फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी 

सीताफळाबरोबर अनेक शेतकरी भाजीपाला पिकांचे उत्पादन घेण्यात आघाडीवर आहेत.
सीताफळाबरोबर अनेक शेतकरी भाजीपाला पिकांचे उत्पादन घेण्यात आघाडीवर आहेत.

पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाते. फळबागांसाठी व विशेषतः  सीताफळासाठी हे गाव ओळखले जाते. अलीकडील काळात चिकू पेरू आदींच्या माध्यमातून गावात पीकबदल झाला आहे. सुमारे एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून पाणीटंचावर मात करण्यात येत आहे.    जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हवेली (जि. पुणे) तालुक्यातील वडकी येथील शेतकऱ्यांनी हीच संकल्पना मनात धरली. समोर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे ठरविले. गावची साधारणपणे दहा हजार ते पंधरा हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. शेती हेच गावचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. भौगोलिक क्षेत्र सुमारे २२९७ हेक्टर आहे. त्यापैकी सुमारे १४१० हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य, तर सुमारे ४६८ हेक्टर क्षेत्र डोंगराळ आहे. गावात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. 

फळबागशेतीवर गावाचा भर 

कृषी व आत्मा विभागाच्या माध्यमातून व ग्रामस्थांच्या पुढाकारातून जलसंधारण, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती, गटशेती, थेट विक्रीच्या योजना गावात राबविण्यासाठी चालना मिळाली. यंदा गावात अत्यल्प पाऊस पडला. तरीही  खचून न जाता उपलब्ध कमी पाण्यावर फळबागा जगविण्यासाठी येथील शेतकरी इच्छाशक्ती पणाला लावून सरसावले. गावातील उमदे तरुण शेतीत कार्यरत आहेत ही विशेष बाब आहे. कृषी विभागाचे अधिकारी, सरपंच ताराबाई केरबा मोडक, उपसरंपच दिलीप सर्जेराव गायकवाड यांच्यासह ग्रामपंचतीचे सदस्य व प्रगतिशील शेतकरी बळ देत आहेत. 

फळबागा व पीकबदल 

कमी पर्जन्यमान म्हणून वडकीतील शेतकरी सीताफळाकडे वळला. गावात सुमारे ७० ते ८० एकरांवर हे पीक उभे आहे. पूर्वी गावाची सीताफळाचे गाव म्हणून तालुक्यात ओळख होती. मागील काही वर्षांपासून पाणीटंचाई आणि बदलते हवामान यामुळे शेतकरी फळपिकांमध्ये बदल करू लागला आहे. पुणे शहर जवळ असल्याने ग्राहकांची मागणी लक्षात  घेऊन शेतकरी पेरू, चिकू, पुदिना, कांदा पिकांकडे वळला आहे. सुमारे ५०-६० एकरांवर पुदिन्याची लागवड आहे. अनेक शेतकरी थेट विक्रीही साधतात. गावात फळबागांच्या माध्यमातून जवळपास एक ते दीड कोटी रुपये येतात. त्यातून  कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे  ग्रामस्थांची एकी हेच बळ 

पाणीटंचाईवर मात करायची तर एकी करणे महत्त्वाचे होते ही बाब कळून आल्यानंतर तरुणांनी पुढाकार घेतला. ज्येष्ठ मंडळीनीही पाठिंबा दिला. त्यातूनच गावातील मस्तानी तलावातील गाळ उपसण्यात आला.  काही प्रमाणात पाण्याचा प्रश्‍न मिटवला. उमाजी नाईक या तलावाचाही चांगला फायदा होतो. भाजीपाला, कांदा आदी पिकांतही पाण्याचा वापर काटेकोर होऊ लागला आहे. 

पाण्याची उपाययोजना 

उन्हाळ्यात पाण्याचा चांगलाच प्रश्‍न भेडसावायचा. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी फळबागांत सूक्ष्म सिंचनाचा अवलंब केला. जवळपास ६० ते ७० टक्के फळबागांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. पाणीटंचाईमुळे काही वेळेस फळबागा सुकत असल्याचेही चित्र समोर आले. मग मागेल त्याला शेततळे व वैयक्तिक शेततळे या दोन्ही योजनांद्वारे गावात १० ते १५ शेततळी उभारली आहेत. पावसाळ्यातील पाणी भरून ठेवल्यानंतर गरजेनुसार त्याचा वापर होतो. 

जलसंधारणाच्या कामांवर भर 

कृषी विभागाच्या माध्यमातून ओढे- नाले खोली व रुंदीकरण करण्यात आले. त्यासाठी लोकसहभागावर भर देण्यात आला. याशिवाय माती नाला बांध १२, सीसीटी ६२.२५ हेक्टर, दगडी बांध १२०, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत १५-२०  सिंमेट बंधारे झाले. त्यातून कोट्यवधी लिटरचा पाणीसाठा तयार होऊन तो जमिनीत मुरण्यास मदत झाली. परिणामी 

पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली. 

वृक्षलागवडीसाठी तरुणांचा पुढाकार पर्यावरण संवर्धनासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी विविध झाडांची लागवड केली. सध्या ही झाडे सुस्थितीत आहेत. ग्रामस्थांत जागृती करण्यासाठी विविध संदेश देण्याऱ्या बोलक्या भिंती दिसतात. यामध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा, बेटी पढाव बेटी बचाव, झाडे वाचवा, झाडे जगवा, प्लॅस्टिकबंदी, स्वच्छता अभियान, पाण्याचा जपून वापर, करा मातीचे परीक्षण, वाढेल शेतीचे उत्पादन अशा संदेशांचा समावेश आहे. 

गावात राबविले जाणारे उपक्रम 

  • वृक्षारोपण व संवर्धन 
  • ग्रामस्वच्छता 
  • आरोग्यविषयी जनजागृती 
  • शेतकऱ्यासांठी कार्यशाळा, प्रशिक्षणे 
  • प्रतिक्रिया 

    माझी दहा ते बारा एकर शेती आहे. पाण्याची बऱ्यापैकी सोय आहे. सीताफळ, चिकू, पेरू अशी सुमारे तीन एकर फळबाग आहे. ठिबक सिंचनाचा अवलंब करतो. कमी पाण्यात सर्व पिकांतून वर्षाकाठी तीन ते चार लाखांपर्यत उत्पन्न घेतो.  शशिकांत फाटे  संपर्क ः ९८५००४३७३७, ९५११६८९१९३ 

    शेतीचा व गावाचा विकास करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर असतो.  मच्छिंद्र गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, वडकी  संपर्क ः ९८६०४९८४१९    काही वर्षांपासून पाण्याची टंचाई भासत असल्याने त्यावर मात करण्यासाठी विविध विकासकामे हाती घेतली. जलसंधारण, ठिबक सिंचन, शेततळे, फळबागा, शेतकऱ्यांना मार्गदर्शन यावर भर देण्यात आला आहे.  ताराबाई केरबा मोडक  सरपंच  संपर्क ः ७७२००२१६२१ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com