पावसाळ्यात दमट हवामान असते. त्यामुळे कोंबड्यांच्या घराची विशेष काळजी घ्यावी लागते. स्वच्छता अधिकाधिक प्रमाणात ठेवावी लागते. कारण दमट हवामानात रोग प्रादुर्भावाची शक्यता अधिक असते. यामुळेच पावसाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन कसे करावे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
वातावरणातील बदलाचा कोंबड्यांवर परिणाम होत असतो. काही वेळा त्यांना विविध आजारदेखील होतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये कोंबड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. कोंबड्याचे व्यवस्थापन
शेडवरील पत्रे मजबूत बांधून घ्यावेत. यामुळे जोराची हवा, वावटळ किंवा पाऊस झाला तरी ते हलणार नाहीत किंवा उडून जाणार नाहीत. पोल्ट्री शेड भोवती जर दलदल असेल, तर त्या संदर्भात आवश्यक उपाययोजना करावी. परिसरातील जागा स्वच्छ ठेवावी. पावसाचे पाणी साठून राहू नये, याकरिता खड्डे बुजवून घ्यावेत. पावसाचे पाणी सहजरीत्या वाहून जावे, यासाठी शेडच्या बाजूने चर खोदावेत. शेडसाठी शक्यतो प्लॅस्टिकचे पडदे वापरावेत. पडद्यांची उघडझाप करावी. पडद्याची बांधणी ही छतापासून दीड ते दोन फूट खालपासून करावी. यामुळे शेडच्या वरील बाजूने हवा खेळती राहील आणि आतील वातावरण चांगले राहून याचा पक्ष्यांना फायदा होईल. पक्ष्यांची गादी (लिटर) दिवसातून किमान एकदा तरी चांगली खाली-वर करून हलवून घ्यावी. कारण ओल्या गादीमुळे शेडमधील वातावरण दूषित होते आणि रोगजंतूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. - चुकून गादी जास्त प्रमाणात ओली झाली असेल तर गादीचा तेवढाच भाग काढून टाकावा, त्या ठिकाणी नवीन गादी टाकावी. गादीतील आर्द्रतेमुळे कॉक्सिडिओसिस रोगाच्या जंतूंचे प्रमाण वाढते यावर उपाय म्हणून लिटरमध्ये शिफारशीनुसार चुना मिसळावा. शेडमध्ये माशांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. पक्ष्यांचे खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी. खाद्याच्या गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाठी आल्यास असे खाद्य पक्ष्यांना देऊ नये. कोंबड्यांना शुद्ध पाणी द्यावे. कोंबड्यांना द्यावयाच्या पिण्याच्या पाण्यात शिफारशीनुसार जंतुनाशके योग्य प्रमाणात मिसळावीत. पाण्याची टाकी लोखंडी असल्यास ती गंजू नये याकरिता तिला आतून व बाहेरून रेड ऑक्साईड लावावे. शेडची भिंत सिमेंट विटांनी बांधलेली असेल, तर आतून बाहेरून चुना लावावा. कोंबड्यांसाठी लसीकरण एखाद्या पक्षाला रोगाची लागण झाली, तर त्याचा प्रभाव सगळ्याच पक्ष्यांना रोग होण्याची शक्यता असते. यामुळे योग्य प्रकारे लसीकरण करणे आवश्यक आहे. तसं पाहायला गेलं तर वातावरणात सदैव विषाणू, जिवाणूंचे अस्तित्व असते. जर त्यांना पोषक वातावरण मिळाले, तर रोगांचा प्रादुर्भाव वेगात होतो. कोंबड्यांमध्ये वयोमानानुसार वेगवेगळ्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. लेअर कोबड्यांसाठी लसीकरण
पक्ष्याचे वय | लस | लस टोचण्याची पद्धत |
१ दिवस | मरेक्स | पायच्या स्नायूमध्ये देणे |
५ ते ७ दिवस | लासोटा | नाकातून अथवा डोळ्यातून एक थेंब |
७ ते १४ दिवस | गंबोरो | डोळ्यात देणे |
४ था आठवडा | इनफेक्टसिस ब्राॅंकायटीस | डोळ्यात एक थेंब देणे |
५ वा आठवडा | लासोटा | पिण्याच्या पाण्यातून देणे |
८ वा आठवडा | देवीची लस | पायाच्या मांसात |
१० वा आठवडा | राणीखेत लस | पायाच्या मांसात |
१८ वा आठवडा | राणीखेत लस | पिण्याच्या पाण्यातून देणे |
ब्राॅयलर कोंबड्यांसाठी लसीकरण
पक्ष्यांचे वय | लस | लस टोचण्याची पद्धत |
१ दिवस | मरेक्स | पायाच्या स्नायूमध्ये देणे |
५ ते ७ दिवस | राणीखेत लस | नाकातून थेंब टाकणे |
१२ ते १४ दिवस | गंबोरो | डोळ्यात थेंब टाकणे |
४ था आठवडा | राणीखेत लस | पाण्यातून देणे |
लसीकरण करताना घ्यायची काळजी
रोगप्रतिबंधात्मक लस नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावी. रोगप्रतिबंधक लस बर्फ ठेवलेल्या भांड्यातूनच न्यावी. वापरून उरलेली लस पुन्हा वापरू नये. कारण अशा लसीची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. वापरून उरलेली लस, बाटल्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी. लसीकरणासाठी वापरलेली सीरिंज, सुया, भांडी स्वच्छ धुऊन निर्जंतुक करून घ्यावी. लसीच्या उत्पादक कंपनीचे नाव, लसीचा प्रकार, बॅच नंबर, लस तयार केलेली तारीख, लस उपयोगात आणण्याची अंतिम तारीख यांची नोंद करून मगच लस वापरावी. लस टोचल्यानंतर पक्ष्यांना थकवा येऊ शकतो. हे लक्षात घेता लस टोचण्यापूर्वी तीन दिवस आधी आणि लस टोचून झाल्यावर पाच ते सहा दिवस सर्व पक्ष्यांना पाण्यातून अँटी बायोटिक्स द्यावे. उन्हाळ्यात लसटोचणी कार्यक्रम असेल, तर रोगप्रतिबंधक लस सकाळी किंवा रात्री टोचावी. म्हणजे पक्ष्यांवर ताण येणार नाही. रोगप्रतिबंधक लसीकरण फक्त सशक्त पक्ष्यांना करावे. एकाच वेळी दोन किंवा तीन लस दिल्यास रोगप्रतिकारशक्ती तयार होणार नाही. उलट पक्ष्यांना रिऍक्शन येण्याची शक्यता असते. काही वेळा पिण्याच्या पाण्यामधून काही रोगप्रतिबंधक लसीकरण केले जाते. अशा वेळेस लस ही पाण्यामध्ये समप्रमाणात विरघळणे आवश्यक आहे. जर पक्ष्यांना औषध समप्रमाणात मिळाले तरच पक्ष्यांमध्ये आवश्यक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. लसीकरणाआधी पक्ष्यांना भरपूर तहान लागणे गरजेचे आहे. पक्ष्यांना तहान लागावी म्हणून पाण्याची भांडी रिकामी ठेवावीत. लसमिश्रित पाणी संपल्याशिवाय दुसरे पाणी पक्ष्यांना देऊ नये. लसमिश्रित पाणी थंड राहावे म्हणून त्यामध्ये बर्फाचे खडे टाकावेत. संपर्क ः टी. डी साबळे, ९९२१४९३७६४ (श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड, संगमनेर, जि. नगर)