कवलापूर (ता. मिरज, जि. सांगली) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सिद्धेश्वर सहकारी पाणी पुरवठा संस्था स्थापन केली. या माध्यमातून द्राक्ष आणि ऊस पिकाला वेब बेस अर्थात नेटवर आधारित स्वयंचलित (ॲटोमेशन) पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचा सामूहिक प्रकल्प राबवला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे पाण्याचे वितरण केले जाते. यातून वीज बिल, पाण्याचा वापर, मजुरीबळ व वेळ या घटकांमध्ये ३० टक्क्यापासून ते ५० टक्क्यांपर्यंत बचत करणे शक्य झाले आहे. सांगली शहरापासून अवघ्या १० किलोमीटर वसलेलं कवलापूर हे मिरज तालुक्यातील गाव. द्राक्ष, ऊस गाजर यासह भाजीपाला गावात पिकवला जातो. या भागात क्षारयुक्त पाण्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे पिकांचे अपेक्षित उत्पादन मिळण्यास अडचणी यायच्या. दर तीन वर्षांनी द्राक्षबाग काढून टाकण्याची वेळ यायची. आर्थिक तोटा सहन करावा लागायचा. त्या व्यतिरिक्त पाण्याचा वापर काटेकोर होणेही गरजेचे झाले होते. त्या दृष्टीने गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सिद्धेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्था स्थापन केली. चर्चेतून असे निष्पन्न झाले की कृष्णा नदीवरून सामूहिक ठिबक सिंचन योजना करणे फायदेशीर ठरेल. द्राक्ष व ऊसउत्पादकांना एकत्र करण्यात आले. या योजनेसाठी भांडवल गुंतवणूक मोठ्या प्रमाणात लागणार होती. सर्वांना विश्वासात घेतल्यानंतर एकमताने सहमती मिळण्यापर्यंत तयारी झाली. सर्वांच्या निर्धारातून काम गेले पुढे अनेक ठिकाणी सहकारी पाणीपुरवठा संस्था नियोजनाअभावी बंद पडल्या असल्याचे दिसत होते. अशा वेळी गावातील काही जणांनी या योजनेच्या अनुषंगाने वेड्यात काढले. पण सिद्धेश्वच्या सदस्यांना निर्धार ठाम होता. अंदाजे खर्च, बाजारात ठिबक संबंधी असलेल्या अनेक कंपन्या असे सगळे सर्वेक्षण झाले. यात कर्जाच्या रूपाने भांडवल उभे करावे लागणार होते. हे कर्ज संस्थेकडे वर्ग केले. योजना सुरू होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला. प्रत्यक्ष शेतात पाणी २०१६ मधील जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात आले. आज संस्था कर्जमुक्त झाली आहे. योजनेतील ठळक बाबी
प्रतिक्रिया आमच्या भागात क्षारयुक्त पाण्याची समस्या असल्याने द्राक्षबागेला ते पाणी उपयुक्त ठरत नव्हते. तीन वर्षाने बाग काढावी लागायची. त्यामुळे खर्च वाढत होता. ठिबक सिंचन योजना सुरू केली. पाणी कृष्णा नदीवरून आणले आहे. आता दर्जेदार उत्पादन मिळू लागले आहे. शिवचरण रिसवडे, लाभ शेतकरी माझी सहा एकर द्राक्ष बाग आहे. एकट्याने कृष्णा नदीवरून पाइपलाइनद्वारे पाणी आणायचे असते तर तीस ते चाळीस लाख रुपये खर्च झाला असता. या योजनेत सहभागी झाल्याने सहा एकरांसाठी सहा लाख साठ हजार रुपये खर्च आला. यासाठी कर्ज घेतले. पाण्याची शाश्वत सोय झाल्याने उत्पादनात वाढ झाली. पैसेही चांगले मिळाल्याने घेतलेले कर्ज देखील फिटले आहे. पूर्वी द्राक्षातून एकरी सहा ते सात टन उत्पादन मिळायचे. आता ते दहा ते बारा टनांपर्यंत मिळू लागले आहे. -उत्तम सावंत योजना सुरू करताना ती चालणार नाही अशी चर्चा होती. ती सुरळीत सुरू ठेवण्याची मोठी जबाबदारी होती. आम्ही एकत्र येऊन ती यशस्वी केली. पाणीपट्टीची वसुली शंभर टक्के असल्याने योजना नेटकी सुरू आहे. सुयश वसंतराव पाटील सचिव, ७७२००९९२०४,९८६०९८१७४० द्राक्ष शेतीला काटेकोर पाणी व्यवस्थापन हवे असते. ॲटोमेशन व बेव बेस तंत्रज्ञानाचा वापर करून सामुहिक पाणी व्यवस्थापन योजना यशस्वी केली आहे. आता रात्री-अपरात्री व्हॉल्व्ह फिरवण्यासाठी शेतकऱ्याला शेतात जावे लागत नाही. मोहन पाटील द्राक्ष बागायतदार व संचालक, महाराष्ट्र द्राक्ष बागायदार संघ, ९७३०६२५६८१ पाच वर्षांपूर्वी सुरू केलेली ही योजना यशस्वीरीत्या सुरु आहे. आता गावातील अनेक शेतकरी अशाच पद्धतीची योजना सुरू करण्याची मागणी करू लागले आहेत. त्यामुळे आम्ही ७५० एकरांसाठी नवी योजना आखली आहे. त्याचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. निवास पाटील चेअरमन, सिद्धेश्वर सहाकरी पाणीपुरवठा संस्था मर्या, कवलापूर, ७७२००९९२०५
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.