
Budget 2023 : अर्थसंकल्प मांडत असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरळ अनुदानाची घोषणा होईल अशी अपेक्षा कांदा उत्पादक (onion Producer) शेतकरी बाळगून होते. मात्र अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली नाही.
शेतकऱ्यांकडचा कांदा व्यापाऱ्यांकडे गेला की मग अशी घोषणा करायची आणि त्यातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसायची आणि व्यापाऱ्यांचे चांगभले करायचे असाच डाव, ही घोषणा टाळण्यामागे आहे, अशी टीका किसान सभेचे केंद्रीय सहसचिव अजित नवले (Dr. Ajit Nawale) यांनी अर्थसंकल्पावर केली आहे.
अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या सहा हजार रुपये अनुदानाच्या जोडीला राज्य सरकार अधिकचे सहा हजार रुपये प्रति वर्षी शेतकऱ्यांना देईल अशी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या निधीची कधीही मागणी केलेली नव्हती.
शेतकरी घामाचे दाम मागत आहेत. उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्याना शेतीमालाला रास्त दाम मिळाले तर त्यातून शेतकरी नक्कीच स्वयंपूर्ण होतील आणि शेती संकटावर मात केली जाईल, ही शेतकरी संघटनांची रास्त भूमिका आहे.
अर्थसंकल्पामध्ये मात्र शेतकऱ्यांला शेतीमालाला रास्त भाव देण्याबद्दल ब्र शब्द काढण्यात आलेला नाही. कांदा, कापूस, सोयाबीन, चिकन, अंडी, तूर, हरभरा पिकांचे भाव कोसळत असताना ते सावरण्यासाठी कोणतीही योजना आणलेली नाही.
शेतीमालाला रास्त दाम मिळावे यासाठी ठोस तरतूद केलेली नाही, अशी कडवट टीकाही किसान सभेच्या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आली आहे.
कामाचे दाम नाकारायचे, शेतकऱ्यांची लूट सुरू ठेवायची, उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढवत ठेवायचा आणि त्यातून निर्माण झालेला असंतोष कमी करण्यासाठी अशा प्रकारे सहा किंवा बारा हजार रुपयांचा तुकडा शेतकऱ्यांच्या समोर करायचा असा हा प्रकार आहे. शेतकरी समुदायात यामुळे संतापाचीच भावना आहे.
पीक विमा योजनेत शेतकरी केवळ एक रुपया भरून सहभागी होतील व त्यांच्या वाट्याला 2 टक्के असणारा विमा हप्ता सरकार भरेल अशी घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झालेला पैसाही शेवटी जनतेचा आणि शेतकऱ्यांचाच पैसा आहे.
हा पैसा पिक विमा कंपन्यांच्या तिजोरीमध्ये गेल्यानंतर त्याचा शेतकऱ्यांना काही लाभ होतो का? हा मूलभूत प्रश्न आहे. अनुभव पाहता कोट्यावधी रुपयाचा प्रीमियम सरकारच्या तिजोरीमधून कंपन्यांना दिला जातो. शेतकऱ्यांच्या विकासासाठीचा हा निधी कंपन्यांच्या घशात जातो.
मात्र कंपन्या त्या बदल्यात शेतकऱ्यांना आपत्तीच्या काळात पिक विमा नुकसान भरपाई देत नाहीत. वेगवेगळ्या नियमांचा अडसर दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले जातात, अशीही प्रतिक्रिया अर्थसंकल्पावर व्यक्त करण्यात आली.
शेतकऱ्यांनी आमच्या वाट्याचा 2% प्रीमियम राज्य सरकारने भरावा अशी मागणी कधीही केलेली नव्हती. शेतकऱ्यांच्या मूळ मागण्या पीक विमा योजने संदर्भात वेगळ्याच आहेत.
आपत्ती काळात शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी पीक विमा योजना युनिट गावनिहाय करा, नुकसान निश्चितीची पद्धत अधिक पारदर्शक बनवा राज्य सरकारची स्वतंत्र पिक विमा योजना आणा आणि सरकारी कंपनीच्या आखत्यारीत शेतकऱ्यांना आपत्ती काळात पीक विम्याचे संरक्षण द्या, या शेतकऱ्यांच्या मूलभूत मागण्या आहेत, असे मतही नवले यांनी व्यक्त केले.
शेतकरी जे मागत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि शेतकऱ्यांनी जे कधीच मागितलं नव्हते ते शेतकऱ्यांना देऊन आम्ही शेतकऱ्यांसाठी किती चांगले करतोय असे दाखवण्याचा प्रयत्न करायचा असा हा प्रकार आहे.
दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांना बगल देत सवंग लोकप्रियता आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या या घोषणा आहेत, अशी टीका नवले यांनी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.