पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसा

गरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (ता. धामनगाव रेल्वे, जि. अमरावती) येथील नामदेव वैद्य यांनी पेरणी ते काढणीपर्यंत शेतीत यांत्रिकीकरण केले आहे. स्वमालकीसह भाडेतत्वावरील अशा सुमारे ८० एकरांत विविध यंत्रांचा वापर करीत श्रम, वेळ व पैसा यात बचत केली.
नामदेव वैद्य यांनी पेरणी ते काढणी पर्यंत यांत्रीिकीकरण केले आहे.
नामदेव वैद्य यांनी पेरणी ते काढणी पर्यंत यांत्रीिकीकरण केले आहे.

गरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (ता. धामनगाव रेल्वे, जि. अमरावती) येथील नामदेव वैद्य यांनी पेरणी ते काढणीपर्यंत शेतीत यांत्रिकीकरण केले आहे. स्वमालकीसह भाडेतत्वावरील अशा सुमारे ८० एकरांत विविध यंत्रांचा वापर करीत श्रम, वेळ व पैसा यात बचत केली. शिवाय गरजेनुसार स्वकौशल्यातून काही यंत्रेही विकसित केली.   अमरावती जिल्ह्यातील निंभोरा बोडखा (ता.. धामनगाव रेल्वे) येथील नामदेव वैद्य यांची सुमारे ४९ एकर शेती आहे. भाऊ वासुदेव यांच्यासोबत ते शेतीची जबाबदारी पाहतात. दोघे भाऊ, मुले व आईवडील असे त्यांचे कुटुंब आहे. आज एकत्रित कुटुंबपध्दतीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परंतु वैद्य कुटुंब त्यास अपवाद ठरले आहे. नामदेव शेतीची जबाबदारी तर वासुदेव मुलांच्या शिक्षणासाठी धामनगाव येथे राहतात. यांत्रिकीकरण नामदेव यांनी पुणे येथील एका प्रसिद्ध कंपनीत दहा वर्षे नोकरी केली. राजीनामा दिल्यानंतर ते पूर्णवेळ शेतीत उतरले. सुरवातीला दोन एकर, त्यानंतर चार एकर असे करीत त्यांनी शेतीचा विस्तार सुमार ४९ एकरांपर्यंत केला आहे. आपल्या मित्राची ३० एकर शेती ३५ वर्षांपासून कसत आहेत. नामदेव यांनी गावातील काही शेतकऱ्यांच्या सहकार्याने कास्तकार सोया प्रोड्यूसर कंपनीची उभारणीही केली आहे. त्या माध्यमातून कडधान्यावर प्रक्रिया करण्याचा उद्योग उभारणीचे प्रस्तावीत आहे. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा अशी विविध पिके नामदेव घेतात. अलीकडील काळात त्यांनी गरजेनुसार काही यंत्रे घेतली. तसेच काही विकसित केली वा त्यात सुधारणा केल्या. त्याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे. ट्रॅक्टरचलित खत देणारे यंत्र या यंत्राद्वारे शेणखत किंवा दाणेदार स्वरूपातील रासायनिक खत देता येते. एकावेळी सुमारे तीन क्विंटल पर्यंत देणे शक्य होते. सोयाबीन, कापूस, हरभरा, तीळ आदी पिकात त्याचा वापर पेरणीपूर्व काही दिवस आधी करता येतो. एका दिवसात सुमारे २० ते २५ एकरांपर्यंत वापर शक्य होतो. ट्रॅक्टर चालवण्यासाठी चालक व खत देणारी व्यक्ती असे दोनच लोक पुरेसे ठरतात. एकरी दोन ते अडीच लिटर डिझेल लागते. पूर्वी याच कामासाठी दहा मजुरांची गरज भासायची. आता हे बळ कमी होऊन त्यावरील खर्चही कमी झाला आहे. कापूस पेरणी यंत्र राजस्थानातून कापसाचे बियाणे ठेवण्यासाठी दोन बॉक्स आणले. यंत्राचे बाकी ‘डिझाईन’ नामदेव यांनी आपल्या गरजेनुसार केले आहे. यात जुन्या काकऱ्यांचा वापर केला. चाके मार्केटमधून घेतली. बैलचलित या यंत्राद्वारे दिवसभरात सहा एकर काम पूर्ण होते. साडेपाच हजार रुपये या यंत्राची किंमत आहे. कटर मशिन कपाशीची काढणी झाल्यानंतर उर्वरित भागांचे तुकडे करून त्याचे अवशेष शेतातच पसरविण्याचे काम हे यंत्र करते. सुमारे एक लाख ८० हजार रूपयांत ते खरेदी केले आहे. दिवसाला तीन ते चार एकरांपर्यंत या यंत्राद्वारे काम होते. यंत्र वापरण्यासाठी एक मनुष्य पुरेसा ठरतो. डिझेल एकरी चार लिटर लागते. अवशेष कुजल्यानंतर त्याचे खत तयार केले जाते. अलिकडेच तूर पिकासाठीही केवळ दोनशे रुपयांच्या साधनसामग्री आधारे कटर यंत्र तयार केले आहे. फवारणी पंपाच्या बॅटरीचा आधार त्यासाठी घेतला आहे. हे यंत्र वापरण्यासाठी केवळ एक मनुष्य पुरेसा असतो. पेरणी यंत्र हे यंत्र सोयाबीन तसेच मका, हरभरा, उन्हाळी मूग ,तीळ आदी पिकांतही वापरता येते. त्यास पीकनिहाय सहा प्रकारच्या प्लॅस्टिक चकत्या त्यास जोडता येतात. दिवसभरात पाच एकरांपर्यंत काम त्याद्वारे होते. बैलचलित हे यंत्र चालवण्यासाठी एक व्यक्ती पुरेशी ठरते. पेरणी झाल्यानंतर सरी झाकण्यासाठी देखील सुविधा केली आहे. कपाशीला खत देणे - नामदेव यांनी आपल्या गरजेनुसार हे यंत्र स्थानिक कार्यशाळेत तयार केले आहे. कपाशी व्यतिरिक्त उसाला त्याचा वापर होऊ शकेल असे ते म्हणतात. दिवसभरात ६ एकरांचे काम हे यंत्र दोन व्यक्तींमध्ये होते. पूर्वी याच कामासाठी एकरी तीन मजूर लागायचे. आता एका मजुराची दिवसभराची मजुरी ३०० रुपये गृहित धरली तरी दिवसभरात सहाशे रूपयांत हे काम होते. या यंत्रास दोन्ही बाजूस दाते आहे. तीन रॉडसचा आधार देऊन घमेले बसवले आहे. यांत्रिकीकरणाचा वारसा

  • सुमारे ८० एकरांसाठी चार विहिरीच्या आधारे सिंचनाची सोय केली आहे.
  • पाण्याचा नियोजनबद्ध वापर व्हावा यासाठी सुमारे ५० एकरांवर तुषार सिंचन केले जाते.
  • ५० एकरांत सोयाबीन, यातील १५ एकरांत तुरीचे आंतरपीक तर उर्वरित एकरांत कपाशीचे नियोजन असते.
  • क्षेत्र मोठे असल्याने मजूर उपलब्धतेची मोठी अडचण निर्माण व्हायची. ती पाहता २०१४ मध्ये ट्रॅक्टर खरेदी केला. त्यासोबतच पेरणी यंत्रही घेतले. गरज वाढल्यानंतर डिसेंबर २०१६ मध्ये अजून एक ट्रॅक्टर खरेदी केला. ट्रॅक्टरच्या वरील बाजूचा टप काढून दोन्ही बाजूंना २५ लिटर क्षमतेचा पंप बांधून तुरीवर फवारणी करण्याचा प्रयोग केला.
  • कापूस एकरी १३ ते १४ क्विंटल, सोयाबीन १२ क्विंटल, हरभरा ९ ते १० क्विंटल असे उत्पादन ते घेतात. प्रयत्न, कौशल्य व कार्याची दखल घेत राजीव गांधी फाउंडेशनच्या वतीने कृषी रत्न पुरस्काराने नामदेव यांचा गौरव करण्यात आला आहे.
  • संपर्क- नामदेव वैद्य- ९८९०७२३१६१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com