
Farmers Company Update : बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकरी सौ. अनिताताई माळगे यांनी आठ वर्षांपूर्वी ‘यशस्विनी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी’ ही राज्यातील महिलांची पहिली शेतकरी कंपनी काढली.
पाच लाख रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेल्या या कंपनीतील १४०० महिला सभासदांपैकी ७०० महिला लघुउद्योजिका झाल्या आहेत. स्थानिक बाजारपेठांसह परदेशातही उत्पादने निर्यात होत असून तब्बल सव्वाचार कोटी रुपयांची उलाढाल केली जाते.
सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरपासून १५ किलोमीटरवर असलेल्या बोरामणी गावातील अनिताताई माळगे या पदवीधर आहेत. पूर्वीपासूनच सामाजिक कार्याची आवड असल्याने अनिताताईंनी आठ वर्षांपूर्वी शेतीक्षेत्रातील महिलांना एकत्र केले.
एकेक करत दहा शेतकरी गटाची स्थापना केली. बोरामणी व परिसर भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या महिलांना भाजीपाला उत्पादन आणि विक्रीसह अन्य छोटे-छोटे उद्योग सुरू केले. पती योगेश माळगे यांनीही त्यांना पाठिंबा दिला.
भाजीपाला उत्पादनासाठी आवश्यक निविष्ठांची एकत्रित खरेदी सुरू केल्याने मोठी बचत झाली. एकीचे फायदे दिसल्यामुळे महिलांचा विश्वास वाढला. अडचणी आल्या तर आपण मार्ग काढू शकतो, हा विश्वास त्यांच्यामध्ये आला.
२०१५ मध्ये त्यांनी बोरामणी, तांदूळवाडी, वडजी, पिंजारवाडी, कर्देहळ्ळी, कासेगाव, कुंभारी इ. ३२ गावातील सुमारे १४०० महिलांना एकत्रित करत राज्यातील पहिली महिलांची शेतकरी कंपनी सुरू करण्याचे धाडस केले. तीच ही ‘यशस्विनी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी’.
शेतकरी कंपनीद्वारे धान्याची स्वच्छता, प्रतवारीचे काम सुरू केले. मात्र हा व्यवसायक हंगामी होता. उर्वरित काळात महिला सभासदांनी अन्य लघुउद्योग करावेत, यासाठी प्रोत्साहन दिले. राज्यातील वेगवेगळ्या भागातील प्रदर्शने, चर्चासत्रे, प्रयोगशील शेतकऱ्यांकडे अभ्यास सहली असे उपक्रम आयोजित केले.
त्यातून आपणही हे करू शकतो, हा आत्मविश्वास महिलांमध्ये आला. त्यातून आज ७०० महिला दुग्ध व्यवसाय, भाजीपाला, शेवया, पापड, मिरची, ज्वारीचे रवा, पोहे, ज्वारी, बाजरी, नाचणीची बिस्किटे इ. व्यवसायात कणखरपणे उभ्या आहेत.
अवघ्या पाच लाखांच्या भांडवलावर सुरू झालेली कंपनी आज तब्बल सव्वाचार कोटी रुपयांची उलाढाल करते, याचे सारे श्रेय अर्थातच अनिताताईंच्या धडपडीला, कष्टाला जाते.
सभासद महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे मार्केटिंग कंपनीद्वारे केले जाते. कंपनीने स्थानिक बाजारपेठेसह देशांतर्गत कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील बाजारपेठही मिळवली आहे.
इतक्यावरच न थांबता कंपनीची ज्वारी, बाजरी, नाचणी अशा भरडधान्यांची बिस्किटे आणि शेवयांना शेजारील देश भूतान, नेपाळ, म्यानमार आणि बांगलादेशातून मागणी आली आहे. या देशातही ही उत्पादने पोहोचली आहेत. यशस्विनी कंपनीच्या मार्फत आता नव्याने पाच शेतकरी कंपन्यांची स्थापनाही केली आहे.
अनिताताईंना मिळालेले सन्मान
- २०१६ः एक्सलन्स महिला गौरव पुरस्कार.
- २०१६ः वसंतराव नाईक हरितक्रांती जनक पुरस्कार.
- २०१७ः बसव सेंटर सोलापूरचा कायकयोगी सन्मान.
- २०१८ ः डीडी किसानचा महिला शेतकरी पुरस्कार
- २०१९ः वीरशैव सेवा संघ तर्फे वीरशैव रत्न पुरस्कार.
पंतप्रधानांची शाबासकी!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यात महाराष्ट्रातील पहिली महिला शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून सौ. अनिताताई माळगे यांना पंतप्रधानांशी बोलण्याची संधी मिळाली. त्या वेळी महिला शेतकरी कंपनीची यशोगाथा ऐकून पंतप्रधानांनी अनिताताई यांचे कौतुक केले.
संपर्क - सौ. अनिताताई माळगे, ९८८१९९८११२
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.