हळद पिकातील व्यवस्थापन

योग्य पद्धतीने केलेली हळदीची भरणी
योग्य पद्धतीने केलेली हळदीची भरणी

सध्या हळद लागवड होऊन सुमारे सात महिन्यांचा कालावधी (२१० दिवस) पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये हळद पीक वाढीच्या उगवण, शाकीय वाढ आणि हळकुंड फुटणे अशा तीन अवस्था पूर्ण झालेल्या असतात. या पुढील अवस्था म्हणजे हळकुंड भरण्याची अवस्था होय. दोन महिन्यांमध्ये (२१० ते २७० दिवस) हळकुंडाची जाडी आणि वजन निश्चित होते. पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची व फुटव्यांची वाढ भरपूर होते. या वेळी १८ ते २० अंश सेल्सिअस तापमान असून, त्यात घट होत आहे. अशा वातावरणामध्ये हळद पिकाचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे करावे. आंतरमशागत (भरणी करणे) : हळदीच्या लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी हळदीचे पीक ३ ते ५ पानांवर असताना भरणी करावी लागते. सरीमधील माती किंवा लागण केलेल्या दोन्ही गड्ड्यामधील मोकळया जागेमधील माती १.५ ते २ इंच शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूच्या गड्ड्यांना लावावी. अशी भरणी केल्यामुळे नवीन येणारी हळकुंडे झाकले जाऊन चांगली वाढ होते. भरणी केल्यामुळे उत्पादनामध्ये सुमारे १० ते १५ टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येते. गादी वाफ्यावर भरणी करताना पॉवर टिलरच्या साह्याने किंवा दोन गादीवाफ्यांमधील जागेतील माती मोकळी करून गादीवाफ्यावर भर द्यावी. यामुळे मजुरांच्या खर्चात बचत होते. गादीवाफ्यावर ठिबक सिंचन केले असल्यास भरणी करतेवेळी ड्रिपर मातीखाली जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. भरणी न केल्यास जाणवणाऱ्या समस्या भरणी न केल्यास हळदीचे फुटव्यांपासून नव्याने आलेली हळकुंडे उघडी राहतात. सूर्यप्रकाशात हळकुंड आल्यास ते हिरवे पडतात आणि त्यांची वाढ खुंटते. तसेच उघड्या राहिलेल्या हळकुंडावर वा गड्ड्यांवर कंदमाशी सारख्या किडी अंडी घालतात, त्यामुळे कंदकुज रोगाचाही प्रसार होतो. हे टाळण्यासाठी मजूर अथवा भरणी यंत्राने तात्काळ मातीची भर लावून हळकुंडे संपूर्णपणे झाकून घ्यावीत. हळकुंडांचे चांगले पोषण होते. खतांचे व्यवस्थापन

  • हळद पिकासाठी हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश अशी रासायनिक खतांची शिफारस आहे. शिफारशीप्रमाणे संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीवेळी दिले असेल. नत्र २ समान हप्त्यात विभागून देण्याची शिफारस आहे. त्यातील पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी दिला असेल. आता दुसरा हप्ता भरणी वेळी (लागवडीनंतर १०५ दिवसांनी) देण्याची शिफारस आहे. भरणीवेळी हेक्टरी २१५ किलो युरिया, २५ किलो फेरस सल्फेट द्यावे. २ टन निंबोळी किंवा करंजी पेंड (ऑईल केक) द्यावी. भरणी करताना खते दिल्यामुळे खते योग्यरीत्या मातीत मिसळली जातात.
  • शाकीय वाढ पूर्ण झाल्यानंतर हळद पिकास कोणतेही नत्रयुक्त रासायनिक खत (उदा. युरिया इ.) देऊ नये. अशी खते दिल्यास हळदीची अतिरीक्त शाकीय वाढ होते. परिणामी हळद पिकाची पुढील अवस्था उदा. हळकुंड भरणे, हळकुंडाची जाडी आणि वजन वाढणे लांबणीवर पडतात. ज्याठिकाणी पोटॅशयुक्त खतांची कमतरता असेल त्याठिकाणी हेक्टरी १२५ किलो पांढरा पोटॅश द्यावा. हळकुंडांचे वजन वाढून हळकुंडांना चकाकी येते.
  • पाणी व्यवस्थापन :

  • पावसाच्या स्थितीमध्ये पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाणी साठून राहिल्यास मुळांना हवा (ऑक्सिजन) घेण्यास अडथळा उद्भवतो. परिणामी पाने पिवळी पडून निस्तेज होऊन मलूल पडतात. साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा होईल, असे नियोजन करावे.
  • रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा.
  • जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. सतत ओलावा राहिल्यास हळकुंडे कुजतात. त्यामुळे कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव होत असतो.
  • पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. आठ महिने होईपर्यंत जमिनीच्या मगदुराप्रमाणे हळद पिकास पाणी देत रहावे. कंद पोसण्याच्या कालावधीमध्ये पाण्याची गरज मर्यादित होत जाते.
  • फुलांचे दांडे न काढणे :

  • शाकीय वाढ पूर्ण झाल्यांनतर हळदीला फुले येण्यास सुरुवात होते. काही जातींना मोठ्या प्रमाणात तर काही जातींना कमी प्रमाणात फुलांचे दांडे येतात. हळदीला फुले येणे म्हणजे हळदीच्या शाकीय वाढीचा कालावधी संपून हळदीस कंद सुटण्यास सुरुवात झाल्याचे लक्षण आहे. फुलांचे दांडे तसेच झाडावर ठेवल्यास हळद पिकाला त्याचा कोणताही तोटा होत नाही. संशोधनामध्ये हळदीवर फुलांचे दांडे असल्यामुळे उत्पादनात कोणत्याही प्रकारे घट येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच फुलांचे दांडे न संपणारी प्रक्रिया आहे. एकदा जरी दांडे काढले तरी नव्याने येतच राहतात. परिणामी फुलांचे दांडे काढणे ही प्रक्रिया खर्चिक ठरते.
  • त्याच प्रमाणे फुले काढतेवेळी हळद पिकाच्या खोडाला इजा झाल्यास त्या भागातून दुय्यम बुरशींचा पिकात शिरकाव होतो. कंदकुज रोग वाढण्यास धोका असतो. त्यामुळे हळदीला आलेली फुले तशीच राहू द्यावीत. महाराष्ट्रामध्ये कुठेही फुलांचे दांडे काढले जात नाहीत, ही चांगली बाब आहे.
  • कीड आणि रोगांचे नियंत्रण : या वातावरणामध्ये हळद पिकावर कंदमाशी, खोडकिडा या किडींचा व कंदकुज, करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. कंदमाशी ः

  • प्रादुर्भावित परिसरातील शक्यतो सर्व शेतकऱ्यांनी मिळून कमीत कमी २ ते ३ वर्ष सामुदायिकपणे कंदमाशीचे शिफारशीप्रमाणे नियंत्रण करावे. त्यात
  • जुलै ते ऑक्टोंबर दरम्यान १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २ मि.ली. किंवा डायमेथोएट (३०% प्रवाही ) १ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. शिफारशीत वेळेवर हळदीची भरणी करावी.
  • हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत.
  • खोडकीड ः

  • निंबोळी तेल ५ मि.लि. प्रति लिटर पाणी (अॅग्रीस्को शिफारस) या प्रमाणे फवारणी घ्यावी.
  • एकरी एक या प्रमाणे प्रकाश सापळ्याचा वापर करावा. सापळा रात्री ७ ते १० या वेळेत चालू ठेवल्यास किडींचे प्रौढ आकर्षित होतात. ते नष्ट करावेत.
  • कंदकुज ः

  • हळद पिकात पाणी साचू देऊ नये. वेळोवेळी उताराला आडवे चर काढून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.
  • भारी काळ्या जमिनीतून पाण्याचा निचरा कमी प्रमाणात होत असतो, त्यामुळे शक्यतो हळद लागवडीसाठी अशा जमिनी टाळाव्यात. हळद लागवडीसाठी हलकी ते मध्यम आणि पाण्याचा योग्यरीत्या निचरा होणारी जमीन निवडावी.
  • कंदकूज प्रादुर्भावित क्षेत्रात नियमितपणे पिकांची फेरपालट करावी. हळद पिकावर परत हळद अथवा आले पीक घेऊ नये.
  • प्रतिबंधात्मक उपाय ः जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस एकरी २ ते २.५ किलो भुकटी २५० ते ३०० किलो शेणखतामध्ये मिसळून जमिनीत पसरवून द्यावी. रासायनिक नियंत्रण ः

  • हळदीच्या बुंध्याभोवती आळवणी (प्रमाण प्रति लिटर पाणी)
  • कॉपर ऑक्सिक्लोराइड ५ ग्रॅम किंवा बोर्डो मिश्रण १ टक्का.
  • रोगाची तीव्रता जास्त असल्यास, मेटालॅक्सिल (८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के) संयुक्त बुरशीनाशक २ ग्रॅम.
  • हळद पिकाची काढणी केल्यानंतर पुढील वर्षाच्या लागवडीसाठी चांगले कंदकूज मुक्त मातृकंद निवडावेत. योग्य पद्धतीने साठवावेत. ठराविक कालावधीनंतर या साठविलेल्या कंदांची वेळोवेळी तपासणी करून कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव होत नाही ना, याकडे लक्ष द्यावे. करपा ः

  • नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
  • मँकोझेब २ ते २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ते ३ ग्रॅम किंवा १ टक्का बोर्डो मिश्रण.
  • जास्त दिवस धुके राहिल्यास १५ दिवसांच्या अंतराने पीक सात महिन्यांचे होईपर्यंत बुरशीनाशकांची आलटून-पालटून फवारणी करावी. रोगग्रस्त पाने वेचून नष्ट करावीत. शेतात स्वच्छता ठेवावी.
  • हळदीनंतर परत हळद किंवा आले यासारखी पिके सलग त्याच क्षेत्रामध्ये घेऊ नयेत. पिकांचा फेरपालट करावा.
  • डॉ. मनोज माळी (प्रभारी अधिकारी), ९४०३७ ७३६१४ फोन : ०२३३-२४३७२७४ (हळद संशोधन योजना, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com