो.
पशुआहाराशी संबंधित आजार व समस्या १) कुपोषण
जनावरांना वेळेवर व नियमित पुरेसा चारा व पाणी न मिळाल्यामुळे त्यांचे कुपोषण होते, तर बऱ्याच वेळा चरायला सोडल्यानंतर जनावरांना खाण्यास काहीच न मिळाल्यामुळे त्यांची उपासमार होते. खोल गेलेले डोळे व ऱ्हाट त्वचा, आखडलेल्या मांसपेशी ही कुपोषण व उपासमारीची लक्षणे अाहेत. कुपोषण व उपासमार टाळण्यासाठी जातिवंत, उत्पादनक जनावरांचे चाऱ्याच्या उपलब्धेनुसार संगोपन करावे. २) चयापचयाचे आजार चयापचयाचे आजार सर्वसाधारणपणे आहारातून कमी ऊर्जेचा पुरवठा झाल्यामुळे उद्भवतात. चरायला बाहेर फिरणाऱ्या जनावरांना तर जास्तीच्या ऊर्जेची गरज असते. परंतु, टंचाई काळात ही गरज पूर्ण न होता उलट फिरण्यावर विनाकारण ऊर्जा खर्ची पडते. यामुळे जनावरांचे वजन दिवसेंदिवस घटत जाते. ही स्थिती मुख्यतः गाभण जनावरांमध्ये लवकर आढळून येते. ही समस्या टाळण्यासाठी आपल्या जनावरांना निकृष्ठ चाऱ्यासोबत योग्य प्रमाणात पशुखाद्य व क्षार मिश्रण द्यावे.
३) वनस्पतीपासून व खुरट्या चारा पिकापासून विषबाधा
अपुऱ्या चाऱ्यामुळे जनावरांची पूर्ण भूक भागत नाही. त्यांचे पोट भरत नाही, त्यामुळे जनावरं कोणतीही हिरवी वनस्पती, खुरटी झुडपं चारा समजून खातात. त्यामध्ये असणाऱ्या नायट्राईट, सायनाईड किंवा इतर घटकांमुळे जनावरांना विषबाधा होऊन जनावरं दगावतात. विषबाधेची लक्षणे दिसून आल्यास तत्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत, जेणेकरून जनावरं दगावणार नाहीत. खराब वातावरण किंवा खुराकातील धान्याच्या प्रमाणातील बदल यामुळे आम्लधर्मीय अपचनाची समस्या उद्भवते. चाऱ्याची उपलब्धता कमी असल्यास किंवा निकृष्ट चारा असल्यास बरेच पशुपालक आपल्याकडील जनावरांना घरातील धान्य भरडून देतात, तसेच चंदी, खुराकातील घटकांचे, धान्याचे प्रमाण अचानक बदलतात, त्यामुळे आम्लधर्मीय अपचनाची समस्या निर्माण होते. यामध्ये पोट गच्च राहणे, हगवण लागणे, रवंथ न करणे, लाथा मारते, चारा न खाणे अशी लक्षणे दिसून येतात. तीव्र स्वरूपाच्या आम्लधर्मीय अपचनात जनावरं दगावण्याची शक्यता असते. या आजारावर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत. ५) शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरची कमतरता
जनावरांचे संगोपन मुख्यतः वाळला चारा, कडबा, शेतातील दुय्यम पदार्थांवर केले जात असेल तर जनावरांना शरीरपोषणासाठी कॅल्शियम, फॉस्फरसचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व नियमित होत नाही. जनावरांची हाडे ठिसून होऊन कमकुवत होतात व जनावरांमध्ये उरमोडीसारखे आजार उद्भवतात. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे खाल्लेल्या चाऱ्याचे व्यवस्थित पचन न होणे, अखाद्य वस्तू खाणे या समस्या उद्भवतात. जनावरांना व्यवस्थित चालता-फिरता येत नाही. गाभण जनावरांना तोंडावाटे कॅल्शियम व फॉस्फरस दिल्यावरही चांगला परिणाम दिसून येतो. जनावरांच्या आहारात क्षार मिश्रणाचा वापर जनावरांच्या शारीरिक स्थितीनुसार करणे फायदेशीर ठरते. ६) शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता
मॅग्नेशियमची कमतरता मुख्यतः थोडा हिरवा चारा व जास्त वाळला चारा उपलब्ध असण्याच्या कालावधीत होते. पाण्याच्या कमतरतेच्या काळात ज्या पिकाची मुळे खोलवर विस्तारलेली असतात, ती जमिनीतून पाणी शोषून घेऊन जगण्याचा प्रयत्न करतात. या पिकांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जनावरांच्या पोटात मॅग्नेशियमचे व्यवस्थित शोषण होत नाही. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे फेफरे येणे, चक्कर येणे या समस्या उद्भवतात. वेळेवर उपचार न झाल्यास पॅरालिसीस होऊन जनावरांचा मृत्यू होतो. या समस्येमध्ये कॅल्शियम-मॅग्नेशियमयुक्त अाैषधे पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावीत. ठरवून दिलेल्या वेळी जनावरांना लसीकरण करून घ्यावे, कारण चाराटंचाईमुळे जनावरांतील रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन या काळात रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. वेळोवेळी गोठ्यातील व जनावरांच्या शरीरावरील बाह्यपरजिवींचे नियंत्रण करावे. शक्य असल्यास शेणतपासणी करून जनावरांच्या शरीरातील जंताचा प्रादुर्भाव कमी करावा. जनावरांच्या आहारात एकदम बदल न करता हळूहळू बदल करावा. जेणेकरून पोटाचे, पचनाचे विकार उद्भवणार नाहीत. पशुआहारात कॅल्शियम व फॉस्फरसचा गरजेप्रमाणे पुरवठा होण्यासाठी क्षार मिश्रणाचा योग्य मात्रेत तज्ज्ञांच्या सल्ल्याने समावेश करावा. गोठ्यात जनावरांची जास्त गर्दी न करता व्यवस्थापन करता येईल तेवढ्याच जनावरांचे संगोपन करावे. आजारी जनावरांना तत्काळ वेगळे करून त्यावर उपचार करावेत. प्रकृती पूर्ववत होईपर्यंत इतर जनावरांपासून वेगळे ठेवण्याची सोय करावी. चारा व पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा. जनावरांना दूरवर चरण्यासाठी फिरवण्याऐवजी एका ठिकाणी ठेवून त्यांना उपलब्ध चारा द्यावा. जेणेकरून विनाकारण फिरण्यामुळे उर्जेचा ऱ्हास होणार नाही, कोणतीही विषबाधा होणार नाही. कमी पाण्यात येणारा हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे चारा उत्पादन करून जनावरांना चारा द्यावा. संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३. (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर.)