जिद्द, चिकाटी, प्रयोगशीलतेतून निर्यातक्षम डाळिंब बाग विस्तार

नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील प्रयोगशील डाळिंब उत्पादक छगनराव जाधव यांनी २७ वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीत एक एकरांत डाळिंब बाग उभारली. नैसर्गिक आपत्ती, संकटे झेलून जिद्दीने उत्कृष्ट व्यवस्थापन केले. नव्या पिढीनेही चिकाटीने प्रयोगशीलता अंगीकारली. निर्यातक्षम उत्पादन घेत आज एक एकर डाळिंब शेती ४५ एकरांवर यशस्वीपणे विस्तारली आहे.
एक एकरांत पॉलीथीन आच्छादन तंत्राचा अवलंब
एक एकरांत पॉलीथीन आच्छादन तंत्राचा अवलंब

नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील प्रयोगशील डाळिंब उत्पादक छगनराव जाधव यांनी २७ वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीत एक एकरांत डाळिंब बाग उभारली. नैसर्गिक आपत्ती, संकटे झेलून जिद्दीने उत्कृष्ट व्यवस्थापन केले. नव्या पिढीनेही चिकाटीने प्रयोगशीलता अंगीकारली. निर्यातक्षम उत्पादन घेत आज एक एकर डाळिंब शेती ४५ एकरांवर यशस्वीपणे विस्तारली आहे.   नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हा पूर्वीपासूनच डाळिंब व द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेला तालुका आहे. अनेक प्रगतिशील बागायतदार येथे पाहण्यास मिळतात. तालुक्यातील सातमाने येथील छगन दशरथ जाधव यांनीही अनेक वर्षांच्या तपातून डाळिंब पिकात लौकिक तयार केला आहे. सन १९९४ पर्यंत त्यांचे एकत्रित कुटुंब होते. विभक्त झाल्यानंतर वाट्याला केवळ सहा एकर शेती आली. त्या वेळी पारंपरिक पिके घेतली जायची. अशावेळी एक एकरात फलोत्पादनाचा निर्णय घेत ‘गणेश’ वाणाची डाळिंब लागवड केली. मात्र भांडवल व सिंचन व्यवस्था नसल्याने संघर्ष करावा लागला. विहिरीतून पाणी डोक्यावरून वाहून बाग जगविली. घेतलेल्या कष्टाला पुढे फळ आले. अन् १९९६ मध्ये बागेतून ९० हजारांचे उत्पन्न मिळाले. आत्मविश्‍वास वाढला. या रकमेतून ५५ हजार प्रति एकर याप्रमाणे काही जमीन विकत घेतली. शिल्लक उत्पन्नातून दोन एकरांवर पुन्हा गणेश व एक एकरांत आरक्ता वाण लागवड केली. कष्ट, नावीन्यपूर्ण प्रयोग करत गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्याचा प्रयत्न कायम टिकविला. त्यामुळेच कष्टाच्या कमाईतून आजमितीस या कुटुंबाने ४४ एकर जमीन घेत त्यावर आदर्श डाळिंब बागा फुलवण्याची कामगिरी केली आहे. पाण्याची मिळवली शाश्‍वती उत्पन्नातून उलाढाल वाढून पत निर्माण झाल्याने बँकेकडून २०१२ मध्ये २५ लाखांचे कर्ज घेतले. त्यातून मोसम नदी परिसरातून १० किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन केली. सन २०१२ मध्ये सिंचन प्रश्‍न गंभीर झाल्यानंतर संरक्षित पाणीसाठ्यासाठी दोन एकर क्षेत्रावर दोन कोटी लिटर क्षमतेचे शेततळे बनविले. आज संपूर्ण क्षेत्रावर ठिबक असून पाण्याच्या शुद्धीकरणासाठी सॅन्ड फिल्टर बसविला आहे. संपूर्ण केंद्रीकृत (सेंट्रलाइज्ड) पद्धतीने सिंचन व्यवस्थापन केले जाते. बागेत झाडांच्या दोन्ही बाजूंना ठिबक नळ्या आहेत. ताशी ८ लिटर डिस्जार्च क्षमता असून प्रति झाड ३२ लिटर सिंचन केले जाते. झाडाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत एकसमान दाबाने पाणी जाईल असे नियोजन केले आहे. वाफसा तपासून उन्हाळ्यात दिवसाआड, पावसाळ्यात सप्ताहात १ ते २ वेळा, तर हिवाळ्यात दोन दिवसाआड सिंचन दिले जाते. जाधव यांची शेती दृष्टिक्षेपात

  • एकूण शेती- ५० एकर
  • पैकी ४० एकर डाळिंब.
  • तीन एकर शेवगा
  •  शेवगा व डाळिंब मिश्र पद्धतीने नवी लागवड- पाच एकर
  • डाळिंब लागवडीचे अंतर १४ बाय ९ फूट
  • एकरी झाडांची संख्या- सुमारे ३४५ पर्यंत.
  • वाणांची वैशिष्ट्ये : आरक्ता वाण एक एकरावर. पूर्वीपासून हे वाण बागेत असल्याने आजही घेण्याची परंपरा. उर्वरित क्षेत्रावर भगवा वाण. टिकाऊ, आकर्षक, आकार व रंग यासह फळे पक्व झाल्यानंतर काढणी कालावधी लांबणीवर नेता येणे शक्य. त्यामुळे या वाणास पसंती दिली. व्यवस्थापनातील मुद्दे गेल्या २० वर्षांत टप्प्याटप्प्याने लागवड करीत डाळिंबाचे क्षेत्र वाढवले. निर्यातक्षम उत्पादन घेण्यावर मुख्य लक्ष असते. त्यासाठी ‘गूड ॲग्रिकॅल्चर प्रॅक्टिसेस’चा काटेकोर अवलंब करतात. मालाचा दर्जा कायम राखल्याने व्यापाऱ्यांची मागणी असते. त्यामुळे गुणवत्तेत सातत्य कसे राखता येईल याकडे कल असतो. -बहर व्यवस्थापन  क्षेत्र (एकर).                       . बहर कालावधी २५                                मृग एप्रिलमध्ये छाटणी,                                     डिसेंबर महिन्यात काढणी १५                               हस्त जून-जुलैमध्ये छाटणी                                     मार्चमध्ये काढणी -राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांच्या शिफारशीनुसार व हवामान अंदाजानुसार बागेचे व्यवस्थापन बागेच्या विश्रांती काळात अन्न साठवणुकीकडे लक्ष छाटणीनंतर बोर्डो फवारण्या अन् तीन टप्प्यांत पानगळ बाग धरल्यानंतर झाडांची काडी सशक्त करण्यावर भर सूत्रकृमी नियंत्रण व खतमात्रा देताना दरवर्षी प्रति झाड सरासरी १ ते २ किलो निंबोळी पेंड सेंद्रिय खतांचा अधिक वापर. अन्नद्रव्यांची संतुलित मात्रा देऊन झाडाची ताकद व प्रतिकारक शक्ती वाढविण्यावर किडी- रोगनियंत्रणासाठी पावसाळ्यात दर महिन्याला सुडोमोनास, बॅसिलस आदी जैविक घटकांचा फवारणी व ठिबकद्वारे वापर. फळे गुंज अवस्थेत असताना कॉपर, झिंक आदींची फवारणी व ठिबकमधूनही. तसेच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर या दुय्यम अन्नद्रव्यांचा बेसल डोसमधून वापर. म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट पोटॅशचाही समवेश काढणी झाल्यानंतर बागेला ४ महिन्यांचा विश्रांती काळ सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व ई एम सोल्यूशन द्रावणनिर्मिती. ४ हजार लिटर टाकीची क्षमता. बाष्पीभवन कमी होण्यासाठी पाचट, शेवग्याचे टाकाऊ घटक, भुसा वापरून सेंद्रिय आच्छादन एकूण उत्पादनाच्या ७५ टक्के निर्यातक्षम तर २५ टक्के मालाची स्थानिक बाजारात विक्री झाडांच्या दोन्ही बाजूंनी ओळीत एकेरी पद्धतीने खत देण्यासाठी स्वयंचलित यंत्र. सरी ओढून घेतल्यामुळे जुन्या मुळ्यांवरील सूत्रकृमीच्या गाठी व जुन्या मुळ्या नष्ट होऊन नवीन मुळ्या तयार केल्या जातात. एकरी उत्पादकता वर्ष...          उत्पादन (टन) २०१९            ८ २०२०           १० २०२१           १० एकरी उत्पादन खर्च- किमान सव्वा लाख रुपये. बाजारपेठ रासायनिक अंशमुक्त उत्पादन घेण्याकडे प्रामुख्याने कल असतो. व्यापारी जागेवर येऊन माल घेऊन जातात. प्रामुख्याने आखाती देशात दुबई, बांगला देश या ठिकाणी माल जातो. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर दोन वर्षे प्रतिकूल परिस्थिती आली. बांगला देशासाठी चालू वर्षी १२५ रुपये प्रतिक्विंटल जागेवर दर मिळाला. दिवाळीनंतर दरांत घसरण होते. हस्त बहरात मालाची उपलब्धता असल्याने दर चांगले मिळाले. गुणवत्ता. आकार तसेच चकाकी व ‘रेसिड्यू फ्री’ या बाबी दरासाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे थेट बांधावर खरेदीची स्पर्धा असते. शेवग्याचीही जागेवर विक्री होते. अलीकडील वर्षांत मिळालेले दर      रु. (प्रतिकिलो) वर्ष.. २०१९                                          ६५ ते ७० २०२०.                                       .८० ते ८५ २०२१.                                        १०० ते १२५ कंपोस्ट खतनिर्मिती दरवर्षी ३० ट्रक शेणखत, २० ट्रॉली मळी, तीन ट्रक कोंबडीखत, शेवग्याचे अवशेष, केएसबी, पीएसबी, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आदी घटक एकत्र मिसळून श्रणाचा १० गुंठे जागेवर डेपो तयार केला जातो. यंत्राच्या साह्याने एकसारखा कालवून तो एक ते दीड महिना दाबून ठेवला जातो. सेंद्रिय पद्धतीने कुजण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिश्रणाचा गरजेनुसार वापर होतो. पॉलीथीन आच्छादन तंत्राचा अवलंब सुमारे १० एकरांतील हस्ताच्या बागेत पॉलीथीन आच्छादन तंत्राचा अवलंब केल्याने उन्हाळ्याच्या दिवसात होणाऱ्या ‘सन बर्निंग’ समस्येवर मात करता आली. झाड सशक्त राहून थंडी व उन्हाळ्याच्या दिवसात तापमान नियंत्रण झाले. दव नियंत्रण झाल्याने फळाची गुणवत्ता कायम राहिली. त्यामुळे कीडनाशकांच्या फवारण्या नियंत्रित राहिल्या. नाविन्यपूर्णतेचा ध्यास: शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर आजपर्यत यांत्रिकीकरण, सिंचन पद्धती अद्यावत ठेवली आहे. नवे तंत्रज्ञान वापरण्यावर भर असतो. त्यातून मजूरटंचाईवर मात केली आहे. विविध कृषी प्रदर्शने, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी यासह कृषी तंत्रज्ञानभिमुख चर्चा कायम असतात. उभारले कृषी वैभव गरिबी असल्याने एकवेळी वाट्याला मोठा संघर्ष आला. छगन जाधव यांच्या दोन्ही मुलांना १२ वीच्या पुढे परिस्थितीअभावी शिकता आले नाही. मात्र शेतीत राबताना त्यांनी घामाला मोल मिळविले. त्यामुळे टुमदार बंगला, वाहने उभी झाली. जीवनशैलीत बदल झाला. मात्र गरिबीची जाणीव एक कणभरही दूर झालेली नाही. सचिन यांना एकदा शाळेत बसने जायचे असता त्यासाठी जवळ एक रुपया देखील नव्हता. त्यासाठी हट्ट केला असताना आईने पाठीवर चटका दिला हे सांगताना त्यांच्या डोळ्यांत पाणी येते. आज स्वप्नपूर्ती झाली, मात्र अहंभाव कुठेच नाही. गरिबीच्या जाणिवेतूनच कृषी वैभव उभारल्याचे जाधव यांच्या शेताला भेट दिल्यानंतर समजते. शेतीच्या संपूर्ण नियोजनात प्रवीण व लहान भाऊ सचिन यांचा मोलाचा वाटा असतो. वडिलांसह आई बेबीबाई, प्रवीण यांची पत्नी यशश्री व सचिन यांची पत्नी नूतन यांची कामांत मदत होते. बारा मजूर कायमस्वरूपी आहेत. संपर्क:प्रवीण जाधव, ९६३७१७४१९४, ९८३४२७६५९१

    डाळिंबाचे अलीकडील मार्केट पूर्वी पावसाळ्यात वातावरण आजच्या तुलनेत चांगले असायचे. त्यामुळे डाळिंब उत्पादकांचा मृग बहराकडे अधिक कल असायचा. त्यामुळे उत्पादन घेण्यात समस्या कमी होत्या. तेलकट डाग किंवा अन्य तत्सम रोगांचा प्रादुर्भाव कमी होता. मात्र आता डाळिंब हंगाम अलीकडील वर्षांत आव्हानात्मक झाला आहे. अलीकडील काळात पाऊस बेभरवशाचा झाला आहे. काही ठिकाणी तो जास्तही होतो. अशावेळी शेतकऱ्यांनी मृग, हस्त व आंबे अशा तिन्ही बहरांत उत्पादन घेणे सुरू केले आहे. पूर्वी बहुतांश शेतकरी मृग बहर घेत असल्याने दिवाळीदरम्यान एकदाच माल बाजारात यायचा. आवक वाढून दर कमी मिळायचे. आता विविध बहरांमुळे माल टप्प्याटप्प्याने बाजारात येत असल्याने आवकेचा दबाव कमी असतो. पूर्वीच्या तुलनेत तेलकट डाग रोगामुळे फळांचे नुकसान अधिक असल्याने उत्पादन घटले आहे. त्यामुळे वर्षभर डाळिंब बाजारात नसल्याने दर तुलनेने बरे मिळत आहेत. गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम मालाला कमाल १२५ रुपये, तर कमान ६० रुपये प्रति किलो दर मिळत आहेत. डागाळलेल्या फळांना तुलनेत मागणी कमी असल्याने त्यांची स्थानिक पातळीवर विक्री होते. त्यास प्रति किलो २५ ते ४० रुपये किलोप्रमाणे दर मिळतो असे प्रवीण जाधव यांनी सांगितले. राज्य डाळिंब बागायतदार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र पवार म्हणाले, की तेलकट डाग व मर रोगांचा मोठा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी त्रासला आहे. सध्या मागणीची स्थिती आवकेवर अवलंबून आहे. पूर्वी लागवड क्षेत्र जास्त होते. आता ते कमी झाले आहे. निविष्ठांचे दर वाढून उत्पादन खर्च वाढल्याने शेती खर्चिक झाली आहे. त्यामुळे नफ्याचे सूत्र म्हणजे उत्पादन खर्च कमी करून गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढीसाठी रेसिड्यू फ्री किंवा सेंद्रिय निविष्ठांचा वापर हाच आहे. सध्या चांगल्या मालाला स्थानिक बाजारासह बांगलादेश युरोप, रशिया, दुबई बाजारांत, तसेच कोलकाता, मुंबई अशा मोठ्या शहरांत मागणी वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजपेठेच्या अडचणी आल्या. कमी दराने खरेदी झाली. मात्र ज्यांनी गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले त्यांना दरात फायदा झाला.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com