
Shekhar Gaikwad Article एकदा एका तालुक्यात एक मोठे धरण बांधण्याचा सरकारने निर्णय घेतला. मोठ्या धरणात अनेक गावे बुडणार होती.
सरकारने धरणात बुडणाऱ्या गावांतील लोकांचे पुनर्वसन (Rehabilitation) ५० कि.मी. अंतरावर असलेल्या दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी करण्याचे निश्चित केले.
काही महिन्यांनंतर धरणात बुडालेल्या भूसंपादनाची (Land Acquisition) रक्कमसुद्धा सरकारकडून प्रत्येक धरणग्रस्तांना देण्यात आली. धरणात बुडालेल्या गावांची ७/१२ पुस्तके सरकारकडून तातडीने बंद करण्यात आली.
सरकारने जमिनीचा मोबदला गावातल्या लोकांना देऊन सुद्धा सुधाकर नावाच्या एका चतुर शेतकऱ्याने धरणात गेलेल्या जमिनीचा जुना ७/१२ जोडून त्या जमिनीवर पुन्हा बँकेचे सात लाख रुपयांचे कर्ज काढण्यासाठी अर्ज केला.
काही दिवसांनंतर बँकेचे कर्ज मंजूर झाले. बरेच महिने लोटल्यानंतर बँकेचे हप्ते थकल्याचे बँकेच्या मॅनेजरच्या लक्षात आले.
कर्जाचा एक रुपयासुद्धा सुधाकरने बँकेत भरला नव्हता. बँकेच्या लोकांनी सुधाकरकडे कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावला. परंतु सुधाकरने बँकेच्या लोकांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
काही दिवसांनंतर बँकेचे मॅनेजर जमिनीच्या जप्तीसाठी कोर्टात दावा दाखल करण्यापूर्वी सुधाकरची जमीन पाहायला स्वतः गावात गेले.
गावात आल्यावर तिथल्या स्थानिक लोकांनी बँकेच्या साहेबांना लांबून सांगितले, की ‘‘साहेब, त्या तिथे धरणातील पाण्याखाली सुधाकरची जमीन होती!’’ त्यावर बँकेचे साहेब बुचकळ्यात पडले.
धरणात बुडालेल्या जमिनीचे कर्ज आता कसे फेडायचे हे त्यांना समजेना. तेव्हा बँकेच्या साहेबांना खात्री झाली, की आपल्या बँकेचे पैसे बुडाले! बँकेच्या मॅनेजरने कपाळावर हात मारून घेतला.
सांगावयाचे तात्पर्य असे, की धरणात बुडालेल्या जमिनीचा मोबदला शासनाकडून घेऊनसुद्धा त्याच जमिनीवर कर्ज काढणारे अतिशय महान दर्जाचे काही लोक आपल्या समाजात आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.