म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस शेतकऱ्यांचाच नकार..

म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस शेतकऱ्यांचाच नकार..
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस शेतकऱ्यांचाच नकार..

अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज जोडणीला नकार देत असल्याचा अजब दावा वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी केला. अशा शेतकऱ्यांची नावे सांगा ? असा प्रश्‍न आमदार देवेंद्र भुयार यांनी केल्यावर मात्र या अधिकाऱ्याची चांगलीच बोबडी वळाली.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आढावा बैठकीत हे नाट्य घडले. बैठकीला आमदार यशोमती ठाकूर, रवी राणा, सुलभा खोडके, राजकुमार पटले, प्रताप अडसड, देवेंद्र भुयार, जिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, महापालिका आयुक्‍त संजय निपाणे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  बैठकीत कृषीपंप जोडणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी महावितरणचे अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी अती उच्चदाब विद्युत वितरण प्रणाली अंतर्गत जिल्ह्यासाठी १ हजार ३५१ शेतकऱ्यांना जोडण्या देण्यात आल्याचे सांगितले. यावर आमदार भुयार यांनी उर्वरित काम कुठे थांबले व केव्हापर्यंत पूर्ण होईल, असा प्रश्‍न केला. सध्या शेतात पीक उभे आहे. त्याचे नुकसान होऊ नये याकरिता शेतकरीच वीज कर्मचाऱ्यांना वीज जोडणीस सध्या परवानगी नाकारत असल्याचा अजब दावा महावितरणचे अधीक्षक अभियंता खानंदे यांनी केला. अशा शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यास सांगितल्यावर मात्र ठेकेदाराकडे बोट करीत खानंदे यांनी वेळ मारून नेली. आमदार प्रताप अडसड यांनी रोहित्र अवघ्या तीन दिवसात जळतात. त्यांच्या देखभालीचे काय ? महावितरणच्या या सर्व धोरणाचा फटका शेतकऱ्यांनाच बसतो. पाण्याची उपलब्धता असताना शेतकऱ्यांना ओलीत करणे शक्‍य होत नाही. यावर रोहित्राची मागणी करण्यात आली असून कंपनीकडून लवकरच ते मिळतील, असे उत्तर दिलीप खानंदे यांनी दिले.  दरम्यान, कृषिपंपाच्या वीज जोडणीवरून तीनही आमदार आक्रमक झाले होते. त्यानंतर जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या ७० गावे पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. याकरिता ५.४३ कोटींचा निधी मंजूर आहे. २२ गावांनी ठराव दिले आहेत. हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होण्याची गरज मांडण्यात आली.  ४२ लघू प्रकल्पचे काम सुरू जलसंपदा विभागाकडून ४२ लघू प्रकल्पांचे काम सुरू असून, यंदा २३६ दलघमी पाणीसाठ्याचे उद्दिष्ट आहे. त्या तुलनेत अद्यापपर्यंत पुरेशी कामे झाली नाहीत. या कामांना वेग द्यावा. आचारसंहिता व पावसामुळे प्रलंबित कामे पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवार यांनी दिले. महावितरणकडून ट्रॉन्सफार्मर, खांब उभारणी आदी कामे वेळेवर व्हावीत, भारनियमनाची वेळही नागरिकांसाठी अनुकूल असाव्यात, असेही पवार यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com