
मनिषा उगले
इंग्रजांविरुद्धचा स्वातंत्र्यलढा (Freedom Struggle) हे भारतीय इतिहासातले एक तेजस्वी पर्व आहे. त्यात स्त्रियांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. या स्वातंत्र्यसैनिकांच्या मांदियाळीतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे अवंतिकाबाई गोखले. (Avantikabai Gokhale) त्यांचे माहेरचे कुटुंब अत्यंत कर्मठ आणि रूढीप्रिय होते. अवंतिकाबाईंचे प्राथमिक शिक्षण झाले नाही.
वयाच्या अवघ्या नववा वर्षी तर त्यांचे लग्नही झाले. त्यांचे पती बबनराव गोखले हे मात्र प्रागतिक विचारांचे, व्यवसायाने इंजिनिअर. बबनरावांनी आपल्या पत्नीला घरीच लिहिण्या-वाचण्यास शिकवण्याची सुरुवात केली. अल्पावधीतच अवंतिकाबाईंनी मराठीसह इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवले.
अवंतिकाबाईंच्या ठायी प्रचंड ज्ञानलालसा होती. त्यामुळेच मनापासून अभ्यास करत त्यांनी नर्सिंगकोर्स प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केला. त्यानंतर त्यांनी आरोग्यसेवेचे कार्य हाती घेतले. त्यांच्या कार्य कुशलतेमुळे त्यांचा सर्वदूर नावलौकिक वाढत होता. दरम्यान त्यांच्यावर एक कौटुंबिक आघात झाला.
त्यांच्या पतीचा हात एका यंत्र अपघातामध्ये निकामी झाला. ते कायमस्वरूपी भारतात परत आले. पतीची सेवाशुश्रुषा करतानाही अवंतिकाबाईंनी आपले सामाजिक कार्याचे व्रत सोडले नाही. त्यांचा कर्मयोग अविरत सुरू होता. बबनरावांनीही थोडे बरे वाटताच भारतात मशिनच्या सुट्या भागांच्या विक्रीचा आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.
१९१९ च्या दरम्यान अवंतिकाबाई गोखले यांच्या जीवनाला कलाटणी देणारी एक विशेष गोष्ट घडली. इचलकरंजीच्या राणीसाहेबांना लंडन प्रवासाला निघायचे होते. त्यांना सोबत म्हणून एक सुशिक्षित आणि इंग्रजी जाणणारी महिला हवी होती. या प्रवासासाठी अवंतिकाबाईंची निवड झाली.
लंडन मुक्कामात अवंतिकाबाईंनी तिथल्या अनेक इस्पितळांना भेटी दिल्या आणि तिकडच्या आरोग्य सेवांबद्दल जाणून घेतले. त्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले, की लंडनमधल्या उच्चभ्रू घरांतील महिलासुद्धा सामाजिक कार्यामध्ये आपलं योगदान देत आहेत. या गोष्टीचा त्यांच्या मनावर चांगलाच परिणाम झाला. याच दौऱ्यात नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि सरोजिनी नायडू यांच्याशीही त्यांची भेट झाली. या भेटीतील चर्चेतून राष्ट्रीय कार्याचे बीज त्यांच्या मनात पेरले गेले.
भारतात परत आल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय कार्यासाठी वाहून घेण्याचा निश्चय केला. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चंपारण्यात नीळ सत्याग्रह झाला. त्यानंतर गांधीजींनी तिथल्या काही खेड्यांमध्ये शाळा सुरू करण्याचे ठरवले, तेव्हा त्यांनी स्वयंसेवी शिक्षक म्हणून काम करण्यासाठी कार्यकर्त्यांना साद घातली.
विख्यात तत्त्वज्ञ श्रीनिवास शास्त्री यांच्या माध्यमातून ही गोष्ट अवंतिकाबाई यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्या लागलीच चंपारण्यात हजर झाल्या. शिक्षक म्हणून काम करताना तिथे पगार मिळणार नव्हता. अवंतिकाबाईंनी ही जबाबदारी विनातक्रार स्वीकारली. चंपारण्यातील दीर्घ वास्तव्यादरम्यान अवंतिकाबाई गोखले यांना महात्मा गांधींच्या जीवनाचे जवळून दर्शन झाले. त्यांच्या तेजःपुंज व्यक्तिमत्त्वाचा अवंतिकाबाईंवर फार प्रभाव होता. त्यांनी गांधीजींचे मराठीतील पहिले चरित्र लिहून काढले.
१९१८ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला दस्तूरखुद्द लोकमान्य टिळक यांची प्रस्तावना लाभली आहे. अत्यंत सरळसोप्या भाषेत लिहिलेल्या या चरित्रामुळे मराठी वाचकांना गांधीजींचा परिचय होण्यास खूपच मदत झाली. स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्व विकास आणि सबलीकरणासाठी त्यांनी गिरगाव येथे ‘हिंद महिला समाजाची’ स्थापना केली.
या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सूतकताई, शिवणकाम आणि खादी विक्री अशी कामे शिकवायला सुरुवात केली. तब्बल अडतीस वर्षे अवंतिकाबाई या संस्थेच्या अध्यक्षस्थानी होत्या. रोजगार निर्मिती आणि राष्ट्रीय आंदोलनासाठी मनुष्यबळ तयार करणे ह्या दोन्ही गोष्टी या संस्थेच्या माध्यमातून साध्य होत गेल्या.
१९२६ मध्ये त्या मुंबई महानगरपालिकेच्या सदस्य झाल्या. त्यावेळी त्यांनी महापालिका क्षेत्रातील कामांमध्ये सुधारण्यासाठी अनेक सूचना केल्या. पालिका कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठीही प्रयत्न केले. अवंतिकाबाई करारी आणि स्पष्टवक्त्या असल्यामुळे त्यांचा सर्वांना दरारा वाटे.
मुंबईतील गिरणी कामगार स्त्रियांच्या लहान मुलांची कामाच्या वेळेत फारच गैरसोय होत होती. या मुलांसाठी त्यांनी पाळणाघरे सुरू केली. बहुधा ही भारतातील पहिलीच पाळणाघरे असावीत. काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या असल्यामुळे त्यांना बऱ्याचदा तुरुंगवासही भोगावा लागला. त्या अत्यंत दृढनिश्चय सत्याग्रही होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील अनेक महिला गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाल्या.
मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीने राष्ट्रीय स्त्री सभेची स्थापना सरोजिनी नायडू यांच्या अध्यक्षतेखाली केली, त्या सभेच्या उपाध्यक्ष म्हणून अवंतिकाबाई गोखले यांची नेमणूक केली गेली. तत्कालीन अस्पृश्य समजल्या गेलेल्या समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी जीवनभर प्रयत्न केले.
अवंतिकाबाईंची महात्मा गांधीजींवर अनन्यसाधारण निष्ठा होती. चंपारण्यातील लढ्यापासून सोबत असलेल्या अवंतिकाबाई गोखले गांधीजींच्या पट्टशिष्या म्हणून ओळखल्या जात. ३० जानेवारी १९४९ रोजी नथुराम गोडसे याने महात्मा गांधींची हत्या केल्यानंतर त्या अत्यंत अस्वस्थ झाल्या. त्यापूर्वीच त्यांना कर्करोगाचेही निदान झाले होते. त्या दिवसेंदिवस मनाने उद्विग्न राहू लागल्या. या दुःखद मनोवस्थतच २६ मार्च १९४९ रोजी त्यांचा मुंबईत मृत्यू झाला. गांधी पर्वाच्या महत्त्वाच्या साक्षीदार असलेल्या अवंतिकाबाई गोखले या एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होत्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.