
two Thousand Currency Note Banned : दिनांक ३० सप्टेंबर २०२३ नंतर दोन हजारची नोट ‘कागज का तुकडा’ होणार अशा बातम्या माध्यमांतून आल्या आणि लोकांना धडकी भरली. मागच्या नोटाबंदीमध्ये सगळ्यात जास्त हाल शेतकऱ्यांचे झाले होते. कारण शेतीमाल खरेदी-विक्रीचा मामला बहुतेक करून रोखीत असतो.
हा सगळा व्यवहार विस्कळीत झाला आणि शेतीमालाचे भाव प्रचंड पडले होते. दुसऱ्या बाजूला खत, बी-बियाणे, औषधं खरेदी करायचीही गोची झाली होती. शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली होती.
आताही केंद्र सरकारने दोन हजार रूपयांची नोटबंदी केल्याच्या बातमीमुळे शेतकरी आणि इतर घटक चांगलेच धास्तावले. विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. तर मोदी समर्थकांनी हा मास्टर स्ट्रोक असल्याचे गुणगान सुरू केले.
पण खरंच या बातम्यांमध्ये तथ्य आहे का? तर नाही. सरकारने नोटबंदी केलेली नाही. त्यामुळे उगाच साप समजून भुई धोपटण्यात काही मतलब नाही, हे पहिल्यांदा ध्यानात घ्या. नोटंबदी झाली असे समजून अनेक जण हवेत पतंग उडवत आहेत. पण त्यांच्याकडे लक्ष न देता या क्षेत्रातील तज्ज्ञ काय म्हणतात, ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे.
ख्यातनाम अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्यासारख्या दिग्गजांनी दोन हजार रूपयांच्या नोटबंदीबद्दल वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. त्यांचे मत नेमके काय आहे ते पाहूया.
नीरज हातेकर काय म्हणाले?
दोन हजार रूपयांची नोट बंद वगैरे करण्यात आलेली नाही. सध्या चलनात असणाऱ्या दोन हजारच्या नोटा २०१७ ते २०१८ या काळात छापल्या गेल्या आहेत. नंतर त्या छापणे बंद करण्यात आलं. साधारणपणे नोटेचे आयुर्मान चार ते पाच वर्ष असते.
ते आता सध्या चलनात असलेल्या बहुसंख्य नोटांच्या बाबतीत संपुष्टात आलेले आहे. म्हणून त्या नोटा बदलून घेण्याची सोय करण्यात आलेली आहे. सप्टेंबर नंतरही ह्या नोटा चलन म्हणून वापरता येतील, असे सुद्धा रिझर्व बँकेने स्पष्ट केलेले आहे.
नोटा बंद वगैरे केलेल्या नाहित. जुन्या झाल्यात, कोणी वापरत नाही म्हणून चलनातून काढून घ्यायच्या आहेत एवढेच. ही नोटबंदी वगैरे नाही. याचा निवडणुकांशी काहीही संबंध नाही. हा मास्टर स्ट्रोक तर अजिबात नाही.
विद्याधर अनास्कर काय म्हणाले?
केंद्र सरकारने जाहीर केलेला निर्णय हा नोटबंदी नाही. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांना मिळालेल्या अधिकारात त्यांच्या क्लिन नोट पॉलिसीनुसार दोन हजार रूपयांच्या बदली करण्या संदर्भात घेतलेला हा निर्णय आहे.
अशाच प्रकारचा निर्णय रिझर्व्ह बँकेने २३ डिसेंबर २०१५ रोजीच्या परिपत्रकाद्वारे सन २००५ पूर्वीच्या चलनातील नोटा काढून टाकण्यासंदर्भात घेतला होता.
त्यावेळी त्या नोटा बदलून घेण्यासाठी दि. ३० जून २०१६ पर्यंत मुदत दिली होती. याच प्रकारे दोन हजार रूपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी दि. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत दिली आहे.
या मुदतीनंतरही आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या दोन हजार रूपयांच्या नोटांची कायदेशीर वैधता अबाधित राहणार आहे. ३० सप्टेंबरपूर्वी अथवा त्यानंतरही दोन हजार रूपयांच्या नोटा कोणालाही नाकारता येणार नाही.
जर कोणी दोन हजारच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला तर संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १२४ अ नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
दोन हजाराच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेने २०१८ नंतर बंद केली होती. या नोटांची केवळ स्वीकृती होत होती; परंतु या नोटांचे वितरण बँकेत होत नव्हते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.