रंगीत ढोबळी मिरची शेतीत युवकाची आश्‍वासक वाटचाल

निखील ठिकेकर या युवकाची रंगीत ढोबळी मिरचीची शेती
निखील ठिकेकर या युवकाची रंगीत ढोबळी मिरचीची शेती

प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध ठिकेकरवाडी (जि. पुणे) येथील निखिल प्रमोद ठिकेकर या युवा शेतकऱ्याने पॉलिहाउसमध्ये रंगीत ढोबळी मिरचीची शेती सुरू केली आहे. कृषीची पदवी घेतलेल्या या तरुणाने पहिल्या वर्षी चांगले उत्पादन घेत आपल्या प्रयत्नांची चुणूक दाखवली आहे. जिद्द व अभ्यासाच्या जोरावर या युवकाने आत्मविश्‍वासपूर्वक हायटेक शेतीत पावले टाकण्यास सुरूरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील ठिकेकरवाडीने (ता. जुन्नर) ग्रामविकासात आपला ठसा उमटवला आहे. प्रयोगशीलता व उपक्रमशीलतेने आदर्श या गावाने घडवले आहेत. याच गावातील निखिल प्रमोद ठिकेकर यांची घरची अडीच एकर शेती आहे. कृषी पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर निखिलने स्पर्धा परीक्षांवर लक्ष केंद्रित केले. तीन वर्षे बॅंकिंग क्षेत्रातील परीक्षेची तयार केली. मात्र अपेक्षित यश येत नसल्याने पुन्हा शेतीवरच लक्ष केंद्रित केले. ‘पॉलिहाउस’द्वारे आधुनिक शेती घरच्या शेतीत भाजीपाला आणि ऊस यांचे उत्पादन होत होते. मात्र आधुनिक प्रकाराने व त्यातही संरक्षित शेती करावी असे निखिल यांच्या डोक्यात होते. त्यासाठी त्यांनी २०१८ मध्ये २० गुंठे क्षेत्रावर पॉलिहाउसची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. त्याच रंगीत ढोबळी मिरची घेण्याचा त्यांचा विचार होता. मात्र त्यापूर्वी विविध ठिकाणी असलेल्या पॉलिहाउसेसना त्याने भेटी दिल्या. शेतकऱ्यांशी चर्चा करून अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर पालिहाउस उभारणीला सुरुवात केली. कृषीशास्त्राचा अभ्यास केला असला, तरी प्रत्यक्ष शेतात काम करताना अनेक अडचणी येत गेल्या. अनेक किडी, रोग हे लक्षात येत नव्हते. मात्र पॉलिहाउसमध्ये काम करताना अनुभवातून अनेक गोष्टी शिकता आल्या. याबाबत तज्ज्ञांशी चर्चा केली. कीड नियंत्रण व सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत पंकज परदेशी, नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे धनेश पडवळ यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. आई शुभांगी आणि वडील प्रमोद ठिकेकर यांनी बरोबरीने शेतात उभे राहून, सतत प्रोत्साहन दिले. पॉलिहाउस उभारणी व तंत्रवापर सध्या निखिल यांचे २० गुंठ्यात पॉलिहाउस आहे. त्याची रचना, आराखडा, उभारणी, ॲंगल्स,  माती आणून ती पसरवणे, बियाणे व पुढील उत्पादन खर्च असा सुरुवातीला २५ लाख रुपये खर्च आला. भांडवल उभारणीसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रमधून कर्ज घेतले. ठिकेकरवाडी परिसरात काळी माती आहे. मात्र पॉलिहाउससाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन कोकणातून लाल माती आणली. त्याचा १६० ते १७० ब्रास एवढा वापर केला. त्यापूर्वी जमिनीवर १०० ब्रास मुरमाचा थर दिला. तापमान नियंत्रणासाठी फॉगर्स लावले. शिवाय वरून जाळीची (नेट) व्यवस्था केली. ठिबक सिंचनाचा वापर तर झालाच. कृषी विभागाच्या योजनेतून १० लाख रुपयांचे अनुदान मिळाले. व्यवस्थापनातील मुद्दे

  • लागवडीसाठी पिवळा आणि लाल अशा दोन रंगांच्या वाणांची निवड केली. पैकी
  • एक वाण ‘भुरी’ रोगाला प्रतिकारक आहे.
  • साडेतीन फूट रुंद आणि दीड फूट उंचीचा बेड तयार केला.
  • दोन बेडसच्या मध्ये दीड फुटाचा मोकळा रस्ता (पाथवे) ठेवला. दोन रोपांमध्ये दीड फुटांचे अंतर ठेवले. झाडाला पॉलिथीन दोरीचा आधार दिला.
  • प्रत्येक वाणाची एकाड एक ओळ घेतली.
  • किडींच्या नियंत्रणासाठी घरच्या घरी सापळा तयार केला. यासाठी तेलाचे पत्र्याचे डबे कापून त्याला पिवळा रंग दिला आहे. त्यात एक हजार वॅटचा दिवा लावला. त्याकडे किडी आकर्षित होऊन तापलेल्या डब्यात पडून मरून जातात. चिकट सापळ्यांचाही गरजेनुसार वापर होतो.
  • ठिकेकरवाडीने उभारलेल्या सामूहिक बायोगॅस प्रकल्पातून द्रवरूप स्लरी मोफत उपलब्ध होते. त्याचा अधिकाधिक वापर केल्याने पिकाची प्रतिकारशक्ती वाढली आहे.
  • पहिले आश्‍वासक उत्पादन एकूण व्यवस्थापनातून पहिल्या वर्षी सुमारे २० टन उत्पादन मिळाले. हे पीक ९ ते १० महिने चालले. रोपांची उंची ८ ते ९ फुटांपर्यंत वाढली. वीस गुंठ्यात सुमारे साडेपाच हजार झाडे होती. प्रति झाडापासून सुमारे ४ ते ५ किलो उत्पादन मिळाले. यंदा ऑक्टोबरमध्ये लागवड करण्यात आली असून जानेवारीपासून तोडणी सुरू झाली आहे. आत्तापर्यंत सुमारे दीड टन माल पाठवण्यात आला आहे. त्यास सध्या किलोला ७० रुपये दर मिळतो आहे. यंदाही २० टन उत्पादनाची आशा आहे. तोडणी, पॅकिंग आणि विक्री फळावर ८० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात रंग विकसित झाल्यानंतर काढणी केली जाते. ग्राहकांच्या हाती जाईपर्यंत पूर्ण रंगीत मिरची विक्रीसाठी उपलब्ध होते. सफरचंदाच्या रिकाम्या बॉक्समध्ये २५ किलो वजनाचे पॅकिंग केले जाते. मुंबई बाजार समितीत निवडक व्यापाऱ्यांकडे विक्री केली. त्यास किलोला ४० रुपयांपासून ते कमाल १५० रुपये तर सरासरी ५० रुपये दर मिळाला. घरातील सदस्य शेतीत राबत असल्याने मजुरीवरील खर्चात बचत झाली. गरजेच्या वेळी मात्र आवश्यकतेनुसार मजुरांची मदत घ्यावी लागली. विक्री झाल्यानंतर बाजार दरांप्रमाणे थेट खात्यावर पैसे जमा केले जातात. बाजारपेठ व दरांची स्थिती पहिल्या वर्षी जुलैमध्ये लागवड केल्याने ऑक्टोबरमध्ये काढणी सुरू झाली. त्या वेळी दसरा, दिवाळी, पितृपंधरवडा आदी सण उत्सवाच्या कालावधीत खूपच कमी दर मिळाले. त्यामुळे उत्पादन तोट्यात जाऊन पीक निवड फसल्याची भीती निर्माण झाली. मात्र पुढे दरांनी समाधानकारक स्थिती निर्माण केली. जानेवारी ते मार्च या काळात देशाच्या विविध भागांसह परदेशातून मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. या काळात मोठ्या हॉटेलचालकांकडून रंगीत ढोबळी मिरचीला मोठी मागणी असते. या काळात उच्चांकी दर मिळतात. फुले, परदेशी भाज्या व स्ट्रॉबेरी येत्या काळात पॉलिहाउसमधील फूलशेती, लेट्यूस, ब्रोकोली, चायनीज कोबी आदी परदेशी भाजीपाल्याची लागवड करायची आहे. जुन्नर परिसरात लेण्याद्री, ओझर, शिवनेरी आदी पर्यटन स्थळे असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. त्याचा फायदा करून घेत स्ट्रॉबेरीची लागवड व थेट विक्रीचेही नियोजन आहे. पॉलिहाउसचे क्षेत्रही वाढवण्याचा विचार आहे.

    संपर्क- निखिल ठिकेकर- ७०२०७३७७१४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com