मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा अंगीकार, मूल्यवर्धित मालाला मिळविले मार्केट
मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या आलेगाव (ता. जि. नांदेड) येथील केशव राहेगावकर यांनी तीन वर्षांपासून संपूर्णपणे नैसर्गिक शेती करण्यास सुरवात केली आहे. शेतातच तयार केलेल्या जैविक निविष्ठांच्या वापरावर भर दिल्याने उत्पादन खर्चही कमी होत आहे. याच शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धनही करण्यात येत आहे. हळद पावडर, तूर, हरभरा डाळी तयार करून विक्री केल्यामुळे मूल्यवर्धन होऊन अधिक फायदा होत आहे. केशव विनायकराव राहेगावकर यांची नांदेडपासून सुमारे १४ किलोमीटरवरील आलेगाव शिवारात ११ एकर मध्यम प्रकारची जमीन आहे. शेजारून ओढा वाहत असल्यामुळे आठ एकर क्षेत्र त्यांनी उत्पादनक्षम बनविले आहे. आई वडील, दोन भाऊ मिळून एकूण सहा सदस्यांचे त्यांचे कुटुंब आहे. पूर्वी शेती बटईने दिली जायची. परंतु व्यवहार आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर मग स्वतःच पूर्ण वेळ शेतीला देऊन ती प्रगत करण्याचे केशव यांनी ठरवले. संगणकीय कंपनीच्या नोकरीचा राजीनामा केशव यांची शैक्षणिक व करियरची पार्श्वभूमी उत्तम आहे. नांदेड येथील सायन्स काॅलेजमधून संगणक विषयातील एम.एस्सी, कॅाम्प्युटर सायन्स ही पदवी त्यांनी संपादन केली. त्यानंतर पुणे येथील एका आघाडीच्या आयटी कंपनीत तीन वर्षे नोकरी केली. तेथील अनुभवानंतर नांदेड येथे १३ वर्षे संगणक विषयातील संलग्न व्यवसाय केला. सन २०१६ पासून मात्र शेतीतच मुख्य करियर करण्याचे त्यांनी ठरवले. नोकरी व व्यवसाय करीत असताना काही वर्षे जमीन पडिक अवस्थेत होती. जमीन सुधारणा ते नैसर्गिक शेती अनियंत्रित रासायनिक पद्धतीच्या शेतीचे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत केशव जाणून होते. आपले अन्न आरोग्यदायी असेल तर आरोग्य चांगले राहते या सूत्रानुसार त्यांनी नैसर्गिक शेतीबाबत विचार सुरू केला. नैसर्गिक पद्धतीने शेती करणाऱ्या विविध भागातील शेतकऱ्यांच्या संपर्कात ते आले. त्यांचे प्रयोग अभ्यासू लागले. पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेक वर्षे पडीक असलेल्या जमिनीवर झाडे, झुडपे, गवत वाढले होते. जेसीबी यंत्राच्या साहाय्याने त्याची काढणी करून जमीन साफसूफ करण्यात आली. नांगरणी, मोगडणी, वखर पाळ्या अशा विविध प्रकारच्या मशागती करून जमीन लागवडीयोग्य बनविली. त्यासाठी मोठा खर्च झाला. सिंचनासाठी बोअरची सुविधा केली. सन २०१६ च्या दरम्यान नैसर्गिक पद्धतीचे प्रयोग सुरू झाले. खरिपात सोयाबीन, तूर, हळद, रब्बीत ज्वारी, गहू, हरभरा, कांदा असे सर्वसाधारणपणे नियोजन केले. आंतरपीक म्हणून घरच्या गरजेपुरता विविध भाजीपाला घेण्यास सुरवात केली. जैविक निविष्ठांचा वापर शेणखत, वेस्ट डिकंपोझर, जीवामृत, सजीव जल, ट्रायकोडर्मा, मायकोरायझा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे निर्मित उपयुक्त बुरशींचे मिश्रण (बायोमिक्स) यांच्या वापरावर भर दिला. गोमूत्र, गूळ, अंडी, ताक आदींचा वापर सुरू केला. पेरणीपूर्वी बियाणांस जैविक घटकांची प्रक्रिया करण्यात येते. फवारणी तसेच ठिबक संचाद्वारे जमिनीतून गोमूत्र तसेच अन्य जैविक निविष्ठांचा वापर होतो. एक बैल जोडी आणि दोन लाल कंधारी गायी आहेत. त्यामुळे शेणखत पिकांसाठी उपयोगात येते. गरजेनुसार ते विकतही घेण्यात येते. खर्चात झाली बचत रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर पूर्णपणे बंद केला आहे. बैलजोडीद्वारे मशागत, पेरणी, आंतरमशागतीची कामे केली जातात. घरचे बियाणे, शेतातच तयार केलेल्या निविष्ठा यामुळे रासायनिक शेती पद्धतीच्या तुलनेत उत्पादन खर्च चांगल्या प्रमाणात कमी झाला आहे. अलीकडील दुष्काळात अन्य शेतकऱ्यांप्रमाणेच उत्पादनात घट आली. अपेक्षेप्रमाणे उत्पादन व उत्पन्न हाती आले नाही. यंदा पाऊस व पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. नैसर्गिक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकताही वाढीस लागली आहे. रसायनमुक्त उत्पादन मिळत आहे. हळद बेणे, पावडर विक्री नैसर्गिक पद्धतीत पहिल्या वर्षी अर्धा एकर क्षेत्रावर हळदीचा (सेलम वाण) गादीवाफा व ठिबक पद्धतीने लागवड केली. पुढील वर्षी लागवडीसाठी बेणे उपलब्ध झाले. आता दरवर्षी हे पीक घेण्यात येते. यंदा हळदीत तुरीचे आंतरपीक घेतले. तुरीचे शेंडे खुडण्याचा प्रयोग केला आहे. वाळलेल्या हळदीचे एकरी २० ते २५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. बेणे विक्रीवर भर असतो. हळदीची शहरातील गिरणीद्वारे पावडर तयार करून घेऊन विक्री होते. सोयाबीनचे एकरी सात क्विंटल उत्पादन मिळते. नैसर्गिक मालाला घरूनच बाजारपेठ नांदेड येथील आपल्या घरातच केशव यांना बाजारपेठ मिळाली आहे. देशी वाणाच्या ज्वारी, गव्हाची विक्री घरूनच केल्याने बाजारभावापेक्षा तीस ते चाळीस टक्के उत्पन्न जादा मिळते. गेल्या वर्षी ज्वारीची प्रति क्विंटल साडेचार हजार रुपये तर गव्हाची चार हजार रुपये दराने विक्री झाली. बन्सी गव्हाच्या बियाणास शेतकऱ्यांकडून मागणी असते. त्यातून चांगला फायदा होत आहे. तूर, हरभरा यांच्या डाळी तयार करून विकण्यात येतात. सोयाबीनची मात्र बाजारपेठेत विक्री होते. सोलापूर भागातील शेतकरी व अन्य नैसर्गिक शेतकरी गटांना ते सामील झाले आहेत. व्हॉटसॲप ग्रुप्सच्या आधारे त्यामुळेच शेतमाल व डाळींची विक्री होते. गतवर्षी तूरडाळ १२० रुपये प्रति किलो तर हरभरा डाळीची ८० रुपये प्रति किलो दराने विक्री झाली. नैसर्गिक पद्धतीने शेती करणाऱ्या सहकाऱ्यांच्या मदतीने पुणे, मुंबई येथेही हळद पावडरीची विक्री केली जाते. दरवर्षी तीन ते साडेतीन क्विंटल हळद पावडर खपते. प्रति किलो २०० रुपये दर मिळतो. तज्ज्ञांचे मार्गदर्शन.... पोखर्णी (ता. नांदेड) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ज्ञ माणिक कल्याणकर यांच्यासह अन्य तज्ज्ञांच्या संपर्कात केशव असतात. कृषी विज्ञान केंद्राकडून जैविक निविष्ठाही त्यांना उपलब्ध होतात. तसेच पीक व्यवस्थापन सल्लाही मिळतो. संपर्क- केशव राहेगावकर- ८६६८५९०५११
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.