नाशिक जिल्ह्यात कोळवण नदीच्या काठी वसलेल्या निळवंडी गावाने शिवार रस्ते बांधणीत राज्यासाठी आदर्शवत पॅटर्न तयार केला आहे. लोकसहभाग व सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांच्या माध्यमातून शासकीय मदतीविना गावात २२ किलोमीटरचे शिवार रस्ते पूर्ण झाले. त्यातून माणसांची ये-जा, वाहतूक आदी अनेक समस्या दूर होत प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या. अन्य विविध विकासकामांमधूनही ‘लोकसहभागातून स्वावलंबी ग्रामनिर्मिती’ हा प्रयत्न यशस्वी ठरला. निळवंडी गाव दृष्टिक्षेपात
ग्रामविकासासाठी सामूहिक पुढाकार अनेक गावांत बांधावरून, जागेवरून, जाती-धर्मावरून काही ना काही कुरबुरी सुरू असतात. नाशिक जिल्ह्यातील निळवंडी (ता. दिंडोरी) हे गाव मात्र याला अपवाद ठरले आहे. इथले सर्वच घटक गट-तट, भाऊबंदकी, जातधर्म विसरून आपल्या गावाच्या प्रगतीसाठी एकत्र येतात. ‘लोकसहभागातून ग्रामसमृद्धीकडे’ हे ब्रीद घेऊन प्रत्येकजण ग्रामविकासासाठी सरसावला आहे. आदर्शवत निळवंडी पॅटर्न निळवंडी गावाने सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात ओळख मिळवली खरी. पण एक समस्या मुख्य होऊन राहिलेली होती. गावशिवाराचे रस्ते अरुंद, अडचणीचे व अविकसित होते . त्यामुळे मशागत, मजुरांची ने-आण, निविष्ठांची तसेच मालाची वाहतूक अशा नानाविध अडचणी सातत्याने उदभवत होत्या. मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी पुढाकार घेत त्यावर तोडगा काढण्याचे ठरवले. त्यांनी शिवार रस्त्यांच्या विकासाची संकल्पना ग्रामस्थांसमोर मांडली. निळवंडी भागातील द्राक्ष बागायतदार ‘सह्याद्री’ला द्राक्षांचा पुरवठा करतात. त्यामुळे निळवंडीच्या ग्रामस्थांसमवेत कंपनीचे बंध तयार झाले होते. रस्तेविकासात सह्याद्रीशी संलग्न शेतकऱ्यांनी प्रति किलोमागे ५० पैसे जमा केले तर प्रत्येकी ५० पैशामागे सह्याद्रीकडून ५० पैसे देण्यात येतील अशी घोषणा श्री. शिंदे यांनी केली. या संकल्पनेचा स्वीकार करत ग्रामस्थ एकत्र आले अन शिवार रस्त्यांचे काम हाती घेतले. बघता बघता मदतीचे हात पुढे आले मोहाडी क्लस्टरच्या माध्यमातून एकत्र येत रस्ते बांधणीचा निर्णय झाला. द्राक्ष उत्पादकांच्या माध्यमातून प्रति किलो ५० पैसे याप्रमाणे पाच लाख रुपयांचा पहिला निधी उभा राहिला. हातभार लावण्यासाठी गावातील कानिफनाथ पाणी वापर संस्थेने एक लाखांचा मदत निधी दिला. अन्य गावातींल काही शेतकऱ्यांनी ८० हजार रुपये संकलित केले. काम अधिक गुणवत्तापूर्ण होण्यासाठी ‘सह्याद्री’ कंपनीनेही सात लाखांची भरीव मदत केली. कुठल्याही निविदा व कंत्राटदाराविना शिवार रस्त्याचं काम ग्रामस्थांनी यशस्वी पूर्ण केले. प्रत्येकाचा राहिला सहभाग ग्रामस्थ रमेश पाटील यांनी आपल्या घराचा कोपरा रस्त्याला अडचण ठरत असल्यामुळे तो काढून जागा मोकळी करून दिली. त्यासाठी कुठला मोबदला घेतला नाही. रस्ते तयार करताना कुणीही अडथळा आणला नाही की वाद घातला नाही. काहींनी शेतीलगत जमिनीचा भाग रस्तेबांधणीत दिला. कुणी द्राक्षवेली काढल्या, तर कुणी ऊस काढला. वाटेतील काट्या-कुट्या, अडचणीची झाडे काढली. ग्रामस्थांनी पहिल्या टप्प्यात तब्बल १५ किलोमीटर शिवार रस्ते कुठल्याही शासकीय मदतीविना तयार केले आहेत. त्यातून शिवार रस्तेबांधणीचा ‘निळवंडी पॅटर्न’ राज्यासाठी तयार झाला. तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णण. बी यांच्या हस्ते रस्त्यांचे उदघाटन झाले. या कामांचे त्यांनी विशेष कौतुक केले. पालकमंत्री पानंद रस्ते विकास योजनेतून सात लाख रुपयांचा निधी दिला. यातून पुन्हा सात किलोमीटर रस्त्यांचे काम झाले. विकासकामांचे ठळक मुद्दे
जलव्यवस्थापनातून स्वयंपूर्णतः सन २००६ मध्ये गावात जय कानिफनाथ पाणीवापर संस्था स्थापन करण्यात आली. ५४२ शेतकरी सभासद संस्थेशी संलग्न आहेत. संस्थेच्या माध्यमातून हक्काच्या पाण्याचे व्यवस्थापन, वितरण, सिंचन विषयक पायाभूत सुविधांचे परीक्षण व सूक्ष्मसिंचनावर भर देण्यात आला आहे. पाण्याचा तुटवडा भासतो अशा ठिकाणी शेततळी, विहिरी, बोअरवेल्स यांचा आधार घेण्यात आला आहे. ठळक मुद्दे
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात ओळख गावातील अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. दरडोई क्षेत्र कमी असल्याने नवे तंत्रज्ञान वापरण्याकडे कल आहे. गावातील अनेक शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष पिकवतात. द्राक्ष शेतीचे नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी येथील तरुणांनी ब्राझील, दक्षिण आफ्रिका, स्पेन, ऑस्ट्रेलिया, येथे अभ्यास दौरे केले आहेत. तज्ञ, संशोधक व संबंधित घटकांच्या संपर्कात हे तरुण नेहमी असतात. सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून गावात २००४ मध्ये द्राक्षनिर्यातीचे काम सुरू झाले. द्राक्ष निर्यातीत गावाने आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. सन २०१८-१९ हंगामामध्ये निगावातून १८५८ टन द्राक्षांची विक्रमी निर्यात झाली. त्यामध्ये १२४ कंटेनर्सचा समावेश होता. ठळक मुद्दे
ग्रामविकासाची संकल्पना रुजली भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी मांडलेल्या PURA (Providing Urban Amenities to Rural Areas ) या संकल्पनेवर आधारित ‘सह्याद्री’ कंपनीने ‘मोहाडी क्लस्टर’ योजनेची मांडणी केली आहे. त्याद्वारे ग्रामीण भागात व्यावसायिक संधी निर्माण करणे, वाहतूक सुविधांचा विकास, संपर्क सुसूत्रता, तांत्रिक व व्यावसायिक संकल्पनांची देवाणघेवाण या माध्यमातून निळवंडीत होत आहे. भरीव कामे
पुढील योजना निळवंडी गावाला कोळवण नदीमुळे सृष्टीसौंदर्य लाभलेलं आहे. धर्मेंद्र, शक्ती कपूर यांच्या भूमिका असलेल्या ‘करिष्मा कुदरत का’ या चित्रपटाचे चित्रीकरण गावात झालेले आहे. व्यवसायाभिमुख संधी गावात निर्माण करण्याचा प्रयत्न मोहाडी क्लस्टरच्या माध्यमातून केला जाणार आहे. पर्यावरणपूरक कृषी पर्यटन तसेच कृषीसंबंधित नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी गाव प्रयत्नशील आहे. या माध्यमातून सुशिक्षित तरुणांना स्थानिक रोजगार मिळेल. मान्यवरांच्या भेटी भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी, राष्ट्रीय बागवानी बोर्डचे व्यवस्थापकीय संचालक नेदरलॅंड बॅंकेचे उच्चाधिकारी, ख्यातनाम द्राक्षतज्ञ ऑस्कर सल्गाडो, राॅड्रीगो आदी विविध मान्यवरांनी निळवंडीला भेट दिली आहे. संपर्क : रोहिदास कृष्णा पाटील : ९९२३९४१३३२ सोमनाथ पाटील : ९८२२४१४५६४
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.