नगर जिल्ह्यामधील पुणतांबा (ता. राहाता) हे पौराणिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव. येथील ग्रामस्थांनी सरकारी योजनांना लोकसहभाग आणि श्रमदानाची जोड देत ग्राम आणि शेतीविकासाला चालना दिली आहे.
पुणतांबा (ता. राहाता, जि. नगर) गावाच्या परिसरातून गोदावरी नदी वाहते. मध्यंतरीच्या काळात पुरेसा पाऊस झाला नाही, तसेच गाव शिवारातील नाले, ओढे आणि जुन्या काळातील बंधारे गाळाने बुजल्याने पाणी साठवण होत नव्हती. पाणी वाहून जाणाऱ्या चरावर अतिक्रमण झाले होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी २०१६ मध्ये सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी पुढाकार घेतला.
पुणतांबा, रस्तापूरमधील ग्रामस्थांना एकत्र करून गाव शिवारातील नाले, ओढे, चर खोलीकरणाचा निर्णय झाला. या उपक्रमाला ‘जलक्रांती’ हे नाव देण्यात आले. जल, मृद संधारणाच्या कामासाठी सरपंच डॉ. धनंजय धनवटे (अध्यक्ष), सुभाष वहाडणे (उपाध्यक्ष), विनोद धनवटे (सचिव) तसेच बापूसाहेब शिंदे (तालुका कृषि अधिकारी), पुरुषोत्तम कात्रजकर (मंडळ कृषि अधिकारी), भाऊसाहेब शिंदे (शेतीतज्ज्ञ) आणि गावातील उपक्रमशील लोकांच्या सहभागातून एकात्मिक पाणलोट विकास समिती तयार करण्यात आली.
गाव शिवारात पाणलोट विकासामधून कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे निधी आला होता. त्याला लोकसहभागाची जोड मिळाली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जनसेवा फाउंडेशनमधून जलसंधारणाच्या कामाला मदत केली. गेल्या चार वर्षांत सुमारे ५२ लाखांचा खर्च झाला. त्यातून साधारण ४० फूट रुंद आणि दहा ते बारा फूट खोल असे २७ किलोमीटर लांबीचे नाले, ओढे आणि जुन्या काळातील सात बंधाऱ्यातील गाळ काढण्यात आला. तसेच जलसंधारण विभागाने दोन नवीन सिमेंट बंधारे बांधले. जल, मृद संधारणाच्या कामामुळे सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होत आहे. खोलीकरणातून साठलेल्या पाण्याचे यंदा माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. स्वच्छतेला प्राधान्य पुणतांब्यात पूर्वीपासून स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. गावाची लोकसंख्या साधारण चोवीस हजार, तीन हजार दोनशे कुटूंबे. आतापर्यंत सुमारे तीन हजार कुटुंबीयांनी वैयक्तिक शौचालये बांधलेली असून, उर्वरित दोनशे कुटुंबाच्या शौचालयाचीही कामे सुरू आहेत. या वर्षभरात स्वच्छ भारत अभियानमधून १,१०० कुटुंबाची शौचालये बांधून त्यांना अनुदान मिळाले. या महिनाअखेर गावातील सर्व कुटुंबांच्या वैयक्तिक शौचालयाची कामे पूर्ण करण्याचे नियोजन झाले आहे.
ग्रामपंचायतीत सुमारे ३० कामगार असून, त्यांना ‘ग्रामदूत’ म्हणून संबोधले जाते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या संकल्पनेतून गावामध्ये प्रत्येक रविवारी स्वच्छता अभियान राबवले जाते. गावकरी एकत्र येऊन गेल्या वर्षापासून ग्रामस्वच्छता करतात. घंटागाडीतून कचरा संकलन केले जाते. गावाच्या सार्वजनिक कामांत महिलांचा चांगला सहभाग असतो. पस्तीस हजार झाडांची लागवड गेल्या चार वर्षांपासून वृक्षलागवडीला लोकांनी महत्त्व दिले आहे. गाव परिसरातील चांगदेव महाराज देवस्थान, वाकडी रोड, पुरणगाव, मातुलठाण, नपावाडी रोड, स्मशानभूमीसह अन्य परिसरात आत्तापर्यंत सुमारे ३५ हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. रोपांच्या संवर्धनासाठी १३० महिलांना रोजगार हमी योजनेतून काम दिले आहे. प्रत्येक महिलेकडे २०० झाडांची जबाबदारी आहे. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांचा वाढदिवसही वृक्ष लागवडीने साजरा केला जातो. पुणतांब्यात साधारण तीन हजार शाळकरी विद्यार्थी आहेत. त्यांच्या मदतीने साठ ते सत्तर हजार रोपांची ‘वृक्ष बॅंक' करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मदतीने पाच रोपे तयार करण्यात येणार आहे. आतापर्यंत गोदावरी नदीकाठी शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने दीड हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. शिवरस्ते केले मोकळे पुणतांबा परिसरातील वस्त्या आणि शेतात जाण्यासाठी लोकसहभागातून शिवरस्ते करण्यात आले. २०१८ मध्ये साधारण १६ किलोमीटर आणि यंदाच्यावर्षी १४ किलोमीटरचे शिवरस्ते मोकळे केले आहेत. या कामांसाठी सरकारी निधीला लोकसहभागाचा जोड दिली. शिवरस्ते मोकळे झाल्याने गाव परिसरातील वस्त्या तसेच शेतात जाण्यासाठीची अडचण दूर झाली.
पीकपद्धतीत झाला बदल पुणतांबा परिसर तसा पूर्वीपासून ऊस पट्टा म्हणून ओळखला जायचा. मात्र अलीकडच्या काळात पाणीटंचाईचे शेतीवर गंभीर परिणाम दिसून आले. उसाची जागा ज्वारी, हरभरासारख्या कोरडवाहू पिकांनी घेतली. मात्र गेल्या चार वर्षांपासून ओढे, नाले, चरांचे खोलीकरण झाले. पाणलोट व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सुमारे ९०० हेक्टर क्षेत्रावर बांध बंदिस्ती झाली. त्यामुळे जमिनीतील पाणीपातळी उंचावण्यास मदत झाली. यामुळे पीकपद्धतीतही बदल होऊ लागले. शेतकरी डाळिंब, पेरू, सीताफळ फळपिकांसह कांदा, भाजीपाला लागवडीकडे वळू लागले आहेत. काही प्रमाणात ऊस लागवड होऊ लागली आहे. विशेषतः रब्बी हंगामातील पीक क्षेत्र वाढत आहे. लोकसहभागातून गावाचा विकास लोकांना विश्वासात घेऊन काम केले तर कोणतीही गोष्ट अशक्य आहे. आम्ही सरकारी निधीला लोकसहभागाची जोड देऊन नाला खोलीकरण आणि जलसंधारणाची विविध कामे केली. त्यामुळे गाव शिवार पाणीदार झाले, त्याबरोबरीने एकोप्याला मदत झाली. वृक्षारोपण, स्वच्छता, शिवरस्ते आदी कामे लोकसहभागातून करण्यात आली आहेत. - डॉ. धनंजय धनवटे, (सरपंच)
गेल्या दहा वर्षांपासून गावाला सतत पाणीटंचाईला समोरे जावे लागत होते. परंतु चार वर्षांपासून नाले, ओढे, चर खोलीकरणामुळे पाणीपातळी वाढली. विहिरींमध्ये पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे शेतीला फायदा होत आहे. पीकपद्धतीत बदल होऊ लागले आहेत. - अजीज इनामदार, शेतकरी पुणतांब्याची वैशिष्ट्ये
ग्रामविकासासाठी सर्वांचा पुढाकार
श्रमदानातून शिवरस्त्यांचे काम
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.