जनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन टिकवून ठेवण्यासाठी चारा छावण्यात तसेच स्वतःच्या गोठ्यावरसुद्धा जनावरांना स्वच्छ, थंड व मुबलक प्रमाणात पाणी तहान लागेल तेव्हा पिण्यास उपलब्ध असावे. चाराटंचाई व जनावरांच्या आहार नियोजनात फक्त हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य व क्षार मिश्रानांचा विचार होतो; परंतु या सर्वाबरोबरच पाणीसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. चांगला चारा पुरवून सुद्धा तहान लागेल तेव्हा पाणी उपलब्ध नसल्यास त्याचे योग्य पचन होणार नाही. दुष्काळात आधीच पाण्याची कमतरता असते आणि हिरवा चारा नसल्याने त्यातून मिळणारे पाणी सुद्धा मिळत नाही, म्हणूनच पाण्याची अधिक आवश्यकता असते. पाण्याचे महत्त्व
जनावरांचे शरीर ७० ते ८० टक्के पाण्याने बनलेले असते. शरीरातील विवध स्त्राव, रक्त, लाळ, सांध्यातील वंगण इत्यादी सर्व पाण्यानी बनलेले असते. पाणी चाऱ्याला कोठी पोटात भिजवून किण्वन प्रक्रियेस मदत करते. चाऱ्याचे योग्य पचन होण्यासाठी गरज असलेली लाळ आणि पाचक द्रव्येसुद्धा पाण्यापासून बनलेली असतात. चाऱ्यातील घटक विरघळून ते रक्तामार्फत शरीरभर पोचविण्याचे आणि चाऱ्यातील न पचलेला भाग आतड्यातून बाहेर नेण्यासाठी पाणी मदत करते. पाणी कमी पडल्यास पचन क्रिया मंदावते आणि दुग्धोत्पादन घटते. दूध तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. दुधात ८० ते ८५ टक्के पाणी असते. घामामार्फत व रक्ताभिसरण करून शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. शरीरातील विविध रासायनिक क्रिया पार पाडण्यासाठी तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ लघवी वाटे बाहेर काढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. जनावरांना सुका चारा खाल्यावर, दूध दिल्यावर आणि तहान लागेल तेव्हा पाण्याची गरज असते. सर्वसाधारणपणे पशुपालक दोन किंवा तीन वेळा जनावरांना पाणी पाजतात. त्यामुळे जनावराला तहान लागेल तेव्हा पाणी उपलब्ध होत नाही तसेच अनेकवेळा जनावरे गरज नसताना सुद्धा सवय म्हणून मालकाने पाणी ठेवल्यावर अधिक पाणी पितात. या दोन्ही गोष्टींचा परिणाम चाऱ्याच्या पचनावर होतो, त्यामुळे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घट येते. यावर उपाय म्हणजे जनावराला तहान लागेल तेव्हा स्वच्छ व थंड पाणी पिण्यास उपलब्ध असावे. मुक्त संचार गोठा पद्धतीत जनावरेमुक्त असल्याने तहान लागल्यावर पाणी पिवू शकतात, याचा फायदा एक ते दीड लिटर प्रति जनावर दूध उत्पादन वाढीवर झालेला पहावयास मिळतो. ज्यांच्याकडे मुक्त संचार गोठा नाही ते पशुपालक बादलीला फ्लोट वॉल्व्ह बसवून कमी खर्चात, बांधलेल्या जनावरांनासुद्धा २४ तास पाणी उपलब्ध करून देऊ शकतात किंवा सकाळी व संध्याकाळी चारा खाऊन झाल्यावर गव्हाणी स्वच्छ करून त्यात पाणी भरून ठेवून सुद्धा जनावरांना तहान लागेल तेव्हा पाणी पिण्यास उपलब्ध करून देता येईल. टंचाई काळात पाणी उपलब्धता नसल्याने जनावरे ओढे, नाले, तलावातील साठलेले व खराब पाणी पितात. अनेकवेळा गढूळ अस्वच्छ पाण्याचा पुरवठा गोठ्यांना होत असतो. अस्वच्छ साठलेले पाणी असल्यास त्यातून जनावरांना विविध रोगाची लागण होऊ शकते. पाणी साठविण्याचे हौद अनेक दिवस स्वच्छ केले जात नाहीत त्यात शेवाळ वाढून त्यातून विविध रोगजंतू पसरविले जाऊ शकतात. स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचा हौद किंवा टाकी पंधरा दिवसांतून एकदा संपूर्ण कोरडी करून त्याला आतून चुना लावावा. त्यामुळे त्यात शेवाळ वाढणार नाही तसेच पाणी थंड राहून त्यातून कॅल्शिअमचाही थोडा पुरवठा होईल. गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी पाण्यात तुरटी फिरवणे सारखा सोपा उपाय करू शकतो. बाजारात पाणी स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर टॅबलेट ही उपलब्ध आहेत. डॉ. सचिन रहाणे, ७०३८५३५१८१ (दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत फक्त) (डॉ. रहाणे कोतीज, ता. कडेगाव, जि. सांगली येथे तर डॉ. शेजाळ शेंडकरवाडी, ता. बारामती, जि. पुणे येथे पशुधन विकास अधिकारी (गट अ) आहेत.)