पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष हे दृश्य कोकणात पहायला मिळते. काही ठिकाणी नद्या, बंधाऱ्यांतील पाणी शेतापर्यंत आणण्याची आर्थिक क्षमता अल्पभूधारक शेतकऱ्यांत नसते. अशा वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील राजवाडी, धामणी, चिखली या तीन गावांत पाणी योजना प्रकल्प यशस्वी राबविण्यात आला. संघटित ताकद, श्रमदान व आर्थिक आधार यांच्या आधारे तिन्ही गावांतील मिळून शंभर एकर जमीन बारमाही ओलिताखाली आली. शेतकऱ्यांना विविध पिके घेणे शक्य झाले. आर्थिक सक्षम होण्याकडे त्यांची वाटचाल झाली. पारंपरिक पद्धतीने भातशेती आणि उर्वरित आठ महिने मोलमजुरी असा कोकणातील वर्षानुवर्षाचा रिवाज राजवाडी, धामणी, चिखली गावांतही (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) होताच. अन्य पिकं घ्यायची तर आर्थिक पाठबळ आणि मार्गदर्शन आवश्यक होतं. राजवाडीच्या पेम (पिपल्स एम्पॉविरंग मूव्हमेंट) संस्थेचे अध्यक्ष सतीश कामत यांनी ही जबाबदारी स्वीकारली. होतकरू तरुण संतोष भडवळकर, सुहास ऊर्फ बंड्या लिंगायत यांच्यासह मनोहर सुर्वे, गणेश सुर्वे, नंदकुमार मांजरेकर, सुरेश भडवळकर, विलास राऊत, सीताराम बाईत यांच्या पाठीशी ते ठाम उभे राहिले. सरकारी अनुदानात अडकून पडण्यापेक्षा स्वयंस्फूर्ती आणि खासगी आर्थिक सहकार्याच्या जोरावर प्रकल्प राबवण्याचे ठरले. असे खेळले शेतात पाणी
शेती बारमाही ओलिताखाली
स्थानिक बाजारपेठ कृषिरत्न, कृषी विकास पुरुष बचत गटाला कडवई, रत्नागिरी बाजारपेठ मिळाली. संस्थेचे सतीश कामत यांनी शहरातील राजवाडी भाजी गट तयार केला. त्याद्वारे आठवड्यातून तीन वेळा रत्नागिरी शहरात तीन केंद्रांवर विक्री व्यवस्था उभारली. अॅपच्या माध्यमातून भाज्यांची मागणी नोंदविण्याचा उपक्रम राबविला. हंगामात दहा हजार रुपयांपासून ते अगदी ५० हजार, ७५ हजारांपर्यंतचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले. शेततळ्याचा आधार
धामणी, चिखलीतही प्रयोग यशस्वी पाणी योजनेचा राजवाडी पॅटर्न शेजारच्या धामणी गावानेही अवलंबला. प्रकाश भागोजी रांजणे, अमोल लोध, शांताराम बडद, प्रकाश बसवणकर, हरिश्चंद्र बडद यांच्या नेतृत्त्वाखाली श्रीगणेश शेतकरी उत्पादक गटाने पावले उचलली. ‘पेम’चेच मार्गदर्शन लाभले. सहा एकरांत तीन वर्षांत एकूण दीडशे टन केळीचे उत्पादन यशस्वी घेतले. रत्नागिरी, सावर्डे, चिपळूण येथे विक्री झाली. प्रकल्पांतर्गत दहा लाख रुपयांपैकी अडीच लाख रुपये अनुदान तर साडेसात लाख रुपये बीनव्याजी कर्ज ‘बासुरी’तर्फे मिळाले. केळीतील उत्पन्नातून हे कर्ज श्रीगणेश बचत गटाने फेडलेदेखील. ‘बासुरी’ने ‘सीएसआर’अंतर्गत तीनही गावांत सुमारे २० लाख रुपयांचे पाठबळ दिले. प्रयोगांना चालना
तुकड्याची शेती जोडण्याचे प्रयत्न कोकणात तुकड्या-तुकड्याची शेती. त्यामुळे सर्वांना एकत्र आणायचे मोठे आव्हान होते. धामणीतील प्रकाश रांजणे यांनी प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन करार शेती व त्याचे कायदेशीर महत्त्व पटवून दिले. काही शेतमालक मुंबईत वास्तव्याला असलेले. त्यासाठी रांजणे यांनी मुंबई गाठली. त्यातून प्रयत्नांना यश आले व केळीचे उत्पादन घेण्यात श्रीगणेशा बचत गट यशस्वी झाला.
प्रतिक्रिया राजवाडी-ब्राह्मणवाडीतील शेतकऱ्यांच्या वीस एकरांपर्यंत पाणी नेण्यात आले. तिथे बारमाही शेतीला व बहुवीध पीक पद्धतीला चालना मिळाली आहे. -सुहास ऊर्फ बंड्या लिंगायत ९०२२५८२३८९ राजवाडी येथील पाणी व्यवस्थापन व भाजीपाला प्रयोग अभ्यासला. त्याच धर्तीवर धामणीत काम केले. त्यातून ३१ एकर जमीन ओलिताखाली आली. -प्रकाश रांजणे- ९८६०३७७४१४ धामणी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.