
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या पावसाने ५३.०३ हेक्टर क्षेत्रावरील शेती, बागायतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ५१३ शेतकऱ्यांचे १५ लाखांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ एप्रिलपासून वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्याच्या काही भागांत वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले. जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात सातत्याने पाऊस झाला. त्यामुळे या भागातील आंबा हंगाम संकटात सापडला आहे.
आंबा, काजू, कोकम, जांभूळ, सुपारी, नारळ आणि रब्बी हंगामातील विविध पिकांचे नुकसान यामध्ये झाले. या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत अशी सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाला दिले होते.
दरम्यान, ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे कृषी विभागाने केले आहेत. जिरायती क्षेत्राचे ०.२५ हेक्टर, बागायती ७.७७ हेक्टर क्षेत्र, फळपीक ४५.०१ हेक्टर असा एकूण ५३ हेक्टरचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील ५१३ शेतकऱ्यांचे १५ लाख २२ हजारांचे नुकसान झाले. सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक ३०.१० हेक्टर, कुडाळ तालुक्यात १६.११ हेक्टर, वैभववाडी तालुक्यात ५.८० हेक्टर, दोडामार्ग तालुक्यात १ हेक्टर, कणकवली तालुक्यात ०.२ हेक्टर क्षेत्रावरील शेती, बागायतीचे नुकसान झाले आहे.
किनारपट्टी तालुक्यातील मालवण, देवगड आणि वेंगुर्ला तालुक्यात नुकसानीची नोंद झालेली नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.