
Nagpur News : देशातील नागरिकांची अन्नधान्याची गरज भागविण्याकरिता २०५० पर्यंत सध्याच्या परिस्थितीच्या तुलनेत ६० टक्के शेतमालाचे अधिक उत्पादन करावे लागणार आहे.
त्याकरिता माती आणि तिचे आरोग्य जपले पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय सोयाबीन संस्थेचे माजी मृदा तज्ज्ञ डॉ. ओ.पी. जोशी यांनी केले.
जमीन आरोग्य आणि पीक संरक्षण या विषयावर सोयाबीन संशोधन संस्थेत आयोजित प्रशिक्षण वर्गात ते बोलत होते. संस्थेचे संचालक डॉ. के. एच. सिंह, डॉ. बी. यु. दुपारे, डॉ. ए.एन. शर्मा, डॉ. सुरेश मोटवानी यांची यावेळी उपस्थिती होती.
डॉ. जोशी पुढे म्हणाले, ‘‘९० टक्के खाद्यान्न हे आपल्याला जमिनीच्या माध्यमातून मिळते. लोकसंख्येचा विचार करता २०५० पर्यंत ६० टक्के अधिक शेतमाल उत्पादनाची गरज भासणार आहे.
त्याकरिता जमिनीचे आरोग्य जपणे महत्त्वाचे ठरते. मातीचे आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक घटकांच्या वापरावर भर दिला पाहिजे.’’
यावेळी बोलताना डॉ. बिल्लोरे यांनी संतुलीत प्रमाणात खताचा वापर आणि एकात्मिक व्यवस्थापनावर भर देण्याचे आवाहन केले.
संस्थेचे सेवानिवृत्त कीटकशास्त्रज्ञ डॉ. ए. एन. शर्मा यांनी सांगितले की, तंबाखूची पाने खाणारी अळी आणि गर्डल बिटल सारख्या किडी या मातीतच वाढतात. त्याच्या नियंत्रणासाठी एफआयआर पध्दतीचा अवलंब केला पाहिजे. त्यामध्ये पहले बुरशीनाशक त्यानंतर कीटकनाशक व शेवटी रायजोबियम सारख्या जिवाणूंचा प्रक्रियाकामी वापर करण्यावर शेतकऱ्यांवर भर द्यावा.
संस्थेचे संचालक डॉ. के.एच. सिंह यांनी देखील कार्यक्रमात मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध शंकाचे निरसन करण्यात आले. डॉ. आर. के. वर्मा यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.