अन्नद्रव्ये पिकांना पुरेशी आहेत किंवा नाहीत हे पाहण्यासाठी मातीचे रासायनिक पृथ:करण गरजेचे आहे. पानांचे, खोडांचे किंवा मुळांचे पृथ:करण करून अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेविषयी माहिती मिळवता येते. या माहितीच्या आधारे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन केल्याने पिकांना संतुलित प्रमाणात अन्नद्रव्ये पुरविली जाऊ शकतात. माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन केल्यास संतुलित पीक पोषण करता येते. वनस्पती, पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण केवळ मुळांद्वारे करते. मोठ्या मुळांचा उपयोग झाडाला आधार देण्यासाठी तसेच झाडाने तयार केलेल्या अन्नाचा आणि पाण्याचा साठा करण्यासाठी होतो. जमिनीच्या गुणमधर्मानुसार अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेमध्ये बदल होत असतो. प्रामुख्याने अन्नद्रव्यांचे वर्गीकरण मुख्य अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये या दोन विभागांमध्ये केले जाते. मुख्य अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये
मुख्य अन्नद्रव्ये | सूक्ष्म अन्नद्रव्ये |
नत्र, कर्ब | लोह |
स्फुरद | मँगनीज |
पालाश | जस्त |
कॅल्शिअम | तांबे |
मॅग्नेशिअम | बोरॉन |
गंधक | क्लोरीन, मोलाब्द, निकेल |
पिके निरोगी राहण्यासाठी १७ अन्नद्रव्यांची गरज असते. त्यापैकी एखादे जरी अन्नद्रव कमी असले तरी पिकांची वाढ निरोगीपणे होऊ शकत नाही. पिकांना सर्व अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा होत असेल, पुरेसा सूर्यप्रकाश आणि जमिनीमध्ये योग्य ओलावा असेल तर पिकांची वाढ पूर्णत: होऊन पिके हिरवीगार दिसतात. पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थांमधून (कंपोस्ट, गांडूळ खत, हिरवळीचे खत, वेगवेळ्या प्रकारच्या पेंडी, मासळीचे खत इ.) आणि असेंद्रिय/रासायनिक खतांद्वारे केला जातो. रासायनिक खतांमध्ये मोजकेच (एक, दोन, तीन) अन्नद्रव्ये असतात. परंतु त्यांचे प्रमाण जास्त असते. सेंद्रिय खते जमिनीच्या भौतिक गुणधर्मामध्ये चांगले परिणाम घडवून आणतात. रासायनिक खते खरेदी करताना खतांमधील अन्नद्रव्यांचे प्रमाण पिकांच्या अवस्थेमध्ये गरज असलेले अन्नद्रव्ये आणि किंमत यांचा विचार करावा. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खते उपलब्ध असतात. त्यामध्ये १७:१७:१७ किंवा २०:२०:२० किंवा १९:१९:१९ असे अंक असतात. हे अंक अन्नद्रव्यांचे खतामध्ये असलेले शेकडा प्रमाण दर्शवितात, म्हणजे अनुक्रमे १७ टक्के नत्र, १७ टक्के स्फुरद व १७ टक्के पालाश किंवा २० टक्के नत्र, २० टक्के स्फुरद व शून्य टक्के पालाश. त्याचप्रमाणे इतरही बरीच रासायनिक खते बाजारामध्ये उपलब्ध आहेत. विद्राव्य खते सर्वसाधारणपणे फवारणीद्वारे किंवा तुषार सिंचन किंवा पाण्यासोबत विरघळून दिली जातात. भाजीपाल्यासाठी पूर्वलागवडीच्या वेळेस विद्राव्य खतांच्या द्रावणात रोपांची मुळे बुडवून लावली जातात. जस्त व लोह पानाद्वारे शोषली जातात. अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिल्यास लगेचच फवारणी केल्यास विद्राव्य खते प्रभावीपणे कार्य करतात. रासायनिक खते प्रामुख्याणे दाणेदार आणि द्रवरूप स्वरूपात मिळतात. दाणेदार खते जमिनीमध्ये दिली जातात. खते देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, उदा. बांगडी पद्धत, ओळीतून किंवा फेकुनही दिली जातात. खते दिल्याबरोबर ती जमिनीमध्ये मिसळली गेली पाहिजेत, त्यावेळी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा अन्यथा खतांची उपयोगीता कमी होते. दाणेदार खतामधील काही खते पूर्णत: पाण्यात विद्राव्य असतात, उदा. युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश इ. अशी खते ठिबक संचाद्वारे दिली जातात. काही खते अविद्राव्य असतात. अशी खते ठिबक सिंचनाद्वारे देऊ नयेत. शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त खते देऊ नयेत. संपकर् ः डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६ (मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)