नाशिक येथील रश्मीन मधुकर माळी यांच्या कुटुंबांचे शेतीत मोठे नाव होते. मात्र नैसर्गिक अडचणींमुळे १९८० च्या दशकात त्यांची बागायती शेती संक्रमणात सापडली. या दरम्यान सक्षम पर्याय म्हणून माळी यांनी उच्च महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर कृषिपूरक व्यवसाय करण्याचे ठरविले. वय कमी, व्यवसायातील माहितीचा अभाव व मर्यादित भांडवल त्यामुळे सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. मात्र जिद्द, चिकाटी व जोखीम व्यवस्थापन, सुधारित तंत्रज्ञान या आधारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू ठेवला. प्रतिकूल परिस्थितीत बाजारांत भेटी देत थेट अंडी विक्रीची सक्षम व्यवस्था उभी केली. त्यातून संपूर्ण नाशिक शहरात व्यावसायिक कौशल्यातून ग्राहक जोडले. आज व्यवसायाचा चांगला विस्तार व काही लाख रुपयांची उलाढाल करणे शक्य झाले आहे. नाशिक शहरात साधारण १९९० च्या दशकात बाहेरील राज्यांतून अंडी पुरवठा होत असे. या दरम्यान अंड्यांचे उत्पादन नाशिक व परिसरामध्ये मागणीच्या तुलनेत होत नव्हते. हा तुटवडा, ग्राहकांची मागणी आणि पर्यायाने कुक्कुटपालन व्यवसायातील संधी नाशिक येथील रश्मीन मधुकर माळी यांनी ओळखली. ओळखली. त्यांची पाच ते सहा एकर शेती आहे. मात्र बागायती शेतीत अनेक नैसर्गिक अडचणी उद्भवल्या. मग सक्षम व्यावसायिक पर्यायाची जोड देणे गरजेचे होते. कुक्कुटपालन त्या दृष्टीने माळी यांना आश्वासक वाटला. तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व अनेक ठिकाणी अभ्यास भेटी देऊन व्यवसायाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली. कामांना गती मिळाली. यातूनच औरंगाबाद रस्त्यावर पंचवटी भागात १९८५ साली ‘प्रगती पोल्ट्री फार्म’ नावाने व्यवसाय सुरू झाला. लेअर पोल्ट्री व्यवसायाचा विस्तार : व्यवसायात भांडवल ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची असते. त्या दृष्टीने सुरुवातीला नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यातून तीन हजार लेअर पक्षांचे (अंडी) संगोपन सरू झाले. मेहनत, जोखीम व्यवस्थापन, संवाद हातोटी आणि परिश्रम या गुणांच्या जोरावर व्यवसाय वाढू लागला. नाशिक शहरात अंडी पुरवठा होऊ लागला. आत्मविश्वास वाढू लागला तसा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बँकेकडून १५ लाख रुपयांचे अर्थसाह्य घेतले. त्यातून पुन्हा प्रत्येकी तीन हजार पक्षी क्षमतेचे दोन पोल्ट्री फार्म उभे केले. या व्यवसायासाठी आवश्यक सर्व सुविधा उभ्या राहिल्या. त्यामुळे विस्तार सुकर झाला. सद्यःस्थितीतील पोल्ट्री व्यवसाय
वैशिष्ट्ये :
वर्षातील बॅचेस पिलू ते पक्षी अंडी अवस्थेत येईपर्यंत सुमारे ३२०० पक्ष्यांची एक बॅच साडेपाच महिने चालते. अशा वर्षभरात तीन बॅचेस घेण्यात येतात. त्याची योग्य साखळी तयार केली आहे. ज्या कंपन्यांकडून पक्षी घेण्यात येतात त्यानुसार ७२ ते १०० आठवडे असा कालावधी पक्षी विकसित होण्यामध्ये लागतो. विक्रीचे सुरुवातीचे प्रयत्न पोल्ट्रीमधून अंडी उत्पादन सुरू झाल्यानंतर अंडी विक्री करण्याचे मुख्य आव्हान होते. मात्र माळी यांनी बाजारपेठेचा अचूक अंदाज घेतला. सुरुवातीच्या काळात स्वतः बाजारात फिरून ग्राहक मिळविले. या काळात रश्मीन नावाऐवजी ‘दादा माळी’ या नावाने ते लोकप्रिय झाले. त्यांनी ‘उत्पादक ते ग्राहक’ अशी भूमिका स्वीकारली. होलसेलर, मध्यस्थ अशी साखळी मोडीत काढत थेट विक्री व्यवस्था उभारली. त्यातून नफ्याचे प्रमाण वाढण्यास मदत झाली. मागणी व वेळेवर पुरवठा होऊ लागल्याने ग्राहकांकडूनही मालाला पसंती येत गेली. थेट विक्री व्यवस्था : ‘माउथ पब्लिसिटी’च्या जोरावर माळी यांनी ग्राहकांचे जाळे निर्माण केले. छोटे- मोठे विक्रेते त्यांच्याकडून दररोज मागणी आगाऊ नोंदवितात. त्यानुसार थेट पुरवठा केला जातो. मध्यम स्वरूपाचे ग्राहक थेट पोल्ट्रीमध्ये येऊन माल खरेदी करतात. त्यामुळे थेट बाजारात जाण्याची वा विक्रीसाठी फिरण्याची गरज उरलेली नाही. ग्राहकच थेट त्यांच्याशी जोडले गेले आहेत. दररोज सर्वसाधारण ८ ते साडेआठ हजार अंड्यांची विक्री होते. त्यामुळे सक्षम अशी विक्री व्यवस्था मार्केटिंगच्या माध्यमातून उभी राहिली आहे. अंड्यांचा पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र वाहने आहेत. मागणीनुसार होतो पुरवठा दररोज संकलित केलेली अंडी त्याच दिवशी विक्री होतात. ठोक स्वरूपासह किरकोळ स्वरूपातली मागणी असते. त्यासाठी तपोवन परिसरात नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत विक्री केंद्र उभारले आहे. अनेक वर्षांपासून या व्यवसायात कार्यरत असल्याने माळी यांनी आपले ग्राहक स्रोतही पक्के केले आहेत. त्यानुसार तारांकित हॉटेल्स, बेकरी, किराणा दुकानदार, विविध कॅन्टीन्स, किरकोळ अंडी व्यापारी तसेच शहरातील विविध नामवंत रुग्णालयांना मागणीनुसार पुरवठा करण्यात येतो. पोल्ट्री खाद्यनिर्मितीचे युनिट सुरुवातीला दररोज कुक्कुट खाद्य विकत घ्यावे लागत असे. त्यामुळे त्यावर अतिरिक्त खर्च व्हायचा. ही बाब लक्षात घेऊन स्वमालकीचे खाद्यनिर्मितीचे युनिट उभारले. त्याची प्रति तास एक टन क्षमता आहे. साधारण तेवढे खाद्य दररोज लागतेच. यासाठी कच्चा माल मका, सोयाबीन, सूर्यफूल यांच्यासह मिश्रित करण्यात येणारे आवश्यक घटक विकत आणून वापरले जातात. त्यातून गुणवत्तापूर्ण पोषक खाद्यनिर्मिती केली जाते. त्यातून उत्पादन खर्चात घट झाली आहे. आपल्या पक्षांची गरज भागवून अन्य पोल्ट्री उत्पादकांच्या मागणीनुसारही त्याची विक्री केली जाते. कामाचे आदर्श व्यवस्थापन : माळी यांना या व्यवसायात सुमारे ३५ वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. आजपर्यंत विविध अनुभव घेत अनेक व्यावसायिक बदल करीत नवे तंत्रज्ञान त्यांनी स्वीकारले आहे. आता थोरला मुलगा निशाल हा व्यवस्थापन पाहतो. त्यामुळे कुटुंबकेंद्रित स्वरूपाच्या व्यवसायात त्यांनी वेगळी ओळख नाशिक व परिसरात निर्माण केली आहे. असे होते कामकाज :
अन्य शेतकऱ्यांसाठी पक्षिसंगोपन व्यवसायातील दीर्घ अनुभवाचा फायदा घेताना माळी अन्य पोल्ट्री उत्पादकांसाठीही पक्षी संगोपन करतात. साधारण साडेपाच महिन्यांसाठी हे संगोपन केले जाते. वर्षाला सुमारे ६० हजार ते ७० हजार पक्ष्यांचे संगोपन या पद्धतीने मागणीनुसार केल्याचे माळी सांगतात. कोंबडी खतविक्रीतून उत्पन्न नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, सिन्नर, नाशिक या तालुक्यांमध्ये द्राक्ष, ऊस, भाजीपाला पिके यासाठी पोल्ट्री खताची मागणी असते. अनेक शेतकरी थेट येऊन खरेदी करतात. दरवर्षी अनेक शेतकरी आगाऊ मागणी नोंदवितात. प्रतिकिलो साडेतीन रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे विक्री होते. त्यामुळे अंडी विक्रीसह हादेखील उत्पन्नाचा एक स्रोत ठरला आहे. साठवणुकीचे नियोजन होते म्हणून... सध्याच्या काळात अमेरिकन लष्करी अळीमुळे मका शेती संकटात आली आहे. त्यामुळे मक्याचे दरही वाढले आहेत. वर्षभर पुरेल एवढ्या खाद्याचे नियोजन केल्याने आत्तापर्यंत तरी नुकसान झाले नाही. मात्र त्याचा फटका व्यवसायाला निश्चित बसणार असल्याचे माळी म्हणाले. संपर्क : रश्मीन माळी - ८८८८८ ७३७२१v
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.