पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण निश्चितच जास्त असते त्यामुळे शेळ्यांना श्वसनसंस्थेचे अाजार होण्याची दाट शक्यता असते. व्यवस्थापनात त्यानुसार बदल करणे गरजेचे असते. त्यामुळे गोठ्याची स्वच्छता, खाद्य, प्रजनन तसेच गाभण शेळी व करडांची निगा, लसीकरण इ. घटकांवर विशेष लक्ष देऊन शेळीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण वाढणार नाही याची काळजी घ्यावी.
कळपातील सर्व शेळ्यांना जंतनाशकाची मात्रा द्यावी. पावसाळ्यातील आर्द्रता अाणि उष्णता जंतांची अंडी व गोचीड यांच्या वाढीसाठी अनुकूल असते. गोचीड शेळ्यांच्या शरीरातील रक्त शोषतात. त्यामुळे शेळ्या अशक्त होतात. अंगाला खाज सुटते त्यामुळे शेळ्या बैचेन होतात, खाणे बंद करतात, हालचाल मंदावते. गोठ्यातील अोलसरपणा दूर करण्यासाठी गोठ्यात रात्रीच्या वेळी शेकोटी पेटवावी किंवा विजेचे बल्ब लावावेत. त्यामुळे गो्ठ्यातील वातावरण उबदार राहते. मलमूत्र रोजच्या रोज स्वच्छ करून गोठा कोरडा ठेवावा. गोठ्यातील जमीन ओली असेल तर खुरामध्ये ओलसरपणा राहून शेळ्यांच्या खुरांमध्ये जखमा होतात. यामुळे शेळ्या लंगडतात, ताप येतो, चारा कमी खातात अाणि अशक्त होतात. पावसामध्ये शेळ्यांना बाहेर चरण्यासाठी सोडू नये. पावसात भिजल्यामुळे शेळ्यांना फुफ्फुसदाह, न्यूमोनियासारखे अाजार होतात. शेळ्या सतत शिंकतात, नाकातून चिकट पांढरा पिवळसर द्रव वाहतो, ताप येतो, धाप लागते इ. लक्षणे दिसून येतात. पावसाळ्यात हिरवा कोवळा चारा जास्त प्रमाणात उपलब्ध असतो. कोवळ्या चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी असतात, त्यामुळे अपचन, पोटफुगी, हगवणीसारखे अाजार उद्भवतात. लहान करडांना जन्मानंतर २४ तासाच्या आत चीक/दूध पाजणे अावश्यक अाहे. त्यामुळे करडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शेळ्या व करडामध्ये आढळणारा प्रमुख आजार म्हणजे आंत्रविषार. हा अाजार होऊ नये म्हणून गोठ्याची स्वच्छता ठेवणे अावश्यक अाहे. शेळ्यांना रोगप्रतीबंधात्मक लसीकरण करावे. फुफ्फुसदाह या अाजारावर मायकोप्लास्मा – एफ- ३८ ही लस पशुवैद्यकाकडून टोचून घ्यावी. लाळ्या खुरकूत हा अाजार विषाणूमुळे होतो. या रोगाची लागण कळपात झपाट्याने होते. या रोगावर प्रतिबंधक उपायाशिवाय उपचार नाही. गाभण शेळीची पावसाळ्यात योग्य प्रकारे काळजी घ्यावी कारण पावसाळ्यात गोठ्याची जमीन ओलसर राहते, त्यामुळे चालताना घसरून पडून गर्भपात होण्याची शक्यता असते म्हणून गाभण शेळीस वेगळे ठेवावे. पावसाळ्यात शेळ्या विण्याचे प्रमाण अधिक असते. या काळात गर्भाशयाचे तोंड उघडे असते, गोठ्यात स्वच्छता नसेल तर गर्भाशयात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी विल्यानंतर पाठीमागचा भाग गरम पाणी व सौम्य जंतुनाशकाने धुऊन कोरडा करावा. शेळ्यांना धनुर्वात होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे पशुवैद्यकाकडून धनुर्वाताचे इंजेक्शन देऊन द्यावे. शेळ्यांची खरेदी करू नये ,कारण पावसाळ्यात रोगाची लागण होण्याची जास्त शक्यता असते. ज्या भागातून शेळ्या खरेदी करावयाच्या आहेत तेथे रोगाची लागण झालेली नसावी, याची काळजी घ्यावी. संपर्क ः डॉ. के. डब्लू. सरप, ९०९६८७०५५० (विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन), कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ)