खानदेशात पावसाच्या सरी, थंडी झाली गायब

खानदेशात पावसाच्या सरी
खानदेशात पावसाच्या सरी

 जळगाव  ः खानदेशात मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण होते. यातच बुधवारी (ता. २५) सायंकाळी पाचच्या सुमारास जळगावमधील यावल, जळगाव, चोपडा, रावेर, भुसावळ भागांसह धुळे, शिरपूर येथेही सुमारे आठ ते १० मिनिटे पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत अधून-मधून रिमझिम सरी सुरूच होत्या. गुरुवारीदेखील (ता. २६) ढगाळ वातावरण सकाळपासून कायम होते. यामुळे ऐन हिवाळ्यात थंडी गायब झाली आहे.  यंदा डिसेंबर संपत आला तरी पावसाने पाठ सोडलेली नाही. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतच आहेत. गेल्या पंधरवड्यातही धुळे शहरासह परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली होती. यानंतर पुन्हा थंडी पडू लागली. मात्र, दोन- तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत असून, रोज सायंकाळी पाऊस तुरळक हजेरी लावत आहे. बुधवारी सायंकाळीही १५ ते २० मिनिटे पावसाने जोरदार हजेरी लावली. यानंतर अधून-मधून रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. धुळे तालुक्‍यातील कुसुंबासह परिसरातही  दुपारी साडेचार ते पाचपर्यंत अर्धा तास पावसाने जोरदार हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वीही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. कुसुंबा येथील आठवडे बाजार होता. दुपारी साडेचारला शहरात काही भागांत पाऊस सुरू झाल्याने विक्रेत्यांसह ग्राहकांची धावपळ झाली.  यावल शहरासह परिसरात बुधवारी रात्री सव्वानऊला मुसळधार पाऊस झाला. शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. काढणीस आलेला कापूस, कांदा पिकाचे नुकसान झाले. शहरासह परिसरात तासभर चांगला पाऊस झाला. अधूनमधून पावसाचा जोर वाढत होता. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. पिकांवर परिणाम होण्याची शक्यता यंदा खरिपाचा हंगाम पूर्णतः वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीवर आशा आहेत. यंदा पाऊसही चांगलाच झाल्याने विहिरी, कूपनलिकाही तुडुंब भरलेल्या आहेत. यामुळे रब्बीच्या क्षेत्रात वाढही झाली असून, शेतकऱ्यांनी मका, हरभरा, गहू, दादर आदी पिकांची पेरणी केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली असून, काही शेतकरी लागवडीच्या तयारीत आहेत. मात्र, दोन-तीन दिवसांपासून तयार होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत होती. ढगाळ हवामान, यातच गायब झालेली थंडी आणि सकाळी पडणारे धुके या विपरीत वातावरणामुळे विविध पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याचीही भीती व्यक्त होत आहे. विशेषतः कांदा पिकांवर करपा रोग येण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. तसेच रब्बीच्या पिकांची वाढ खुंटण्याची भीतीही व्यक्त होत आहे. बुधवारच्या पावसामुळे जनावरांसाठी राखून ठेवलेला चाराही ओला झाल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com