
Solapur News : राष्ट्रीय पंचायतराज पुरस्कारासाठी महाराष्ट्राने राज्यातील अकरा ग्रामपंचायतीची शिफारस केली आहे. त्यात सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यातील भोसे, अंकलगे, यशवंतनगर आणि अर्धनारी या चार ग्रामपंचायतींची शिफारस करण्यात आली आहे.
येत्या २४ एप्रिलला दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कारांची अंतिम निवड जाहीर होणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या संकल्पना घेऊन सर्वोत्कृष्ट काम केलेल्या देशभरातील नऊ ग्रामपंचायतींची निवड अंतिम पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय समितीने तपासणी करून केंद्रीय स्तरावर महाराष्ट्रातील ११ गावांची निवड केली. त्यात सोलापूर जिल्ह्यातून चार ग्रामपंचायतींची शिफारस करण्यात आली. त्यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील अंकलगे, माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर, मोहोळ तालुक्यातील अर्धनारी व पंढरपूर तालुक्यातील भोसे या चार गावांचा समावेश आहे.
आता या गावच्या सरपंच आणि ग्रामसेवकांना २४ एप्रिल रोजी होणाऱ्या पंचायतराज दिनी दिल्लीतील कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले आहे, निवड झालेल्या या ग्रामपंचायतीची या शिफारशी आधी प्रशिक्षण सत्र जिल्हा परिषदेमध्ये आयोजित करून पूर्वतयारी करून घेतली होती. त्यामुळे योग्य नियोजन आणि कालबद्ध कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची निवड अंतिम होऊ शकल्याचे ते म्हणाले.
...म्हणून या गावांची शिफारस
अंकलगे या गावाने सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव या संकल्पनेत उत्कृष्ट कामगिरी केली. यशवंतनरगर ग्रामपंचायतीने स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा या संकल्पनेत, अर्धनारी गावाने बालस्नेहीगाव या संकल्पनेत तर भोसे ग्रामपंचायतीने सुशासनयुक्त गाव या संकल्पनेत उत्कृष्ट कामगिरी केली.
त्यामुळे या गावांच्या निवडी झाल्या. पण आता यातून कोणत्या ग्रामपंचायतीला अंतिम पुरस्कार मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.