धार्मिक भावनेने उपवास करताना शारीरिक आरोग्यही जपले गेले पाहिजे. उपवासामुळे काही प्रमाणात अनारोग्य निर्माण होऊ शकते. अशा वेळी नेमकी काय काळजी घ्यावी आणि उपवास करताना काय सेवन करावे ज्याचा त्रास होणार नाही याची माहिती असावी लागते.
सध्या व्रतवैकल्याचे दिवस असल्यामुळे बऱ्याच महिला उपवास करतात. आरोग्य उत्तम असेल तरच आपण उत्सव साजरा करू शकतो. नऊ दिवसांच्या उपवासाच्या काळात प्रथम खूप कडक उपवास न करणे, हे पथ्य पाळावे.
फळांवर भर द्यावा. सफरचंद, चिकू, डाळिंब, मोसंबी अशी फळे शिवाय खजूर, दाण्याचा लाडू, राजगिरा वडी, फळांचे रस भरपूर प्रमाणात घ्यावेत. उपवास असला तरी आपले श्रम कमी होत नाहीत. त्यामुळे थकवा न येण्यासाठी फळांवर भर द्यावा.
उपवासाचे पदार्थ म्हटले की साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, वेफर्स, चिवडा, वरई (भगर), दाण्याची आमटी, तळलेले पदार्थ इत्यादी सर्व पदार्थ खाल्ले जातात. या पदार्थांऐवजी उपवासाला चालणाऱ्या भाज्या खाव्यात. लाल भोपळा, भेंडी, काकडीची भाजी यामुळे त्रासही होत नाही आणि पोटही भरते. साबुदाण्याची खिचडी सारखी खाल्ल्यास पोटात दुखू शकते. गॅसेस, बद्धकोष्ठता होऊ शकते. वेफर्स चिवडा जास्त प्रमाणात सेवन केल्यास घसा दुखणे, खोकला येणे असे त्रास होतात. वऱ्याचे तांदूळ उष्ण असतात. त्यामुळे प्रमाणात खावेत. नाहीतर त्याने जळजळ, छातीत आग होणे, डोळ्यांची आग अशी लक्षणे उद्भवू शकतात. दाण्याची आमटी पित्तकारक असते. त्यामुळे शक्यतो टाळलेली बरी! त्याऐवजी गोड ताक, गरम दूध घ्यावे. दही, आंबट ताक घेऊ नये. पाणी भरपूर प्यावे. उपवासाचे थालिपीठ, साबुदाण्याची लापशी किंवा साबुदाणा भिजवून शिजवून त्यात जिरेपूड मीठ घालून खावे. त्याने त्रास होत नाही. पित्ताचा त्रास झाला तर उलट्या डोकेदुखीचा त्रास होतो. अशावेळी सूतशेखरवटी, मोरावळ्यासह घ्यावी. त्रासाच्या तीव्रतेनुरूप डोस ठरवावा लागतो. आवळा आणि ज्येष्ठ मध २ चमचे प्रत्येकी एकत्र करून अर्धा चमचा पावडर पाण्यासह घ्यावी. याने छातीतील जळजळ कमी होते. शिवाय कामदुधा वटी, प्रवाळ पिष्टी वटी पाण्यासह घेतल्यास फायदा होतो. तज्ज्ञांच्या सल्ल्याने मात्रा ठरवावी. काही वेळा वेळी - अवेळी थंड दूध, खिचडी सेवन केल्यास पोट बिघडते. अशावेळी सुंठ पावडर घालून पाणी उकळून प्यावे. शंखवटी २ गोळ्या पाण्यासह घ्याव्यात. पाणी गरम प्यावे. लघुसूतशेखर संजीवनी वटी, कुटजारिष्ट या अवस्थेत उत्तम काम करतात. पण व्यक्तिपरत्वे मात्रा भिन्न असल्याने वैद्यांचा सल्ला घ्यावा. अपचन झाल्यास मात्र गरम पाणी पिऊन लंघन करावे. उपवास आहे म्हणून चहा, कॉफी जास्त प्रमाणात घेऊ नये. ताक सरबत, गरम दूध प्यावे. केळ्याचे शिक्रण, फ्रूटसॅलड याने पचन बिघडते. त्यामुळे फळे खावीत. फळ आणि दूध एकत्र करू नये. फार वेळ पोट रिकाम ठेवू नये. फळांवर भर देताना पपई, सीताफळे मात्र कमी खावीत. पपईने उष्णता वाढते. सीताफळ कफ निर्माण करतात. (लेखिका पुणे येथे अायुर्वेद तज्ञ अाहेत.)