
Land Issue : एका गावात एक माणिक नावाचा श्रीमंत शेतकरी राहत होता. सगळ्या गावात तो दानशूर म्हणून ओळखला जायचा. माणिकने १९३० मध्ये गावातील गुरे चारण्यासाठी स्वतःची ४० एकर जमीन गावाला दान म्हणून दिली.
माणिकने दानपत्रात असे नमूद केले होते, की गावातील पंच कमिटीने या जमिनीची देखभाल करावी. या जमिनीच्या ७/१२ वर ‘सार्वजनिक गुरचरण जमीन’ असा शेरा आला. त्यानंतर महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची स्थापना झाली. ही जमीन ग्रामपंचायतीकडे निहित करण्यात आली.
५०-६० वर्षे उलटल्यानंतर त्या पंचांनी जमिनीचे वाढलेले बाजारभाव विचारात घेऊन एका कंपनीला ही जमीन विकून टाकली व कंपनीकडून जमिनीचे मिळालेले पैसे पंच कमिटीने स्वतःच्या खिशात घातले.
गावात या प्रकरणाबाबत कुठलीही बोंबाबोंब होऊ नये म्हणून पंच कमिटीने फक्त दोन लाख रुपये गावाच्या नावाने बँकेत जमा केले. पंच कमिटीने, कंपनीने मोठे मन करून गावाची केवढी मोठी सेवा केली असे सांगून कंपनीच्या अधिकाऱ्यांचा गावामध्ये मोठा सत्कारसुद्धा केला.
काही काळानंतर गावातल्या एका हुशार माणसाने या जमिनीबाबत तक्रार केली. पंच कमिटीने दान केलेल्या जमिनीचा कसा गैरवापर केला, हे गावातील व तालुक्यातील लोकांच्या निदर्शनास आणून दिले. जमिनीच्या गैरवापराची तक्रार कलेक्टरकडे झाली.
संपूर्ण चौकशी केल्यानंतर असे उघडकीस आले, की पंच कमिटीने हा सगळा प्रकार स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला होता. शेवटी पंचांवर सार्वजनिक मिळकत विकल्याबद्दल फौजदारी खटला दाखल करण्यात आला व गावातील पंचकमिटीच्या सदस्यांना अटक करण्यात आली.
ही संपूर्ण जागा गावातील गुरे चारण्यासाठी वापरण्यात यावी, असे सरकारने आदेश काढले. त्यामुळे सर्व गावकऱ्यांना आनंद झाला.
सांगायचे तात्पर्य म्हणजे सार्वजनिक मिळकत स्वतःच्या स्वार्थासाठी वापरणारे अनेक लोक आहेत. त्यासाठी गावकऱ्यांनी नेहमी सतर्क राहायला पाहिजे !
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.