तेलबियांचे घटते क्षेत्र, उत्पादकतेची समस्या लक्षात घेऊन पाल (जि.जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राने तीन वर्षे भुईमूग पिकात प्रात्यक्षिक प्रकल्प शेतकऱ्यांच्या शेतात राबवला. पूर्वी एकरी ७ ते ८ क्विंटल मिळणारे उत्पादन त्यातून १२ ते १४ क्विंटलपर्यंत (वाळवलेले) मिळाले. सुधारीत वाण व निविष्ठांचा शास्त्रीय दृष्ट्या वापर करण्याबरोबर एकात्मिक व्यवस्थापन केल्यास पिकाची एकरी उत्पादकता वाढू शकते हे त्यातून सिद्ध झाले. यंदाच्या उन्हाळ्यात चोपडा तालुक्यात राबवलेल्या प्रकल्पाची ही प्रातिनिधीक यशकथा. तेलबियांखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे ही चिंतेची बाब आहे. उत्पादकता हा देखील महत्त्वाचा विषय आहे. भुईमूग हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पीक आहे. जळगाव जिल्ह्यातील काही भाग उन्हाळी भुईमुगासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. या शेतकऱ्यांना या पिकाचे सुधारीत वाण मिळावे, एकात्मिक पीक व्यवस्थापनाबाबत ते अधिक जागरूक व्हावेत व त्यांचे उत्पन्न वाढावे या हेतूने पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) पुढाकार घेतला. भुईमूग उत्पादकता वाढ प्रकल्प केव्हीके गेल्या तीन वर्षांपासून रावेर व यावेल या भागात भुईमूग पिकात ‘क्लस्टर फ्रंटलाईन डेमोस्ट्रेशन’ म्हणजे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवत आहे. त्याचे प्रातिनिधीक उदाहरण यंदाच्या उन्हाळी हंगामातील देता येईल. चोपडा तालुक्यातील लोणी व माचला या गावांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. माचला येथे सात एकरांत तर लोणी येथे १८ एकरांत प्रत्येकी एक एकरांत अशा २५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. प्रशिक्षण या प्रकल्पांतर्गत सुरुवातीला शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. यात योग्य लागवड पद्धतीपासून ते अन्नद्रव्य, पाणी, व्यवस्थापन, किडी-रोग नियंत्रण, आंतरमशागत आदी सर्व बाबींचा समावेश असतो. सुमारे आठ प्रशिक्षणे, चार क्षेत्र भेटी व एक क्षेत्रीय दिन राबवून शेतकऱ्यांत तंत्रज्ञान प्रसार करण्यात येतो. फुले भारती वाणाचा प्रसार महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्र संशोधित फुले भारती या वाणाचा वापर करण्यात आला. या वाणाची वैशिष्ट्ये
प्रकल्पातील ठळक बाबी
राबवलेले तंत्रज्ञान (एकात्मिक पीक व्यवस्थापन)
उत्पादन पूर्वी या भागातील शेतकरी घुंगरी नावाचे स्थानिक वाण व घरचेच बियाणे वापरायचे. त्याचे एकरी उत्पादन ७ ते ८ क्विंटल मिळायचे. तीन वर्षांतील प्रकल्पांतून हेच उत्पादन एकरी १२ ते १४ क्विंटलपर्यंत (वाळवलेले) मिळाले आहे. लावणीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च १७ हजार रुपये आला. विक्री व्यवस्था प्रकल्पात सहभागी शेतकरी दीपक पाटील यांच्याकडून सुमारे १५ क्विंटल भुईमुगाची खरेदी पाल केव्हीकेने ५५०० रुपये प्रति क्विंटल दरात केली. बाजारात सध्या कोरोनाच्या संकटामुळे दर दबावात आहेत. ऑईल मिला बंद असल्याने उठाव कमी आहे. सध्या बाजारात क्विंटलला ४५०० रुपये दर आहे. काही शेतकऱ्यांनी गावपरिसरात ५५०० रुपये दराने तर काहींनी शिरपूर (जि.धुळे) येथील बाजारात विक्री केली. अपेक्षित दरांसाठी माचला व लोणी येथील काही शेतकऱ्यांनी साठवणूकही केली आहे. कोरोनाचे संकट कमी होण्याची त्यांना प्रतीक्षा आहे. प्रतिक्रिया दोन एकरांत भुईमूग लागवड केली होती. एकात्मिक तंत्रज्ञान आत्मसात केल्याचा व तुषार सिंचनाचा मोठा लाभ झाला. जैविक कीडनाशकांमुळे एकरी तीन ते चार हजार रुपयांचा खर्च वाचला. उत्पादन एकरी १४ क्विंटल (कोरडी शेंग) मिळाले. बाजारात सध्या ४५०० ते ५००० रुपये प्रति क्विंटल दर सुरू आहेत. कृषी विज्ञान केंद्र कोरोनाचे संकट दूर झाले की हमीभावाने म्हणजे ५२०० रुपये दराने खरेदी करणार आहे. निव्वळ उत्पन्न एकरी किमान ४५ हजार रुपये मिळेल अशी अपेक्षा आहे. - पंकज पाटील- ७०२०६०३७९८, माचला मी दीड एकरांत भुईमूग घेतला होता. एकरी सुमारे १४ हजार रुपये खर्च आला. कोरड्या शेंगेचे उत्पादन एकरी १७ ते १८ क्विंटलपर्यंत मिळाले. विक्रीनंतर एकरी किमान ४० हजार रुपये नफा मिळणे अपेक्षित आहे. - दीपक पाटील, माचला शेतकऱ्यांना फुले भारती हा दर्जेदार वाण या निमित्ताने मिळाला आहे. त्याचबरोबर खतांचा संतुलित वापर व एकूणच व्यवस्थापन यामुळे भुईमुगाचे उल्लेखनीय उत्पादन लोणी, माचला भागात होऊ शकले. यामुळे तेलबियांचे क्षेत्र वाढण्यास चालना मिळेल. - महेश महाजन, ९९७०६६१५४६ विषय विशेषज्ज्ञ, केव्हीके, पाल
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.