
``यंदा राज्यातील सगळ्याच साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाचं टनेज आणि रिकव्हरी कमी झालेली आहे. उसाची उत्पादकता आणि दर्जा खालावला आहे.
त्यात दुरुस्ती करण्यासाठी खास प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी साखर कारखानदारीने २० ते २५ कोटी रूपये बाजूला काढून ठेवावेत,`` असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात शुक्रवारी (ता. १७) व्यक्त केले.
सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय सहकार महापरिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ‘सकाळ'चे अध्यक्ष प्रताप पवार, ‘सकाळ'चे संपादक संचालक श्रीराम पवार, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, मुंबई बॅँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, भारतीय रिझर्व्ह बँकचे संचालक सतीश मराठे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.
उसाची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रचंड वाव असल्याचे पवार यांनी सांगितले. ‘‘एकीकडे दोन एकरवाला लहान शेतकरी एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेतो आणि दुसरीकडे राज्याची सरासरी उत्पादकता एकरी ३५ टन आहे.
या परिस्थितीत तातडीने सुधारणा केली पाहिजे. त्यासाठी साखर कारखान्यांमधील शेती खातं बळकट केलं पाहिजे,'' असे पवार म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये काही साखर कारखान्यांनी उसाचा दर्जा सुधारणे या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत केलं.
त्यामुळे तिथं उसाचे टनेज आणि रिकव्हरी सुधारली. महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर खास प्रयत्न करावे लागतील.
हंगाम व जातिनिहाय उसाची लागवड, उसाचे योग्य वजन नोंदवण्याची यंत्रणा, जमिनीची सुपिकता, रासायनिक खतांचा संतुलित वापर, सूक्ष्म सिंचन, खोडवा पीक व्यवस्थापन आदी मुद्यांकडे लक्ष द्यावे लागले, असे पवार यांनी सांगितले.
‘सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दुसऱ्या सहकार महापरिषदेत (Cooperative Conference) (Sakal Mahaconclave) बॅंकिंग, साखर उद्योगातील (Sugar Industry) विविध प्रश्न आणि त्यावरील उपाययोजनांबाबत विचारमंथन सुरू आहे.
या महापरिषदेत राज्यभरातून बॅंकिंग आणि साखर उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १८) दुपारी तीन वाजता परिषदेचा समारोप होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.