मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
अॅग्रो विशेष
ऐंशी प्रकारचा प्रक्रियायुक्त कोकणमेवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबाव (ता.देवगड) येथील बागायतदार श्रीधर ओगले यांनी कोकणातील महत्त्वाची फळे व भाज्या यांवर प्रक्रिया करून तब्बल ८० उत्पादनांची निर्मिती केली आहे.
आवश्यक ते यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान वापरून ‘रेडी टू कूक’ व ‘रेडी टू ईट’ या श्रेणीतील उत्पादनांना राज्यभर बाजारपेठ उपलब्ध केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबाव (ता.देवगड) येथील बागायतदार श्रीधर ओगले यांनी कोकणातील महत्त्वाची फळे व भाज्या यांवर प्रक्रिया करून तब्बल ८० उत्पादनांची निर्मिती केली आहे. आवश्यक ते यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान वापरून ‘रेडी टू कूक’ व ‘रेडी टू ईट’ या श्रेणीतील उत्पादनांना राज्यभर बाजारपेठ उपलब्ध केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडचा आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. याच देवगड तालुक्यातील देवगड-मिठबाव मार्गावरील दहिबाव येथील बागायतदार श्रीधर पुरुषोत्तम ओगले यांनी आपला प्रकिया उद्योग नावारूपास आणला आहे. त्यांची हापूस आंब्याची सुमारे २००० झाडे आहेत. उत्कृष्ट दर्जाचा आंबा ते पिकवतात. अलीकडील वर्षांत हवामानातील बदल, दरांतील चढउतार यामुळे आंबा शेतीत समस्या तयार झाल्या आहेत. त्यातूनच प्रकिया उद्योगात उतरण्याचे त्यांनी नक्की केले.
प्रक्रियेचा पहिला प्रयत्न
सन १९८० मध्ये ओगले यांनी आंब्यावरील प्रक्रियेचा पहिला प्रयत्न केला. हापूस आमरस
तयार केल्यानंतर पॅकिंग मशिनही खरेदी केले. मात्र उद्योगाची तांत्रिक माहिती देणारा सल्लागार त्यावेळी उपलब्ध न झाल्याने पहिला प्रयत्न असफल ठरला. परंतु ते निराश झाले नाहीत. एकीकडे आंबा बागेत काम करीत असताना दुसरीकडे प्रकिया उद्योगाचा ते बारकाईने अभ्यास करू लागले. पुढीलवर्षी पुन्हा आमरस बनवून बाटलीबंद करण्याचा प्रयत्न केला. त्यात ५० टक्के यश मिळाले. प्रक्रियेतील एकेक अनुभव गाठीशी घेत ते पुढे निघाले.
प्रकल्पघराची उभारणी
आंबा पॅकिंग, विक्री आणि प्रकिया उद्योगासाठी पुरेशी जागा असावी या हेतूने १९८५ मध्ये प्रकल्पघराची उभारणी केली. प्रकिया उद्योगासाठी शासनाचे विविध परवाने मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. सन १९९० मध्ये त्यांच्याकडील आमरस, जॅम या उत्पादनांना बाजारपेठेत मागणी वाढली. त्याबरोबर आत्मविश्वासही उंचावला.
वर्षभर कोकणमेव्याचा आनंद
आंबा, फणस, करवंद, जांभूळ यासह कोकणातील विविध फळांची चव फक्त विशिष्ट हंगामात चाखता येते. ग्राहकांना कोकणमेवा बारमाही उपलब्ध करून दिला तर त्याचा मोठा फायदा ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना देखील होईल या हेतूने काम सुरू केले. त्यातून फणसपोळी, फणस केक, कोवळ्या फणसाची भाजी अशी उत्पादने सुरू केली. पुणे ,मुंबई ,कोल्हापूर, सांगली, सातारा यासह राज्याच्या विविध भागांमध्ये त्यास चांगली मागणी मिळाली. सन २००७ मध्ये साडेपाच लाख रुपये खर्चून रायपनिंग चेंबर उभारले. त्यात पिकविलेल्या आंब्याची दोन डझन पेटीद्वारे थेट विक्री करून नवी संकल्पना राबविली.
रिटॉर्ट पाऊच पॅकिंग
उत्पादन कितीही चांगले असले तरी त्याचा टिकाऊपणा आणि पॅकिंग खूप महत्त्वाचे असल्याचे ओगले यांनी ओळखले. त्या अनुषंगाने अभ्यास सुरू केला. त्यावेळी रिटॉर्ट पाऊचचा पर्याय पुढे आला. अधिक चौकशी केल्यानंतर गुरगाव (हरियाना) येथून ते उपलब्ध केले. संबंधित यंत्र पुणे येथून खरेदी केले. आपली उत्पादने रिटॉर्ट पाऊचमधून ग्राहकांना देण्यास सुरवात केली. त्याचा चांगला परिणाम
म्हणजे उत्पादनांना बाजारपेठेतून मागणी वाढली. मग विविध मालवणी मसाले, लोणचे, फळांचे सरबत अशी उत्पादनात वाढ केली. आवळा, जांभूळ, करवंद आदींवरही प्रकिया सुरू केली.
बाजारपेठेत मोठी मागणी
-सुरवातीला ओगले यांना आपल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. पुण्यातून पहिली सुरवात केली. त्यानंतर मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा यासह स्थानिक पातळीवरही विक्री सुरू केली.
उत्पादनांची झलक
- रेडी टी कूक व रेडी टू इट यांची श्रेणी
- फणस, केळफूल, टाकळा, अळू, सुरण आदींची भाजी
- सरबत- आंबा, कोकम, कैरी, आवळा
- लोणचे- आंबा, आवळा, मिरची, माईणमुळा, करवंद, जांभूळ क्रश
- मसाले आणि पीठ- मालवणी मसाला, सांडगी मिरची, कोहळ्याचा सांडगा,मेतकुट
- कारली, सुरण, बीट, गाजर यावरही प्रकिया
- व्हॅक्यूम फ्राय- फणस वेफर्स, भेंडी, गाजर, बीट, रताळे, कोकोनट क्रंच व डिहायड्रेट
- अवघ्या पाच ते सहा मिनिटांत भाजी तयार होत असल्यामुळे ‘रेडी टू कूक’ उत्पादनांना मोठी मागणी
- प्रक्रियेनंतर उत्पादन घाईगडबडीत बाजारपेठेत नेत नाहीत. ते किती दिवस टिकते, त्यावर काही परिणाम झाला आहे का, चवीत काही फरक पडला आहे का या सर्व बाबी पडताळून पाहतात. खात्री झाल्यानंतरच ते बाजारपेठेत नेतात.
- सन २०११-१२ मध्ये ज्यूस तयार करणारे अत्याधुनिक यंत्र घेतले. त्याच्या साहाय्याने
- कोकणातील अनेक फळांची रसनिर्मिती.
- सध्या सुमारे ८० उत्पादनांची निर्मिती
- उत्पादनांत कोणत्याही रसायनांचा वापर नाही.
होणारी प्रक्रिया
- आंबा- ४० टन
- फणस- ३५ टन
- जांभूळ- ४ टन
- आवळा- ४ ते ५ टन
- केळफूल- ३ टन
- टाकळा- १ टन
रानभाज्यांवर प्रकिया
कोकणात औषधी गुणधर्म असलेल्या अनेक रानभाज्या आहेत.त्यामध्ये सहज उपलब्ध होतील अशा टाकळा, अळू, भारंगी, काटला यासारख्या अनेक भाज्या आहेत. त्या लोक चवीने आणि आवडीने खातात. परंतु त्या ठराविक दिवसांतच उपलब्ध होतात. त्यामुळे प्रकिया करून त्या वर्षभर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ओगले यांनी सुरू केला आहे. पैकी टाकळा आणि अळूच्या तयार भाज्या ग्राहकांपर्यंत पोचविल्या आहेत. भविष्यात उर्वरित भाज्यांवर प्रकिया करण्याचा मानस आहे.
उलाढाल-
सध्या आवश्यक यंत्रसामुग्री व देवगड येथील कॉमन फॅसिलिटी सेंटरची मदत घेऊन सुमारे
२५ लाख रुपयांची भांडवली गुंतवणूक केली. उद्योगाची वार्षिक उलाढाल आता ७० लाखांवर पोचली आहे. थेट २० ते २२ स्थानिक महिला आणि कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. याशिवाय शेकडो लोकांना अप्रत्यक्ष रोजगाराची संधी ओगले यांनी उपलब्ध करून दिली आहे.
संपर्क- श्रीधर ओगले- ९४०३५९५१९
फोटो गॅलरी
- 1 of 653
- ››