
Agriculture Student Protest : भारत कृषिप्रधान देश आहे. परंतु कृषी विषयक घटकांमध्ये, वेगवेगळ्या शेतीच्या विकासांमध्ये (Agriculture Development), शेतकऱ्यांच्या समस्या (Farmers Issues) सोडवण्यामध्ये आपण नक्कीच कमी पडतोय. शेतीच्या विकासामध्ये सर्वांचा समावेश असणे आवश्यक आहे.
त्यामुळे कृषी क्षेत्राच्या सर्व अंगाने विचार करून त्याची प्रगती होण्यास यश मिळेल. मागील काही काळापासून कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना डावललं जात आहे. कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी स्वतः विद्यार्थी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आंदोलन करीत आहेत.
यासाठी पदवी घेणारे, पदव्युत्तर शिक्षण घेणारे, उत्तीर्ण झालेले व पीएचडी करणारे हजारो विद्यार्थी ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. इतरत्र महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्येही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आंदोलन करीत आहेत.
कृषी अभियांत्रिकी नुसती नावापुरती मर्यादित नसून ही पदवी म्हणजेच कृषी क्षेत्राचे मोठं भविष्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, ज्या-त्या क्षेत्रात विकास करावा, मोठं व्हावं त्याऐवजी विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागत आहे, तेही आपल्या कृषी क्षेत्राकरता.
आधुनिक शेतीत, कृषी अभियांत्रिकीचे येत्या काळात खूप महत्त्व असूनही हे अजून कोणी गांभीर्यानं घेतलेलं नाही. जर यांना संधी मिळाली तर ह्याच विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थिनींच्या मदतीने भारत देश अवघ्या जगाला अन्न निर्यात करू शकतो.
या मुलांची संधीच हिरावून घेतली तर त्यांची कृषी क्षेत्रातील विचारशक्ती, नवनवीन शोध मांडायला जागाच उरणार नाही.
गेल्या वर्षी कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र कृषी सेवा आयोगाने अभ्यासक्रमात बदल करून त्यांचे वर्चस्व कमी केले आहे. काही वर्षांपूर्वी हा विषय ४०० गुणांचा होता, नंतर तो २०० गुणांचा ठेवण्यात आला, आणि आता तर हा विषय फक्त १६ गुणांमध्ये ॲग्री एमपीएससी साठी ठेवण्यात आला.
महाराष्ट्र कृषी सेवेमध्ये कृषी अभियांत्रिकीचे गुण परत मिळवण्याकरिता, मृद व जलसंधारण विभागामध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करण्यासाठी व स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यासाठी विद्यार्थी आंदोलनं करीत आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी गुणांचा अभ्यासक्रम मंजूर करणे पूर्णतः अन्यायकारक आहे. जेव्हा जास्त गुणांसाठी हा विषय अमलात होता तेव्हा काहीतरी विचार करूनच हे वितरण ठरवले असेल. मग अचानक काय अवगुण आजच्या अभ्यासक्रम समितीला दिसला की त्यांनी ॲग्रिकल्चरल इंजिनियर विद्यार्थ्यांचे गुणच नष्ट केले.
कृषी अभियंता या कृषी क्षेत्राचा मोठा भाग आहे, याचाही विचार हे सर्व मंजूर करताना आयोगाने केला पाहिजे. आंदोलनात कित्येक मुलामुलींची प्रकृती बिघडत आहे, त्यांना यश कधी मिळेल? विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करून सार्थकी लावावे.
मी प्रत्येक बाबतीत निरीक्षण केले आहे की, सर्वच गोष्टीवर ठाम न राहता समोरच्यांची बाजू ऐकून त्यात तथ्य असेल तर पुढील व्यक्तीची बाजू दुर्लक्ष न करता मान्य करून घेतली पाहिजे, हेच आयोगाने, सरकारने केले पाहिजे.
या आंदोलनाला खूप लोकांनी पाठिंबाही दिला आहे पण आपल्याकडे सूत्र तेव्हाच हालतात जेव्हा काहीतरी विपरीत घडलेले असते. या तरुण वयामध्ये विद्यार्थ्याच्या मनाला लागलेली अन्यायकारक बाब त्याला कुठल्याही वाटेवर घेऊन जाऊ शकते.
न्यायासाठी, हक्कासाठी अजून किती लढा विद्यार्थ्यांना चालवावा लागणार आहे? विद्यार्थ्यांचे आंदोलन एवढा काळ चालू राहणे उचित नाही. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व त्यांना पुढील वाटचालीस यशाच्या वाटेवर पाठवावे. येथून पुढे कोणावर अन्याय होऊ नये व योग्य ठिकाणी योग्य गोष्टीला न्याय देणे बंधनकारक असावे.
लेखक - प्रज्ञेश दत्तात्रय भगत, बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.