बटाटा पिकाची अयोग्य काढणी आणि साठवणुकीत योग्य काळजी न घेतल्याने नुकसान होण्याची शक्यता असते, त्याकरिता काढणीपूर्वी आणि काढणीनंतर साठवणुकीत काळजी घेणे आवश्यक असते. बटाटा काढणीनंतर घ्यावयाची काळजी
काढणीनंतर लगेचच बटाटे गोळा करून सावलीत ठेवावे. खराब, कापलेले तसेच हिरवे बटाटे काढून टाकावे. काढणीनंतर बटाट्यावर ‘पाकोळी’ या किडीचा मादी पतंग अंडी घालतो. परिणामी साठवणुकीत बटाटे खराब होतात. वेळीच नियंत्रण न झाल्यास पूर्णतः नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे काढणी केलेला बटाटा रात्रभर उघड्यावर ठेवू नये. तसेच गोळा केलेल्या बटाट्यावर लिंबाच्या पाल्याचा किंवा घाणेरीच्या पानाचा एक थर द्यावा. काढलेल्या बटाट्याच्या आकारमानानुसार मोठ्या, मध्यम आणि लहान अशी प्रतवारी करून घ्यावी. बटाटा साठवणुकीच्या पद्धती
बटाटा काढणीनंतर, बाजारभाव कसा आहे? त्यानुसार साठवणूक करावी. बाजारात पाठवताना साल घट्ट असणारा व स्वच्छ बटाटा जाळीदार पोत्यात भरूनच पाठवावा. बटाटा साठवणुकीसाठी अरण पद्धती आणि शीतगृह पद्धतीचा उपयोग करावा. साठवणुकीसाठी हवेशीर आणि उंचावरील जागा निवडावी. यामध्ये साठवणुकीकरिता ३ मीटर लांब x १.५ मीटर रुंद खड्डा घेतला जातो. सुरुवातीला खड्यामध्ये पाणी शिंपडून आर्द्रता नियंत्रित केली जाते. खड्याचा तळ आणि बाजू ठोकून घट्ट केल्या जातात. या खड्यात बटाटे ठेवून जमिनीच्यावर १ मीटरपर्यंत रास लावली जाते. त्यावर अंदाजे ३० सें. मी. वाळलेल्या गवताचा आणि कडू लिंबाच्या पाल्याचा थर देण्यात येतो. खड्यातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी मधूनमधून पाणी शिंपडण्यात येते. बाजारभाव अनुकूल नसल्यास आणि बटाटे २ ते ३ महिने साठवायचे असल्यास या पद्धतीचा उपयोग होतो. या साठवणुकीत अवेळी पाऊस तसेच इतर ठिकाणावरून त्यात पाणी शिरणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. बटाटा काढणीनंतर तो जाळीदार पोत्यात भरून नजीकच्या शीतगृहात ठेवला जातो. बटाटा बियाणे म्हणून उपयोग करावयाचा असल्यास शीतगृहातील तापमान ३ ते ४ अंश सेल्सिअस तापमान ठेवावे लागते. बटाटा खाण्यासाठी उपयोगात आणायचा असेल तर १२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात ठेवावा लागतो. अरण पद्धतीपेक्षा शीतगृहातील बटाटा अधिक काळ टिकतो. संपर्क ः डॉ. गणेश बनसोडे, ७५८८६०५७५९ (अखिल भारतीय समन्वित बटाटा संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे)