
Washim News : मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन (Soybean) व तूर (Tur) पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र तरीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला नव्हता.
त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व विदर्भ प्रमुख दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक आंदोलन केल्यानंतर अखेर आता जिल्ह्यातील २१९४९ शेतकऱ्यांना ३२ कोटी ७१ लाख ७७ हजार ९२२ रुपये पीकविमा मंजूर झाला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असून, अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यातच सोयाबीनला भावही नाहीत. हरभऱ्याचीही तीच स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान होऊनही विमा कंपनीकडून पीकविमा मंजूर केला जात नव्हता. त्या विरोधात तुपकर व इंगोले यांनी रिसोड, मालेगाव येथे शेतकऱ्यांचे मोठे मोर्चे काढले होते. तेव्हा कंपनीने १५ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देऊ असे आश्वासन दिले होते.
मात्र कंपनीने पैसे न दिल्याने तुपकर यांनी आत्मदहन आंदोलन केले होते. तेव्हा शेतकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज झाला होता व तुपकर, इंगोले यांच्यासह २४ आंदोलकांना तुरुंगात टाकण्यात आले होते.
कंपनीने आश्वासन देऊनही पैसे न दिल्याने इंगोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज भरायचे असल्याने तत्काळ पीकविमा मजूर करावा, अशी मागणी केली होती.
त्यावर जिल्हाधिकारी यांनी कंपनीला आदेश देत पीकविमा मंजूर करण्याचे सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापणीपश्चात झालेल्या नुकसानीपोटी ही ३२ कोटी ७१ लाख ७७ हजार ९९२रुपये विमा मंजूर झाला आहे.
२१ हजार ९४९ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार...
यात आंदोलन झालेल्या रिसोड- मालेगावच्या शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ मिळणार आहे. मालेगावमध्ये ७००१ शेतकऱ्यांना १२ कोटी ३६ लाख २५ हजार ७८५ रुपये, तर रिसोडमध्ये ८२४४ शेतकऱ्यांना ९ कोटी ३१ लाख ४ हजार ३११ रुपये मिळणार आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.