दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची कमान चढतीच 

मातीचा मगदूर टिकवून ठेवून, काटेकोरपणे पाण्याच्या नियोजनातून शास्त्रीय दृष्ट्या पीक बदल करून मिळालेली समृद्धी कडवंची शिवारात कृषी विज्ञान केंद्राने नुकत्याच कुटूंबनिहाय केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. -पंडित वासरे प्रकल्प अभियंता, कडवंची पाणलोट.
कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना कडवंचीतील ग्रामस्थ
कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना कडवंचीतील ग्रामस्थ

भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद संधारणातून जलसंधारण, माथा ते पायथा उपचार, शंभर टक्के क्षेत्रीय उपचार, शेतततळ्याद्वारे पाणी नियोजन, पीक पद्धतीत शास्त्रीयदृष्ट्या बदल, शंभर टक्‍के ठिबक सिंचनाचा वापर, पाण्याचा ताळेबंद वा अंदाजपत्रक अशी विविध वैशिष्ट्ये कडवंची (जि. जालना) गावाने प्रत्यक्ष अंमलात आणली आहेत. प्रचंड दुष्काळातही गावच्या अर्थकारणाची कमान गेल्या २३ वर्षांत कायम चढती राहिली आहे. यंदाच्या २७ ते २९ मे (२०१९) दरम्यान कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी यांच्या वतीने केलेल्या कडवंचीतील कुटूंबनिहाय सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.    कडवंची गावाने राज्यातच नव्हे, तर देशात आदर्श तयार केला आहे. महाराष्ट्रातील इस्त्राएल असे त्यास संबोधले जाते. गावाने आपले अर्थकारण उंचावण्यासाठी केलेल्या कामांवर हा दृष्टिक्षेप  अशी झाली पाणलोटाची कामे  भौगोलीक क्षेत्र १८१८ हेक्‍टर, ३५५ कुटूंबे, ३३३१ लोकसंख्या असलेल्या कडवंची गावाच्या शिवारात व पाणलोटात २०६ विहिरी, ४०८ हेक्‍टरवर सीसीटी व वनीकरण, १२९८ दगडी पाळी, १४०८ हेक्‍टरवर बांधबंदिस्ती, ९ गॅबीयन बंधारे, १९ सिमेंट बंधारे आहेत. याशिवाय एनएचएम अंतर्गत शेततळे, आरकेव्हीवाय अंतर्गत शेततळे, ठिबक संचाची योजना, एनएचएम अंतर्गत शेडनेटची उभारणी करण्यात आली आहे.  वहित क्षेत्रासह सिंचित क्षेत्रात वाढ  पाणलोटापूर्वी १३६६ हेक्‍टर वहित असलेले कडवंचीचे क्षेत्र १५१७ हेक्‍टरवर आले आहे. तर १४७ हेक्‍टर असलेले शिवारातील पडीक क्षेत्र घटून ६२ हेक्‍टरवर आले आहे. बारमाही सिंचन क्षेत्रात २५४ टक्‍के वाढ होऊन क्षेत्र १७४ हेक्टरवरून ६१७ हेक्‍टरवर पोचले आहे. दुबार सिंचित क्षेत्रातही ११० टक्‍के वाढ होउन हे क्षेत्र ३९८ हेक्‍टरवरून ८९७ हेक्‍टरवर पोचले आहे. पाणलोटापूर्वी २०६ असलेल्या विहिरी ३९८ वर पोचल्या असून ५०३ शेततळी शिवारात उभी आहेत. पाणी पातळीत ५.९४ मीटरने वाढ झाली आहे. पाणलोटापूर्वी तीन हेक्‍टरवर असलेले द्राक्ष व ५७ हेक्‍टरवर असलेले भाजीपाल्याचे क्षेत्र पीक पद्धतीतील बदलामुळे ६१७ हेक्‍टरवर पोचले आहे. यामध्ये ४८० हेक्‍टर द्राक्ष, २० हेक्‍टर डाळिंब, १२ हेक्‍टर आले, १०५ हेक्‍टर भाजीपाला आदी क्षेत्राचा समावेश आहे.  शेतकऱ्यांची ३५.१७ कोटींची गुंतवणूक  एक कोटी २० लाख रुपये खर्च केलेल्या पाणलोटाच्या कामांव्यतिरिक्त कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १२ कोटी रुपयांची कामे कडवंचीच्या शिवारात झाली आहेत. यामध्ये ४०० शेततळी, ५०० बायोगॅस, १५ शेडनेटस, ५० पॅकहाउसेस आदी कामांचा समावेश आहे. विहीर खोदाई, फळबाग लागवड, लहान ट्रॅक्‍टर्स, जनसेट, शिवार रस्ते आदी कामांमध्ये शेतकऱ्यांनीही जवळपास ३५. १७ कोटींची वैयक्तिक गुंतवणूक केली आहे.  उत्पादन पोचले ७२ कोटींवर  द्राक्ष व डाळिंबातून एकरी साडेपाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविणाऱ्या शेतकऱ्यांमुळे  सन २०१८- १९ वर्षातील कृषी उत्पन्न ६६ कोटी रुपयांवर पोचले. भाजीपाला शेतीतून एकरी ५० हजार रुपये मिळविणाऱ्या शेतकऱ्यांमुळे या पिकांत दीड कोटीचे उत्पन्न तर अन्य पिकांमधून एकूण चार कोटी ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. त्यातून या संबंधित वर्षातील कडवंचीचे एकूण कृषी उत्पादन ७२ कोटी १० लाख रुपयांवर पोचल्याचे कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी यांच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. पाणलोटापूर्वी १९९६ मध्ये हे उत्पन्न केवळ ७७ लाख रुपये होते.  पाच वर्षांतील कृषी उत्पादनातील वाढ  वर्ष              कृषी उत्पादन (रुपये)  २०१२-१३         २७ कोटी  २०१३-१४          २९ कोटी  २०१४-१५          ३२ कोटी  २०१५-१६          ४२ कोटी  २०१८-१९           ७२ कोटी    पाच वर्षांतील पर्जन्यमान (मिलीमीटरमध्ये)  वर्ष ........ पर्जन्यमान....सरासरी तुलनेत पाऊस टक्का   २०१२-१३      १९८.५०      २९    २०१३-१४      ५०१. १०     ७३  २०१४-१५     ३५२.७०     ५१   २०१५-१६        ४१२          ६०   २०१८-१९        ४१०           ५९  

वर्ष ........ शेततळ्यातील पाणीसाठा (टीसीएममध्ये)  २०१२-१३.    ५००    २०१३-१४   ७५०    २०१४-१५    ९००   २०१५-१६     १०५०   २०१८-१९    २५००

पाण्याचे असे असते नियोजन 

  • सरासरीच्या ८५ ते ९० टक्‍के पाऊस झाल्यास पाण्याविषयी चिंता उरत नाही 
  • सरासरीच्या ५० ते ६० टक्‍के पाऊस झाल्यास शेततळे भरून ठेवणे, चारा पिकांची व्यवस्था, खरिपाच्या हंगामी सिंचनाची व्यवस्था व शक्य झाल्यास भाजीपाला घेणे. 
  • सरासरीच्या २५ ते ३५ टक्‍के पाऊस झाल्यास केवळ द्राक्षासाठीच शेततळ्यात पाणी भरून ठेवले जाते. चारा पिकाची व्यवस्था केली जाते. 
  • गौरव कडवंचीचा  कडवंची गावाची कृषी विकास व जलसंधारणातील दिशादर्शक कामांची दखल घेण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने यंदाच्या कृषीदिनी (१ जुलै) कै. वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने वसंतराव नाईक जलसंधारण पुरस्कार देऊन कडवंचीचा गौरव केला आहे. कडवंचीचे सरपंच चंद्रकांत क्षीरसागर, विठ्ठल क्षीरसागर, विष्णू क्षीरसागर, श्‍याम क्षीरसागर, उत्तमराव क्षीरसागर, विश्‍वंभर र गोल्डे या शेतकऱ्यांसह कृषी विज्ञान केद्रांचे कृषी अभियंता पंडित वासरे यांनी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला. ॲग्रोवनने यंदा २० एप्रिलच्या वर्धापनदिनानिमित्त कडवंचीमधील जलसंधारण व एकूणच कृषी विकासावर विशेषांकातून सविस्तर प्रकाश टाकला होता.   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com