जगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून, जमिनीच्या जडणघडणीमध्ये सातत्याने कार्यरत आहेत. जमिनीच्या सुपीकतेमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्याचप्रमाणे शेतीतील पिकांचे अवशेष, सेंद्रिय पदार्थ आणि माती यांच्या व्यवस्थापनासाठीही त्यांचा वापर करता येतो. सेंद्रिय पदार्थ कुजवण्याच्या किंवा विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेमध्ये गांडुळांचे महत्त्वाचे योगदान राहू शकते.
गांडुळे वानवे, वाळे, केचवे, शिदोढ, काडू किंवा भूनाग अशा अनेक नावाने ओळखली जातात. प्राणिशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे गांडुळे ऍनेलिडा या वर्गात मोडतात. जगामध्ये गांडुळांच्या सुमारे ३००० जाती असून, भारतामध्ये त्यातील ३०० जाती आढळतात. गांडूळ हा निरुपद्रवी प्राणी बीळ करून राहणारा आहे. बिळात राहून तोंडावाटे माती व सोबत येणारे सेंद्रिय पदार्थ खात असतात. प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थ हे गांडुळाचे मुख्य अन्न होय. गांडुळांच्या काही प्रजाती जमिनीवर पडलेली झाडाची पाने खाण्यासाठी आपल्या बिळात ओढून नेतात, तर काही प्रजाती रात्री जमिनीच्या पृष्ठभागावर येऊन तेथील सेंद्रिय पदार्थ खातात.
एक गांडूळ एक वर्षात ४०० ग्रॅम शुष्क सेंद्रिय पदार्थ खात असतो. एका चौरस मीटरमध्ये गांडुळाची संख्या २०० असल्यास प्रति वर्षी हेक्टरी ८० टन सेंद्रिय पदार्थ खातात. परंतु प्रत्यक्ष शेतामध्ये दीर्घकाळ जमीन कोरडी राहत असल्याने गांडुळे निष्क्रिय किंवा सुप्तावस्थेत राहतात. गांडुळे जांभळी, लाल, तांबडी, निळी, हिरवी, तपकिरी व फिकट तांबूस अशा विविध रंगांची असतात. सर्वात लहान आकाराची गांडुळे एक इंचापेक्षाही कमी लांबीची, तर सर्वात मोठी १० फूट लांबीची गांडुळे ऑस्ट्रेलियात आहेत. सर्वसाधारण नेहमी आढळून येणारी गांडुळे ६ ते ८ इंच लांबीची असतात.
मोठी गांडुळे जमिनीत ३ मीटर खोलीपर्यंत जातात. माती हे खाद्य म्हणून वापरतात. गांडूळ खत निर्मितीसाठी आयसेनिया फोटीडा ही परदेशी जात संशोधनाअंती उत्तम असल्याचे आढळले आहे. तसेच पेरीओनिक्स एक्सकॅहेटस ही गांडुळाची स्थानिक जातसुद्धा गांडूळ खत निर्मितीसाठी चांगली असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, सध्या आयसेनिया फोटीडा जातींची प्रामुख्याने गांडूळ खत निर्मितीसाठी वापरात आहेत.
गांडुळाच्या शरीराचा रंग त्याच्या रक्तातील हिमोग्लोबिनमुळे येतो. प्रौढ गांडुळाच्या गळ्याभोवती एक उभट गोलाकार पट्टा असतो. त्यास क्लायटेलम म्हणतात. तिथे जननेंद्रिय असतात. गांडुळाला डोळे नसले तरी शरीरावर सर्वत्र प्रकाश संवदेनशील ग्रंथी असल्याने प्रकाशाची तीव्रता समजते. गांडुळास तीव्र प्रकाश सहन होत नाही. त्वचेवरील रसायन संवेदनशील ग्रंथीमुळे त्यांना सभोवतालच्या वातावरणातील रासायनिक बदल लगेच जाणवतात व अन्नपदार्थ ओळखता येतात. यासाठी गांडुळाची त्वचा ही ओलसर राहणे आवश्यक असते. त्वचेतील हिमोग्लोबिन प्राणवायूच्या कमी दाबातदेखील कार्य करू शकते. गांडुळे जमिनीत खोलवर राहू शकतात. गांडुळांचा जीवनक्रम : गांडूळ हा उभयलिंगी प्राणी आहे.
अंडावस्था ( ३ ते ४ आठवडे), बाल्यावस्था व तारुण्यावस्था (४-१० आठवडे) आणि प्रौढावस्था (६-२४ महिन्यापर्यंत). प्रयोगशाळेतील गांडुळे १५ वर्षापर्यंत जगलेली आढळत असली तरी नैसर्गिक स्थितीसह कोंबड्या, गोम, पक्षी, रानडुकरे, मुंगूस इ. शत्रूमुळे निसर्गामध्ये कमी आढळते. तारुण्य अवस्थेतील २ गांडुळांच्या मिलनानंतर दोन्ही गांडुळे एक कोष (ककून) टाकतात. त्यात १८ ते २० अंडी असतात. प्रत्येक कोषातून ३ ते ४ गांडुळे बाहेर पडतात. याप्रमाणे गांडुळांची एक जोडी ६ ते ८ पिलांना जन्म देते. एक गांडूळ दर ७ ते ८ दिवसांनी एक कोष देते. कोष पक्व होऊन पिले बाहेर येण्यास १४ ते २१ दिवस लागतात. त्यासाठी दमट वातावरण आवश्यक असते. एका वर्षात गांडुळे १ ते ६ पिढ्या तयार होतात. जीवनचक्राचा कालावधी जातीनुसार व हवामानानुसार बदलत असतो. प्रजनन क्षमता ही मुख्यतः जात, आर्द्रता आणि सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता (विशेषतः कर्ब, नत्र गुणोत्तर) यावर अवलंबून असते. गांडुळांची पचन संस्था व जमिनीची सुपीकता :
गांडुळाची पचन संस्था म्हणजे एक सरळ नळी असते. सुरवातीला तोंड, स्नायूयुक्त घसा, अन्ननलिका, क्रॉप, गिझार्ड आणि आतडी असे भाग असतात. घशाच्या स्नायूच्या आकुंचन प्रसरणामुळे गांडुळे तोंडावाटे कुजलेले सेंद्रिय पदार्थ आत ओढून घेतात. अन्ननलिकेद्वारे ते क्रॉपमध्ये तात्पुरते साठवले जातात. पुढे ते स्नायूयुक्त गिझार्डमध्ये ढकलले जाते. तेथे त्याचे चर्वण होऊन भुग्यात रुपांतर होते. या प्रक्रियेत गिळलेल्या मातीतील वालुकामय कणांचीही मदत होते. या भुग्यामुळे अन्नकणांच्या पृष्ठभागात वाढ होऊन पचनक्रियेस हातभार लागतो. असे अन्नकणांचे पुढे आतड्यात आल्यावर निरनिराळ्या पाचके व उपयुक्त जीवाणू यांच्यामुळे जैविक, रासायनिक प्रकियेद्वारे विघटन होते. यासाठी पचनक्रियेत जीवाणू कार्यप्रवण राहण्यासाठी योग्य तापमान व सामू असावा लागतो. घशाच्या मागील बाजूस कॉल्सिफेस नावाच्या ग्रंथी अन्ननलिकेत जोडलेल्या असतात. या ग्रंथीतून पाझरणाऱ्या कारबॉनिक अनहॅड्रज नावाच्या द्रव्यामुळे शरीरातील सामू योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते. गांडुळाच्या शरीरातून चयापचयानंतर उत्सर्जित झालेल्या मृद गंधयुक्त, काळसर रंगाच्या, वजनास हलके आणि कणीदार दिसणाऱ्या विष्ठेस गांडूळ खत किंवा वर्मी कंपोस्ट असे म्हणतात. एक गांडूळ दररोज त्याच्या वजना इतकी विष्ठा शरीराबाहेर टाकते. त्यात नत्र, स्फुरद, पालाश, चुनखडी, मॅग्नेशियम, मॉलिब्डेनम ही मूलद्रव्ये असतात. त्याचा सामू शेजारच्या जमिनीपेक्षा अधिक उदासीन असतो. गांडुळामुळे जमिनीची सुपीकता वाढते, कारण जमिनीतील खनिज नत्राचे प्रमाण वाढते. नत्र पिकांना मिळतो. गांडुळाच्या शरीरात कोरड्या वजनाची ७२ टक्के प्रथिने असतात. एका मृत गांडुळापासून १० मिली ग्रॅम नायट्रेट मिळते. जमिनीत गांडुळांची संख्या ३७.५ लाख असल्यास हेक्टरी सुमारे २१७ किलो सोडियम नायट्रेट इतका नत्र मिळतो. सेंद्रिय पदार्थातील कार्बन, नायट्रोजन गुणोत्तर २०.१ किंवा त्यापेक्षा कमी झाल्याशिवाय त्यातील नत्र पिकांना मिळत नाही. हे गुणोत्तर कमी करण्याचे कार्य गांडुळे करीत असतात. गांडूळ आणि जमिनीची रासायनिक सुपीकता
एक चौरस मीटर जागेतील गांडुळे दरवर्षी ३.६ किलो माती खातात. त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर ६० वर्षात १५ से.मी. जाडीचा थर तयार होतो. काही गांडुळे त्यांचे बिळातच विष्ठा टाकतात. गांडुळे माती खातात तेव्हा सेंद्रिय पदार्थाबरोबर मातीचे कण त्यांच्या शरीरात आणखी बारीक होतात, त्यामुळे त्यांचे विष्ठेतील मातीचे कण बारीक असतात. जमिनीच्या खोल थरातील माती गांडुळे पृष्ठभागावर आणून टाकतात. याप्रमाणे गांडुळे हेक्टरी २ ते २.५ टन मातीची उलथापालथ करतात. गांडुळाच्या विष्ठेतील मातीची कणीदार संरचना असते, त्यामुळे ही विष्ठा पाण्याने वाहून जात नाही. जमीन घट्ट बनत नाही. ओली व कोरडी जमीन भुसभुशीत राहाते. कणीदार संरचनेमुळे पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी जमिनीत मुरते, पृष्ठभागावरून वाहून जात नाही. जमिनीतील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा झाल्याने जमिनीत हवा खेळती राहते. गांडुळे नसलेल्या जमिनीपेक्षा गांडुळे असलेल्या जमिनीतून पाण्याचा निचरा ४ ते १० पटीने अधिक होतो. गांडुळामुळे जमिनीची सुपीकता वाढते व त्यामुळे साहजिकच पिकाचे उत्पादन वाढते. गांडुळामुळे जमिनीची जलधारणाशक्ती २० टक्क्याने वाढते. पिकांना अधिक पाणी मिळते व पर्यायाने पाण्याचा ताण सहन करावा लागत नाही. गांडुळाच्या विष्ठेत नत्राचे प्रमाण आजूबाजूच्या मूळ जमिनीच्या तुलनेत पाच पटीने जास्त असते. स्फुरद सात पटीने व पालाश अकरा पटीने जास्त असतात. ही प्रमुख अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध अवस्थेत मिळतात. त्याशिवाय कॅल्शियम व मॅग्नेशिअम उपलब्ध अवस्थेत दुप्पट प्रमाणात विष्ठेत असतात. डॉ. प्रशांत नाईकवाडी, ८८८८८१०४८६ (वरिष्ठ व आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण निरीक्षक, नोका, पुणे व बायो ॲग्रिसर्ट इटली, युरोप.)