उन्हाळ्यात जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात गोचीडांचा प्रादुर्भाव दिसून येतो. गोचीडांच्या अंडी, डिंभ, तरुण आणि प्रौढ अशा चार अवस्थांपैकी प्रौढ अवस्था जास्त प्रमाणात आढळते. गोचीड जनावरांच्या शरीरातून रक्त शोषून घेतात. गोचीडांच्या चाव्यामुळे जनावरांना गोचीड तापाची लागण होते. जसजसे ऊन वाढते तसे गोठ्यामध्ये गोचीडांचे प्रमाण वाढते. त्याचा परिणाम जनावरांवर होऊन उत्पादन कमी होत जाते.
गोचीडावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे त्या दृष्टीने गोचीड नियंत्रण व त्यावरील उपाययोजना पशुपालकाला माहिती असणे गरजेचे आहे. गोचीड हा रक्तावर उपजीविका करणारा परजीवी असून त्याचे जीवनचक्र हे साधारण तीन वर्षांचे असते. सहा पायाची डिंभ अवस्था फार छोटी असते. तीन आठवड्यातच गोचीड तरुण अवस्थेत जातो. ही अवस्था जास्त काळ टिकते. यात त्याला आठ पाय असतात. जनावरांचा वास घेऊन श्वासातून उत्सर्जित होणारा कार्बन डायआॅक्साईड वायू, सावली व घामाचा गंध यावरून गोचीड जनावरांना ताबडतोब ओळखतात. यासाठी जनावरांच्या गोठ्यात चुना मारावा किवा जनावरांच्या अंगावर खरारा करावा. जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी गोचीडांना एक ते तीन प्राण्यांची गरज असते. रक्त पिण्यासाठी गोचीडाला अर्धा ते चार तास लागतात, त्यातही मऊ गोचीड जास्त वेगाने रक्त पितात तर टणक गोचीडाला रक्त पिण्यासाठी वेळ लागतो. आठवड्यातून एक वेळ जनावरांना कीटकनाशक किंवा आयुर्वेदिक औषधी वापरून धुतल्याने तरुण व प्रौढ गोचीडाचे निर्मूलन करता येईल. गोचीड चावल्यामुळे जनावराची त्वचा बधीर होते, त्यामुळे जनावराला जाणीव होत नाही व रक्त पिताना गोचीड बऱ्याच जीवजंतूंचा प्रसार करतात. तसेच प्रत्येक वेळी रक्त पिल्यानंतर गोचीड ते पचविण्यासाठी जमिनीवर येतो. त्यामुळे गोठ्यात नेहमी गोचीडनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे. प्रजननानंतर नर गोचीड मरतो तर मादी गोचीड ३०० ते ५०० अंडी टाकते, त्यामुळे मेलेले गोचीड जर गोठ्यात दिसत असतील तर मादी गोचीडानी अंडी घातली आहेत हे समजून गोचीडनाशकांची फवारणी करावी. उष्ण ज्योतीचा (फायर गन) वापर करून जसे की ओवर हेड स्टोव्हचा वापर करून आणि गोठ्यातील भेगा भरल्याने गोचीडची अंडी नष्ट करता येतात. गोचीड प्राण्यांच्या शोधात गवताच्या टोकावर बसून राहतो आणि दोन पाय सतत हवेतच ठेवतो. जनावर बाजूने गेले की लगेच शरीरावर चढतो त्यासाठी रानात चरायला जाणाऱ्या जनावरांची नेहमी तपासणी करून फवारणी करावी. प्रत्येक अवस्था पूर्ण करण्यास गोचीडास जमिनीवर यावे लागते, मुक्त गोठ्यात कोंबड्या पाळून प्रौढ गोचीडांचे निर्मूलन करता येईल. गोचीड निर्मूलनासाठी गोचीडनाशकांचा अयोग्य मात्रेत अतिवापर, यामुळे प्रतिरोधकता ही मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे योग्य निर्मूलनासाठी फवारणी करणे, गोचीडनाशकांचा वापर किंवा स्प्रे वापरणे व आयुर्वेदिक औषधे यासारखे उपाय आलटून पालटून जर केले तर प्रतिरोधकता कमी होईल व हे सर्व उपाय हे सतत करत राहिल्याने गोठ्यातून गोचीडाचे कायमचे निर्मूलन शक्य आहे. संपर्क ः डॉ. गोपाल मंजूळकर, ९८२२२३१९२३ (विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, अकोला)