पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम द्राक्षशेती

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात ड्रीप अॅटोमेशन
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात ड्रीप अॅटोमेशन

सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील महत्त्वाचा घटक असतो. नाशिक जिल्ह्यातील पांढुर्ली (ता. सिन्नर) येथील बोराडे कुटूंबाने नेमक्या याच बाबीवर लक्ष केंद्रित केले. पाण्याची नेमकी गरज, ओलावा, त्यानुसार पाणीवापराचे तंत्र व तंत्रज्ञान यांचा सूक्ष्मअभ्यास करून अवगत केले आहे. हलक्या, मुरमाड जमिनीत आज ते विविध वा णांचे निर्यातक्षम उत्पादन यशस्वीपणे घेत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणग्रस्त तालुका आहे. मात्र आव्हानांना तोंड देत प्रयोगशील शेतीत इथले शेतकरी मग्न असतात. पांढुर्ली येथील रवींद्र बोराडे यांनी २००० मध्ये ५४ एकर जमीन घेतली. बंधू विलास यांच्यासोबत चर्चा करून द्राक्षलागवडीचा निर्णय घेतला. हलकी, मुरमाड व खडकाळ जमिनीचे सपाटीकरण करणे मोठे आव्हानाचे होते. यंत्रांचा वापर करून टप्प्याटप्प्याने वर्षभरात ३६ एकर जमीन विकसित केली. मजुरीसाठी सात लाख व इंधनासाठी सात लाख असे एकूण १४ लाख रुपये खर्च केले. या क्षेत्रावर थॉंमसन वाणाची लागवड केली. सन २०१६ मध्ये जुन्या बागा काढून पुनर्लागवड केली. सद्यस्थितीत निर्यातक्षम द्राक्षशेतीत बोराडे यांनी ओळख तयार केली आहे. शेजारील आठ एकर क्षेत्र करारावर घेतले आहे. बोराडे यांची द्राक्षशेती

  • वाण – लागवड (एकर)
  • क्लोन २ – २०
  • क्रीमसन – १५
  • धनाका (स्थानिक जात) – ५
  • थॉमसन - ५
  • सोनाका – ८ (करार पद्धतीच्या शेतात)
  • पेटंटेड वाण
  • आरा १५ – ३
  • आरा १९ -१.५
  • इनिया – १.५
  • पाण्याची उपलब्धता उंच भागातील क्षेत्रात पाण्याचा स्त्रोत नसल्याने विहीर खोदली. मात्र ती कोरडी गेली. अखेर चार किलोमीटरवलरून सहा इंच क्षमतेची जलवाहिनी  वापरून सध्या प्रत्येकी ५० लाख लिटर क्षमता असलेल्या दोन जलसाठ्यांची निर्मिती केली आहे. पैकी एक टॅंक सिमेंटचा तर दुसरा मातीचा आहे. सिंचन व्यवस्थापन - ठळक बाबी

  • पूर्वी वेलींच्या गरजेनुसार पाणी न जाता एका झाडाजवळील जागेवर ते झिरपत राहायचे. त्यामुळे जमीन दोन दिवसांनी वाफशावर यायची. मालाची उत्पादकता व गुणवत्तेवर परिणाम व्हायचा. त्यातच पाणीटंचाई, वीजभारनियमन यामुळे सिंचन व्यवस्थापनात अडचणी येऊ लागल्या. मग ठिबकचे तंत्रज्ञान योग्य रितीने वापरण्याचे ठरवले.
  • संपूर्ण क्षेत्राचे सर्वेक्षण केले.
  • ‘जीपीएस’ तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीच्या मोजण्या व त्यानुसार पूर्व आराखडा तयार केला.
  • प्लॉटनिहाय नियोजन केले.
  • आज सुमारे ६० एकरांत ड्रीप ॲटोमेशन आहे. प्रत्येकी ३० एकरांचे दोन भाग पाडले आहेत.
  • जमीन चढउताराची असल्याने योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे होणारे नुकसान व आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास केला.
  • मृदा परीक्षण करून जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता लक्षात घेतली.
  • पाण्याचे समान वितरण होण्याच्या दृष्टीने प्रत्येक रांगेत ठिबकच्या लॅटरल्स बसवल्या.
  • प्रत्येक फुटावर १. ६ लिटर प्रती तास डिस्चार्ज किंवा प्रति झाड प्रति तास २० लिटर पाणी असे नियोजन बसवले आहे.
  • त्यातून सर्व क्षेत्रावर एकात्मिक सिंचन व खत व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे.
  • - सिंचनाच्या वेळापत्रकाचे नियोजनही काही दिवस आधी करता येते.
  • सामू नियंत्रणात ठेवण्याबरोबर विद्राव्य खतांचा अनावश्यक वापर कमी झाला आहे.
  • चिलीतील सल्लागारांचे मार्गदर्शन सन २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या पुणे येथील चर्चासत्रात चिली येथील द्राक्षतज्ञ रॉड्रीगो ऑलिव्हा यांनी ‘द्राक्षबागेतील सिंचन व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले होते. पुढे नाशिक जिल्ह्यातील ६० द्राक्ष बागायतगदारांचा गट तयार झाला. त्यांनी रॉड्रिगो यांचे मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली. त्यांना भारतात आणण्यामध्ये जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी अरुण मोरे यांचे योगदान महत्त्वाचे ठरल्याचे बोराडे सांगतात. ओलाव्याचे तंत्र

  • माती, त्यातील उपलब्ध ओलावा, पीकवाढीच्या अवस्था व त्यानुसार पाण्याची गरज हे शास्त्र समजून येऊ लागले. मातीत किमान ४० ते ४५ टक्के ओलावा ठेवण्याच प्रयत्न असतो.
  • मातीचा प्रकार, भौतिक स्थिती व पाणीधारण क्षमता अभ्यासली जाते.
  • बागेतील दोन झाडांमध्ये खड्डा खोदून आतील भागात मुळांची स्थिती तपासली जाते.
  • मुळांचा विस्तार व स्थिती अभ्यासून झाडांची पाण्याची गरज नमुना स्वरुपात नोंदविली जाते.
  • जमिनीत ९० ते १०० मिमी. पाणीधारण क्षमता टिकण्यासाठी सूत्र ठरवून पाणीपुरवठा होतो.
  • जमिनीतून होणारे बाष्पीभवनही विचारात घेण्यात येते.
  • संपूर्ण प्रक्षेत्रावर पाणी देताना विविध भागांत असे खड्डे खोदून मुळांपर्यंत पाणी झिरपण्याची परीक्षणे केली जातात.
  • झाडाच्या मुळांपर्यंत पाणी खोलवर व चहुबाजूला जाते की नाही याकडे लक्ष देण्यात येते.
  • हंगामात छाटणी ते फुलोरा, फळधारणा ते पाणी उतरण्याची अवस्था व पाणी उतरण्याची अवस्था ते काढणी अशा तीन टप्प्यांत पाण्याचे वितरण बदलवले जाते.
  • बागेत वेदर स्टेशन बोराडे मोहाडी येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य आहेत. ‘सह्याद्री’ च्या माध्यमातून सुरू असलेल्या तंत्रज्ञान प्रकल्पाद्वारे त्यांच्या शेतात वेदर स्टेशन व ‘किसान हब’ ॲप उपलब्ध केले आहे. जमिनीचा ओलावा, तापमान, विद्युत वाहकता व अन्य महत्त्वपूर्ण संबंधित नोंदी त्याद्वारे समजतात. ‘सॉईल मॉयश्‍चर सेन्सर’ बसविला आहे. मोबाईलद्वारे सर्व नोंदी पाहता येतात. त्याद्वारे पुढील सात दिवसांच्या हवामानाचा अंदाज घेऊन सिंचन व्यवस्थापन करण्यात येते. सिंचन प्रणाली सुधारल्याने झालेले फायदे

  • उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर वाढला. मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होत आहे.
  • द्राक्षवेली निरोगी होऊन त्यांची कार्यक्षमता वाढली.
  • थंडीत मण्यांना तडे जाण्याची समस्या कमी झाली.
  • मजूर खर्च व वेळ यात बचत झाली.
  • निर्यातक्षम मालाच्या उत्पादकतेत व गुणवत्तेत वाढ झाली.
  • निर्यातक्षम द्राक्षांचे एकरी सरासरी १० टन उत्पादन मिळते. प्रत्येक बागेतील सुमारे ८० टक्के माल
  • निर्यातक्षम असतो. सह्याद्री कंपनीला तो पुरवण्यात येतो.
  • प्रयोगशीलतेतून कुटूंबाची ओळख रवींद्र हे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे बंधू विलास उत्कृष्ट व्यवस्थापन सांभाळतात. रवींद्र यांचा मुलगा सुकृत व त्यांचे बंधू विलास यांचा मुलगा स्वप्नील दोघे उच्चशिक्षित आहेत. सुकृत एमबीए झाले आहेत. नोकरीच्या मागे न धावता नवी पिढी आधुनिक पद्धतीने द्राक्ष शेती व्यवस्थापन सांभाळते. त्यांनी शेतीला माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. संपर्क : सुकृत बोराडे - ८३९००९३६४५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com