सामूहिक शक्तीमुळेच बल्लाळवाडी झाले आदर्श गाव

पूर्वी ग्रामस्थांना रोजगारासाठी शहरांमध्ये जावे लागत होते. आता गावात झालेल्या विकासकामांमुळे स्वयंरोजगारांची साधने तयार झाली आहेत. संस्थेच्या माध्यमातून गावाचा विकास झाला आहे. त्यामुळे गाव नावारूपाला आले आहे. -मनीषा प्रदीप डोंगरे, सरपंच, बल्लाळवाडी
पावसाचे पाणी अडविण्यासाठी जलसंधारणाची झालेली कामे
पावसाचे पाणी अडविण्यासाठी जलसंधारणाची झालेली कामे

सर्व घटकांनी एकत्र आले, तर गावाचा निश्चितच कायापालट होऊ शकतो. पुणे जिल्ह्यातील बल्लाळवाडीचे ग्रामस्थ, युवा शक्ती, सरकारी संस्था आदींनी एकत्र येऊन गावात विकासाची विविध कामे घडवली. गावातील बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठान या संस्थेने त्यात आपले भरीव योगदान दिले. बल्लाळवाडी हे आज आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जुन्नरपासून नऊ किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी वसलेले बल्लाळवाडी हे सुमारे २९०० लोकसंख्येचे छोटेसे गाव. पंधरा वर्षांपूर्वी पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याचा व अन्य सोयीसुविधांचा गावात अभाव होता. गावातील वीस टक्के बागायती; तर ८० टक्के कोरडवाहू शेती होती. त्यामुळे ग्रामस्थांना उदरनिर्वाहाचे ठोस साधन नव्हते. गावातील तरुण मुंबई किंवा अन्य शहरांकडे धाव घ्यायचे. नोकरीच्या निमित्ताने ते स्थायिकही झाले आहेत. अर्थात गावात चैत्र महिन्यात ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थानची यात्रा भरते. गावातील सर्व चाकरमानी त्या निमित्ताने एकत्र येतात. विकासासाठी संस्थेची स्थापना मुंबईत स्थायिक झालेल्या गावातील तरुणांना आपल्या गावाविषयी असलेली तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. आपण गावासाठी काहीतरी केले पाहिजे, असे त्यांना सतत वाटे. त्यातूनच बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठान नावाची सामाजिक संस्था त्यांच्या पुढाकारातून स्थापन झाली. सुरवातीला वर्गणी काढून तसेच सांस्कृतिक कार्यक्रम राबवून निधी जमा केला. त्याचबरोबर स्वतःकडील रक्कमही संकलित केली. त्यातून मुंबई येथील घाटकोपर उपनगरात वास्तू उभारली. गावकडची जी मुले शिकून मुंबईला काम करण्यासाठी येतात किंवा ज्यांचे मुंबईत कुणी नातेवाईक नाही अशा तरुण मुलांना संस्थेने राहण्याचा आधार दिला. गावातही छोटे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी संस्थेलने पाऊल उचलले. आदर्श गाव योजनेसाठी निवड दरम्यान, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार व अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाची शासनाच्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजनेत निवड झाली. योजना पूर्ण करण्यासाठी सेवाभावी संस्था म्हणून बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठानची निवड झाली. त्यात अध्यक्ष म्हणून गोविंद डोंगरे, उपाध्यक्ष नवनाथ डोंगरे, सचिव हर्षल आहेर, खजिनदार खंडू डोंगरे, सहसेक्रेटरी अजित डोंगरे, संतोष डोंगरे, विक्रम गावडे यांचा समावेश आहे. संस्थेने गावात करावयाच्या पाणलोट व अन्य विकासकामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. तो मंजुरीसाठी शासनाला सादर केला. गावात राबविले विविध उपक्रम ग्रामस्थ, युवा शक्ती, शासकीय संस्था अशा सर्वांनी यथाशक्ती आपापले योगदान देत श्रमदान केले. त्यातून विविध विकासकामांची पूर्तता झाली. त्यातून ग्रामस्थांच्या जीवनात परिवर्तन येऊ लागले आहे. राबवलेले क्षमताबांधणी उपक्रम

  • गावातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व कळावे यासाठी अभ्यास दौरे, मातीपरीक्षण
  • बचत गटांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण
  • स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठी जनजागृती
  • जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन
  • तरुणांना विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण
  • झालेली महत्त्वाची कामे

  • भूगर्भातील पाणीपातळी वाढवून पाणीटंचाई कमी होण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून
  • चार ओढ्यांवर चार सिंमेट बंधारे बांधले. त्यासाठी आठ लाख रुपये खर्च करण्यात आला. त्यामुळे ओढ्यालगतच्या विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
  • आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मधुमेह, हिमोग्लोबिन, हृदयरोग, डोळेतपासणी
  • काही आजार आढळल्यास पुढील उपचारांसाठी संस्थेचा पुढाकार
  • बैठका, लग्नसमारंभ आदी कार्यक्रमांसाठी सार्वजनिक सभागृह. सुमारे ५२ लाख रुपये रकमेत नऊ लाख रुपयांचे योगदान आदर्श गाव योजनेतून व उर्वरित रक्कम लोकसभागातून खर्च करण्यात आली. यात ग्रामविकास मंडळाने मोठ्या प्रमाणात मदत केली.
  • पावसाळ्यात ग्रामस्थांना चिखल तुडवत कामांसाठी जावे लागे. हा त्रास कमी करण्यासाठी गावठाणाअंतर्गत गल्ल्यांमधून पेव्हर ब्लाॅक्सचे काम करण्यात आले. या कामांसाठी सुमारे चार लाख रुपयांचा खर्च करण्यात आला.
  • गावातील महिलांना कपडे धुण्यासाठी येत असलेल्या अडचणी आणि पाण्याचा होणारा अतिवापर कमी करण्याच्या उद्देशाने गावातील सार्वजनिक विहिरीवर धोबीघाट बांधण्यात आला. त्यात टाकी व दहा नळांचा समावेश आहे. या कामासाठी जवळपास दोन लाख रुपयांचा खर्च आला.
  • संस्थेच्या सहकार्याने बालबाडी, शाळा या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचे वाटप, शाळेत ई-लर्निंग सुविधा
  • वृक्षारोपण, रस्ते डांबरीकरण
  • शौचालयांची उभारणी
  • ग्रामपंचायत कक्षेतील ५४ हेक्टर गायरान जमिनीवर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सलग समतल चर
  • पुढील काळात हाती घेतली जाणारी कामे

  • गावातच रोजगाराच्या आणि आवश्यक सुविधांच्या संधी निर्माण करणे. जेणेकरून चरितार्थासाठी गावातील लोकांना शहरात जावे लागू नये.
  • तरुणांना सामूहिक व किफायतशीर सेंद्रिय शेतीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व रोजगार उपलब्धता
  • नवे तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणे यांच्या मदतीने शेती
  • मातीपरीक्षण, गावात हवामान केंद्र, माहिती केंद्र उभारणे.
  • गावातील सहकारी सोसायटीच्या माध्यमातून माफक दारात खते व कीडनाशके यांचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न
  • सामूहिक शेतजमीन मोजणीसाठी प्रयत्न
  • लग्नासारख्या समारंभातील खर्चात कपात करण्यासाठी ग्रामस्थांचे मन वळवणे. त्यातील काही निधी गावातील सामाजिक कामांसाठी देण्यासाठी ग्रामस्थांची मानसिकता तयार करणे.
  • शासकीय आरोग्य उपकेंद्रासाठी शासकीय पाठपुराठा
  • संपर्क- हर्षल आहेर ः ९८२१६९८९४८ बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठान, बल्लाळवाडी,  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com