
Chandrapur News : राज्याचे उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचे (Agricultural Pump) नादुरुस्त झालेले वितरण रोहित्र तत्काळ बदलून देण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाची महावितरणने अंमलबजावणी करीत गेल्या सव्वादोन महिन्यांमध्ये राज्यभरात तब्बल २८ हजार ४३० नादुरुस्त रोहित्र बदलविले आहे. यात विदर्भातील ६५९६ रोहित्र बदलविण्यात आले आहे.
रब्बीच्या हंगामात शेतपिकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहित्र ताबडतोब बदलण्याचे आदेश उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला दिले.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी विविध बैठकींद्वारे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना नादुरुस्त रोहित्र तत्काळ बदलण्याच्या सक्त सूचना केल्या.
यांसह महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी राज्यभर दौरे करून आढावा घेत सर्व परिमंडलामध्ये नादुरुस्त रोहित्र बदलण्याच्या कार्यवाहीला आणखी वेग दिला.
याचा परिणाम गेल्या डिसेंबरमध्ये १७ हजार ७८५, जानेवारीमध्ये ८ हजार ४०४ आणि ८ फेब्रुवारीपर्यंत २ हजार २४१ असे एकूण २८ हजार ४३० नादुरुस्त रोहित्र बदलले आहेत.
राज्यात कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे महावितरणचे एकूण ७ लाख ५४ हजार वितरण रोहित्र आहेत. विशेष म्हणजे नादुरुस्त रोहित्र बदलण्याच्या मोहिमेमुळे गेल्या सव्वा दोन महिन्यांमध्ये नादुरुस्त रोहित्रांचे प्रतिदिवस प्रमाण केवळ ३२० ते ३२५ वर आले आहे.
यापूर्वी विविध कारणांमुळे राज्यात दररोज सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० रोहित्र बदलणे शिल्लक राहत असल्याची स्थिती होती. सध्या महावितरणकडे ऑईलसह सुस्थितीतील ४ हजार ३१२ रोहित्र उपलब्ध आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.