
Amravati News : रब्बी हंगामात (Rabi Season) जिल्हा मध्यवर्ती बँकेने हात आखडता ठेवला असला तरी राष्ट्रीय, ग्रामीण व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २८५ कोटींचे कर्जवाटप केले आहे. एकूण लक्ष्यांकाच्या ते ६४ टक्के इतके आहे.
खरीप हंगामात कर्जवाटपाची सरासरी ९५ टक्क्यांवर होती व यामध्ये सर्वाधिक वाटा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा होता. दरम्यान रब्बी हंगामातील शेतमालाचे भाव पडले असल्याने शेतकऱ्यांना कर्जाच्या परतफेडीची चिंता लागली आहे.
रब्बी हंगाम २०२२-२३ साठी ४५० कोटी रुपये कर्जवाटपाचे लक्षांक निश्चित करण्यात आलेले होते. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी १०० कोटींचे लक्षांक असले तरी रब्बी हंगामात ही बँक कर्जवाटप करीत नाही.
त्यामुळे राष्ट्रीय, सार्वजनिक क्षेत्रातील व ग्रामीण बँकांनीच या हंगामात कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीय बँकांना ३२६ कोटी २४ लाख रुपये कर्जवाटपाचे लक्षांक होते. त्यांनी २१,६१३ सभासद शेतकऱ्यांना २६८ कोटी ६४ लाख रुपयांचे कर्ज दिले आहे.
कर्जवाटपाची सरासरी ८२ टक्के आहे. तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ६६२ सभासद शेतकऱ्यांना १६.२८ कोटींचे कर्ज दिले आहे.
ग्रामीण बँकांनी ४७ शेतकऱ्यांना ८४ लाख रुपये कर्जवाटप केले आहे. जिल्ह्यातील एकूण २२,३२२ शेतकऱ्यांना २८५ कोटी ७५ लाख रुपये कर्जवाटप झाले आहे.
रब्बी हंगामात शेतकरी गहू व हरभरा या पिकांकरिता बँकांकडून कर्ज घेतो. या हंगामात हरभऱ्याचे पेरणीक्षेत्र वाढले होते. उत्पादनाची सरासरी हेक्टरी १५ क्विंटल असून खुल्या बाजारात मात्र भाव पडले आहेत.
त्यामुळे शासकीय खरेदीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर कर्जाच्या परतफेडीचा प्रश्न उद्भवणार आहे.
रब्बीतील कर्जवाटपाची स्थिती
बँक- सभासद संख्या- कर्ज (कोटी रुपयांत)
राष्ट्रीय - २१६१३ - २६८.६४
सार्वजनिक- ६६२ - १६.२८
ग्रामीण- ४७ ८४
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.