शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची वाटचाल

पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले रूपडे बदलले आहे. पुरंदर उपसा सिंचन योजना, स्थानिक पातळीवर जलसंधारणाची कामे आणि व्यावसायिक शेती अशा संकल्पना व दृष्टिकोन समोर ठेऊन त्यादृष्टीने कामे पूर्णत्वास नेली. गावात फळबागांसह, पॉलीहाऊसेस व त्यात फूलशेती बहरत आहे. निसर्ग पर्यटन व्यवसायाकडे घेऊन जाण्यासाठी गावाचे नेतृत्व प्रयत्नशील आहे.
वृक्षलागवड व पाॅलीहाऊस शेतीला वाघापूूर गावाने चालना दिली आहे.
वृक्षलागवड व पाॅलीहाऊस शेतीला वाघापूूर गावाने चालना दिली आहे.

पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले रूपडे बदलले आहे. पुरंदर उपसा सिंचन योजना, स्थानिक पातळीवर जलसंधारणाची कामे आणि व्यावसायिक शेती अशा संकल्पना व दृष्टिकोन समोर ठेऊन त्यादृष्टीने कामे पूर्णत्वास नेली. गावात फळबागांसह, पॉलीहाऊसेस व त्यात फूलशेती बहरत आहे. निसर्ग पर्यटन व्यवसायाकडे घेऊन जाण्यासाठी गावाचे नेतृत्व प्रयत्नशील आहे.   पुणे जिल्ह्यातील पुरंदर हा पूर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जायचा. याच तालुक्यात वाघापूर गाव वसले आहे. पुणे शहरापासून सुमारे ४० किलोमीटर तर सासवडपासून पूर्वेकडे १२ किलोमीटरवर असलेले हे गाव देखील दुष्काळाच्या छायेखालीच होते. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या संकल्पनेतून २००४ मध्ये पुरंदर उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाली. त्याचा वाघापूर गावाबरोबरच परिसरातील ६४ गावशिवारांना फायदा झाला. कोरडवाहू शेती ओलिताखाली येऊन फळबागा वाढल्या. केवळ वाघापूर गावातील सुमारे दीड हजार एकर क्षेत्राला लाभ झाला. सीताफळ, डाळिंब, अंजीर, पेरूच्या बागांसह ऊस शेती चांगल्या प्रकारे फुलू लागली. काही शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस शेती सुरु केली. गावात सुमारे १५ पॉलिहाऊसेस उभारण्यात आली असून त्यात गुलाब, जरबेरा, कार्नेशनची शेती होऊ लागली आहे. शेतीचे व्यावसायिक मूल्य ध्यानात आल्याने रोजगारासाठी शहरांमध्ये गेलेले तरुण पुन्हा गावी परतून शेतीत गुंतले. विकासासाठी प्रयत्नशील लोकसहभाग, प्रशासन, जुनेजाणते ग्रामस्थ व तरुण पिढी यांच्या एकत्रीकरणातून विविध कामांना चालना मिळाली. त्यातून प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला भवन, अंगणवाडी, शाळा, समाज मंदिरे उभी राहिली. सामाजिक बांधिलकी म्हणून खास आषाढी वारीसाठी जाणाऱ्या गावातील वारकऱ्यांसाठी पंढरपूर येथे लोकवर्गणीतून तीन गुंठे क्षेत्रात सर्व सुविधांनी युक्त वास्तू उभारली. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी मिळण्यासाठी जल शुद्धीकरण केंद्र उभारले आहे. आता प्रत्येक वाडी- वस्तीला पाणी पुरवठा केला जाणार आहे. कोरोना संकटातील कार्य शासनाने दिलेल्या सूचना आणि आचारसंहिता यांचे काटेकोर पालन करत कोरोना वेशीवरच रोखण्याचा प्रयत्न झाला. केंद्र सुरू करून ९० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात यश आले. विलगीकरण कक्षात अनेकांवर यशस्वी उपचार करण्यात आले. उपसरपंच सौरभ कुंजीर यांनी गावातील नागरिकांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी वडील शेखर कुंजीर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘कोव्हिड सेंटर’ची उभारणी केली. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिवस्मृती प्रतिष्ठान आणि सासवड नगर परिषदेच्या वतीने कुंजीर यांना आमदार संजय जगताप यांच्या हस्ते गौरविण्यात आले कंपोस्ट खत प्रकल्प प्रत्येक घरातील कचरा संकलित करून कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. प्रति दिन दो टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. तयार होणाऱ्या खताची शेतकऱ्यांना नाममात्र दरात विक्री केली जाणार आहे. दर्जेदार शिक्षण सुविधा गावात पूर्वीच्या काळात केवळ सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षणाची सोय होती. पुढील शिक्षणासाठी सासवडसह परिसरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जावे लागायचे. ही अडचण लक्षात घेऊन माध्यमिक शिक्षणाच्या सोयीसाठी गावातील प्रमुख मंडळी एकत्र आली. त्यातून सन १९६२ मध्ये पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. त्यासाठी कै.. विश्‍वास गणपत कुंजीर यांनी २२ एकर जमीन बक्षीस म्हणून दान केली. माध्यमिक शिक्षणासह औद्योगिक शिक्षणासाठी १९९१ साली औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात आली. संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार संभाजीराव कुंजीर यांनी संस्थेचा विस्तार केला. इंग्रजी माध्यमाच्या शाळेसह सात शाखा तालुक्यासह व शेजारील तालुक्यात सुरू केल्या. दर्जेदार शिक्षणातून अनेक विद्यार्थी शासकीय अधिकारी, डॉक्टर, अभियंते, पोलिस अधिकारी झाले आहेत. काहीजण सैन्यात भरती झाले. पर्यावरणपूरक पर्यटन विकास आर्थिक व्यवस्थापनात उच्चशिक्षित असलेले उपसरपंच सौरभ कुंजीर यांचे ग्रामविकासाबाबत आधुनिक विचार आहेत. गावच्या विकासात शेती हा महत्त्वाचा घटक आहेच. पण त्याबरोबर स्थानिक पातळीवरील पर्यावरण निसर्ग आणि ऐतिहासिक वारशाचा चांगल्या पद्धतीने वापर करण्याचे त्यांनी ठरवले. त्यादृष्टीने पर्यावरणपूरक पर्यटन विकासाची संकल्पना मांडली आहे. त्याचा सविस्तर आराखडा करण्याचे प्रयत्न सुरु आहे. वनविभागाच्या सहकार्याने वन पर्यटन आणि कृषी पर्यटन केंद्रे उभारण्यासाठी विशेष प्रयत्न आणि प्रोत्साहन दिले जाणार आहे. गावाशिवारालगत वनक्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. याठिकाणी मोर, ससे, चिंकारा आदी पशुधन मोठ्या प्रमाणावर आहे. या ठिकाणी चिंकारा निसर्ग पर्यटनाचा विकास झाल्यास गावातच तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे अशी संकल्पना आहे. प्रतिक्रिया गावपरिसरात मोठ्या प्रमाणावर गायरान आहे. सासवडसह परिसरातील शहरे विकसित होत असताना शेतमालाला स्थानिक पातळीवरच बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकरी बाजार उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी शेतमालाची शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री करता येणार आहे. या बाजारात साठवणगृह, शीतगृहासारख्या सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. -रेवती कुंजीर सरपंच, वाघापूर  संपर्क- ८६६९३४९४९४ शेतकरी प्रतिक्रिया पारंपारिक शेतीत बदल करत २०१५ मध्ये १० गुंठ्यावर कार्नेशन आणि गुलाब उत्पादनासाठी पॉलिहाऊस उभारले. त्यात यश मिळाले. आत्मविश्‍वास वाढल्याने पुन्हा १० गुंठे क्षेत्र वाढविले. नव्याने एक एकरांत अंजीर लागवड केली आहे. -विक्रम कुंजीर- ९८२२७८९८०० सीताफळाची ९००, अंजिराची १२० तर चिकूची सुमारे ४० झाडे आहेत. यावर्षी सीताफळात आंतरपीक म्हणून कोथिंबीर केली. पावसाने भिजल्याने कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले.अन्यथा या प्रयोगातून चांगले उत्पन्न हाती पडले असते. नवे प्रयोग करीत राहणार आहे. -हणमंत गायकवाड-  ७२१८८७२७३२   संपर्क- सौरभ कुंजीर- ९८६०६३०५४३ उपसरपंच

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com