आठवडाभर विस्तृत स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता

आठवडाभर विस्तृत स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता
महाराष्ट्रासह दक्षिण भारतात हवेचे दाब कमी होत आहेत. ९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल, तर १० सप्टेंबर रोजी १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होत असल्याने सद्यःस्थितीत दक्षिण भारताच्या भागावरील ढगांचे समूह उत्तर दिशेने वारे लोटतील आणि ९ ते १६ सप्टेंबरच्या काळात काही काळ उघडीप, तर काही काळ विस्तृत स्वरूपात पाऊस होईल. १४ ते १६ सप्टेंबरच्या काळात कोकणात मुंबईसह विस्तृत स्वरूपात पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रात ९ ते १४ सप्टेंबरपर्यंत विविध भागांत विस्तृत स्वरूपात पावसाची शक्‍यता राहील. उत्तर महाराष्ट्रात १० सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या काळात चांगल्या पावसाची शक्‍यता राहील. मराठवाड्यात १३ व १४ सप्टेंबरच्या कालावधीत विस्तृत स्वरूपात पावसाची शक्‍यता राहील. तर विदर्भात १२ ते १५ सप्टेंबरच्या कालावधीत विस्तृत स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. १ सप्टेंबर ही ईशान्य मॉन्सूनची म्हणजेच परतीच्या मॉन्सूनची निर्धारित तारीख असली, तरी या वेळी ती १२ ते १५ सप्टेंबरपर्यंत लांबेल अशी स्थिती आहे. कारण १५ ते १६ सप्टेंबरपर्यंत वारे दक्षिणेकडून उत्तरकडे वाहण्याची शक्‍यता आहे. परतीच्या मॉन्सूनच्या वेळी वारे दिशा बदलतात. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून दक्षिणेकडे असते. त्यामुळे त्याला ईशान्य मॉन्सून म्हणून संबोधले जाते. राजस्थानच्या भागातून प्रथम मॉन्सून परतण्यास सुरवात होते. महाराष्ट्रातून मॉन्सून परतण्याची सर्वसाधारण वेळ १ ऑक्‍टोबर असली, तरी या वर्षी महाराष्ट्रातून मॉन्सून १० ते १२ ऑक्‍टोबरदरम्यान परतेल. या सर्व काळात महाराष्ट्राच्या पूर्व भागात २७० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस होणे अपेक्षित आहे. त्यामुळे यापुढे चांगले पाऊस होतील, अशी अपेक्षा करण्यास काही हरकत नाही. कोकण ः या आठवड्यात कोकणात चांगल्या पावसाची शक्‍यता असून, काही दिवशी १० मिलिमीटर अथवा त्याहून अधिक पाऊस होणे शक्‍य आहे. वाऱ्याच्या दिशेत बदल होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. रायगड जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील, तर ठाणे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ९ किलोमीटर राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. तर ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. उत्तर महाराष्ट्र ः उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता असून, धुळे व जळगाव जिल्ह्यांत काही दिवशी ७ मिलिमीटर, तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत काही दिवशी १० ते १२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किलोमीटर राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. मराठवाडा ः मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत ९ ते १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील, तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ किलोमीटर राहील. बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. तर उस्मानाबाद, लातूर व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ५८ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ ः पश्‍चिम विदर्भात प्रतिदिनी ३ ते ६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून काही दिवशी पावसात वाढ होणे शक्‍य आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर इतका कमी राहील. कमाल तापमान अकोला व वाशिम जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस तर अमरावती व बुलढाणा जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस किमान तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस तर बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. मध्य विदर्भ ः मध्य विदर्भात पावसाचे प्रमाण ४ ते ९ मिलिमीटर राहील. यवतमाळ जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर राहील. यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. तर वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. तर यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. पूर्व विदर्भ ः सर्वच जिल्ह्यांत काही दिवशी ५ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किलोमीटर राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र ः या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्‍यता असून, काही दिवशी सांगली व सातारा जिल्ह्यांत १० ते ११ मिलिमीटर, तर सोलापूर व नगर जिल्ह्यांत १६ ते १९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत ५ ते ९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून, तर सांगली व नगर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ९ किलोमीटर राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. कृषी सल्ला ः
  • जमिनीत चांगला ओलावा असताना करडई, जवस व रब्बी ज्वारीची पेरणी करावी.
  • रब्बी पिकांची निवड पाण्याची उपलब्धता, पावसाचे प्रमाण आणि कालावधी यानुसार ठरवावी.
  •  पेरणीनंतर सारे व पाट पाडावेत त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरेल आणि पिकांची वाढ चांगली राहील.
  • खरीप पिकाची काढणी झालेल्या शेताची पूर्वमशागत करताना एक नांगराची पाळी देऊन कुळवाची पाळी द्यावी. काडीकचरा वेचून जमीन रब्बी पिकांच्या पेरणीसाठी तयार करावी. - डॉ. रामचंद्र साबळे (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अाणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
  •  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com