वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाई

वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाई
वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाई

सातारा जिल्ह्यातील वेळी गावाने एकजुटीने पाणीटंचाईविरुध्द लढा उभारला. कामांची गरज, नियोजनबद्ध श्रमदान, लोकसहभाग, चिकाटीच्या जोरावर गावाने जलसंधारणाची विविध कामे यशस्वी करून दाखविली. टॅंकरमुक्त होऊन पाण्याची शाश्‍वती निर्माण केलेल्या या गावाने पुरस्कारांवर यशाची मोहर उमटवली आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांतील अनेक गावांत पाणीटंचाईमुळे टँकर सुरू करावे लागतात. यापैकी वेळू (ता. कोरेगाव) हे सुमारे १६०० लोकसंख्या असलेले गाव. गावच्या आखत्यारित सुमारे साडेबाराशे हेक्टर जमीन आहे. त्यात वन विभागाचे अडीचशे हेक्टर क्षेत्र आहे. भर उन्हाळ्यात गावाला टँकरवर विसंबून राहावे लागण्याची परिस्थिती २०१२-१३ पर्यंत होती. अनेकवेळा पिके जळून जायची. तीनशे फूट खोल बोअर घेतले तरी पाणी लागायचे नाही. या संकटामुळे गावातील अनेकांना उदरनिर्वाहासाठी शहरात स्थलांतर करावे लागले. मधल्या काळात गावात महिलाराज प्रस्थापित झाले. सरपंचपदी पूनम भोसले, ग्रामसेविकापदी माया इंगवले, कृषी सहायिका वैशाली सुतार तर पोलिसपाटीलपदी रूपाली बुधावले यांच्या हाती कारभार आला. त्यांनी प्रतिकूल परिस्थिती बदलण्याचे मनावर घेतले. त्यासाठी गावातील तरुण व ग्रामस्थांची मदत घेण्याचे ठरले. श्रमदानाचे काम सुरू पाणीसमस्य दूर करण्यासाठी जलसंधारणाची कामे होणे आवश्‍यक होते. त्यासाठी सातारा येथील अजिंक्यतारा गडावर श्रमदान करणाऱ्या अजिंक्य ग्रुपशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तयारी दर्शविली. काम सुरू करण्याआधी गावात जलसंधारणाच्या झालेल्या जुन्या कामांची माहिती घेण्यात आली. पुढील कामांसाठी श्रमदान करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली. मात्र, आवश्यक प्रतिसाद मिळाला नाही. मात्र तरुणांनी स्वतः पुढाकार घेत चरी व बांध बांधण्यास सुरुवात केली. साताऱ्यात वास्तव्य असलेले शरद भोसले, दुर्याधन भोसले, अनिल सुर्यवंशी यांनीही मदतीचा हात दिला. या दरम्यान पाणी फाउंडेशनची ‘सत्यमेव जयते वॅाटर कप’ स्पर्धा जाहीर झाली. यामध्ये वेळूतील या तरुणांनी भाग घ्यायचे ठरले. प्रशिक्षण ठरले महत्त्वाचे स्पर्धेत सहभागी झाल्यावर पुन्हा ग्रामसभा झाली. त्या वेळी जलसंधारणाच्या कामांत ग्रामस्थांचा काही प्रमाणात सहभाग वाढला. स्पर्धा जिंकायची असा निर्धार झाल्यानंतर श्रमदान करणाऱ्यांची संख्या वाढली. स्पर्धेला ४५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. स्पर्धेतील नियम समजून घेतले. केवळ पाण्याची पातळी वाढविणे एवढेच उद्दिष्ट नव्हते. ग्रामस्वच्छतेसह अन्य बाबीही महत्त्वाच्या होत्या. त्यानंतर गावातील १२ तरुणांनी हिवरे बाजार येथे चार दिवसांचे प्रशिक्षण घेतले. यातून सीसीटी, डीप सीसीटी, बांध बंदिस्ती, ओढा खोली- रुंदीकरण, गॅबियन बंधारे स्ट्रक्चर आदी कामांची माहिती घेतली. कामांना आली गती दररोज सकाळी सात ते दहा व सायंकाळी चार ते सात यावेळेत श्रमदान सुरू असायचे. त्यांच्यासाठी (कै.) दीपक जाधव व सातारा येथे कार्यरत अभियंते संदीप भोसले यांनी अल्पोपहाराची सोय उपलब्ध करून दिली. हळूहळू श्रमदानात महिलांचाही सहभागात वाढत गेला. तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी कामांसाठी लागणारी यंत्रसाम्रगी उपलब्ध करून दिली. खासदार अनु आगा यांच्याकडून ९६ लाख रुपयांचा निधी मिळाला. गावातील अपंग व्यक्तीही कामांत मागे नव्हत्या. एका एका वेळी सातशे ते आठशे लोक श्रमदान करीत असल्याने कामाला गती येत होती. स्वच्छतेबरोबर शोषखड्डे, वृक्षारोपणाचीही कामेही हाती घेण्यात आली. दरम्यान पाऊस झाल्याने जलसंधारणाच्या कामांत पाणीसंचय झाला. कष्टाचे चीज झाल्याचे दिसू लागले. गावाकडे फारसे न फिरकरणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची गावात ये जा वाढल्याने अन्य कामांनाही गती आली. अशी झाली जलसंधारणाची कामे

  • जुन्या पाच पाझर तलावांची दुरुस्ती. त्यांची एकमेकांशी सिमेंटपाइपद्वारे जोडणी
  • नव्याने २० विहिरी आणि तीन विंधन विहिरींचे पुनर्भरण
  • दोनशे हेक्टरवर बांधबदिस्ती
  • अडीचशे लूज बोल्डर्स
  • सुमारे ९० हेक्टरमध्ये सीसीटी व डीपी सीसीटी
  • बोअरवेल पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेततळी, सिमेंट बंधाऱ्यांची निर्मिती
  • जलसंधारणाच्या कामात साठलेला गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविली.
  • प्राथमिक शाळा इमारतीच्या छतावरील पावसाचे पाणी एकत्र करून ते पाइपद्वारे बोअरमध्ये सोडण्यात आले.
  • दहा हजारांवर वृक्षारोपण
  • काही शेतकऱ्यांनी कमी अधिक स्वरूपात आपल्या जमिनी कामांसाठी दिल्या.
  • असे झाले बदल

  • गावात पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. गाव टँकरमुक्त झाले.
  • विहिरींच्या पाणी पातळीत कमालीची वाढ. बागायत क्षेत्रात भरीव वाढ
  • ऊस, आले, भाजीपाला पिकांच्या क्षेत्रात वाढ. त्यातून शेतकऱ्यांच्या अर्थाजनात वाढ होण्याची संधी
  • चारा मुबलक प्रमाणात झाल्याने जनावरांच्या संख्येत वाढ. दुग्ध व्यवसायाला चालना
  • एकेकाळी गावातून लोक मजुरीला बाहेर जायचे. आता बाहेरून मजूर येऊ लागले.
  • गावाकडे काही प्रमाणात निधी उपलब्ध झाला.
  • प्रथम पुरस्काराने सन्मान सन २०१६ मध्ये पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॅाटर कप’साठी प्रथम विजेता म्हणून वेळूची निवड झाल्याचे जाहीर होताच गावात चैतन्य निर्माण झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अभिनेते अमिर खान यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याने उत्साहात भर पडली. जलसंधारणाच्या कामांत पुढेही सातत्य राहिले. राज्य शासनाचा २०१७ मध्ये राज्यस्तरीय दुसरा क्रमांक पटकावून वेळूने आणखी एक बाजी मारली. राज्यशासनाच्या महात्मा फुले जलमित्र पुरस्कारानेही गावचा सन्मान झाला.

    प्रतिक्रिया  गावाने केलेल्या कामांमध्ये सर्व ग्रामस्थांचे योगदान आहे. सातारा येथील अजिंक्यतारा ग्रुप, प्रशासन, कृषी विभाग यांचीही मोठी मदत मिळाली. गावातील एकजुटीमुळे पाणीटंचाईवर मात करता आली आहे याचे समाधान आहे. -पूनम प्रवीण भोसले, माजी सरपंच, वेळू. संपर्क- प्रवीण भोसले- ९८२२४०४०२२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com