सर्वसाधारणपणे ७० ते ७५ दिवसांत ज्वारी फुलोऱ्यात येते. या अवस्थेत पाणी मिळाल्याने कणसात दाणे भरण्यास मदत होते. कणसाचे वजन वाढून एकूण उत्पादन वाढते. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी संरक्षित पाणी द्यावे. सध्या पाण्याची सुविधा असलेल्या ठिकाणी ज्वारी वाढीच्या अवस्थेत आहे. काही जिल्ह्यांत ऑक्टोबरमध्ये विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु, अशा ठिकाणी पिके सुकत असल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याचा अंदाज आहे.
ज्या ठिकाणी ज्वारीची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या व दुसऱ्या पंधरवड्यात झालेली आहे, अशा ठिकाणी ज्वारी पोटरीत तर काही ठिकाणी फुलोऱ्यात आहे. ज्वारी पोटरीत आल्यापासून दाणे भरण्यापर्यंतच्या काळात जास्त ओलाव्याची गरज असते. या काळात ओलावा कमी पडल्यास पीक उत्पादनात घट येते. साधारणपणे पेरणी केल्यानंतर ५० ते ५५ दिवसांनी पीक पोटरीत येते. या वेळी कणीस ताटातून बाहेर पडण्याच्या अवस्थेत असते. पिकांची वाढ शेवटच्या पानापर्यंत झालेली दिसून येते. अशा वेळी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय असेल त्यांनी पाणी दयावे. पाणी मिळाल्याने ज्वारी निसवण्याची प्रक्रिया पूर्ण होते. अन्नद्रव्ये ताटातून कणसात जाण्यासाठी फायदा होतो. कणसांचा आकार मोठा होण्यास मदत होते. कोरडवाहू ज्वारी पिकाची उत्पादनक्षमता ही प्रामुख्याने जमिनीतील साठविलेल्या ओल्याव्यावरच अवलंबून असते. जमिनीवरच्या थरातील पाणी बाष्पीभवनामुळे उडून गेल्यास जमिनीस भेगा पडतात. ज्वारीची पेरणी केल्यानंतर पाऊस न झाल्यास ३० ते ३५ दिवसांनी जमिनीस भेगा पडण्यास सुरवात होते. सद्य परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यात बहुतेक पिके ही पोटरी अवस्थेत तर काही फुलोऱ्यात आहेत आणि बहुतांश जमिनीस मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत. पोटरी अवस्थेत असणाऱ्या पिकास दातेरी कोळप्याने कोळपणी करावी. या वेळी टणक झालेल्या जमिनीवरून कोळपे ओढणे अवघड जाते. दातेरी कोळप्याच्या दातऱ्यांचा कोन कोळपे ओढण्यास सोपा जाईल असा असावा. दातेरी कोळप्यामुळे जमिनीवरील भेगा बुजण्यास काही प्रमाणात मदत होते आणि या कोळपणीचा उपयोग ज्वारीच्या फुलो-यास मदत होते. नंतर पडणाऱ्या थंडीमुळे दाणे भरण्याची अवस्था पूर्ण होते. ज्वारी पिकास तिसऱ्या, पाचव्या आणि आठव्या आठवड्यातील कोळपणीमुळे ज्वारीचे पीक हाती येण्यास हमखास यश येते. पिकाचा जोमदार वाढीचा काळ (पेरणीनंतर २८ ते ३० दिवस) पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी ) पीक फुलोऱ्यात असताना (पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी) कणसात दाणे भरण्याचा काळ (पेरणीनंतर ९० ते ९५ दिवस) सर्वसाधारणपणे ७०-७५ दिवसांत ज्वारी फुलोऱ्यात येते.या अवस्थेत पाणी मिळाल्याने कणसात दाणे भरण्यास मदत होते. कणसाचे वजन वाढून उत्पादन वाढते. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल त्यांनी ज्वारीस पाणी द्यावे. ज्वारीची पेरणी झाल्यानंतर ९०-९५ दिवसांत दाणे चिकाच्या अवस्थेत असतात. पिकास पाण्याची गरज असल्यास चौथे पाणी द्यावे. हलक्या व मध्यम जमिनीतील ज्वारीस या पाण्याची गरज भासते. भारी जमिनीत ओल धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. तसेच या अवस्थेत काळ्या भारी जमिनीस भेगा पडलेल्या असतात. भेगाळलेल्या जमिनीस पिकाला पाणी देणे अवघड होते, गरजेपेक्षा जास्त पाणी द्यावे लागते. ज्वारी लोळण्याचे प्रमाण वाढते. भारी जमिनीत तीन पाणी दिले असता मिळणारे उत्पादन, चारा पाण्याच्या उत्पादनाच्या जवळपास मिळते. कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाणी देण्यासाठी तुषार सिंचन पद्धत फायदेशीर दिसून आली आहे. कमी पाणी उपलब्ध असल्यास तुषार सिंचनाने पीक वाचविता येते. मात्र एक पाणी उपलब्ध असल्यास पेरणीनंतर २८-३० दिवसांनी किंवा ५०-५५ दिवसांनी पाणी दिल्यास ज्वारीची वाढ चांगली होऊन हमखास उत्पादन मिळू शकते. दोन पाणी उपलब्ध असल्यास पहिले पाणी २८-३० व दुसरे पाणी ५०-५५ दिवसांनी द्यावे. याप्रमाणे संरक्षित पाणी दिल्यास ज्वारीच्या उत्पादनात २५-३० टक्क्यांनी वाढ होते. संपर्क ः डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)