
kolhapur News : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी २ एकर बागायत किंवा ४ एकर जिराईत जमीन १०० टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येते.
खासकीय दरानुसार जमीन विक्री करण्यास तयार असणाऱ्यांनी समाज कल्याणच्या सहायक आयुक्तांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना लाभ देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयास जमीन खरेदी करावयाची आहे. जमीन कसण्यास अयोग्य, डोंगर उताराची, खडकाळ व नदी पात्राजवळच्या क्षारयुक्त व क्षारपड जमीन असू नये.
जमीन सलग असावी, जे जमीन मालक शासनाने निश्चित केलेल्या जमिनीच्या दरानुसार (रेडीरेकनरनुसार) किंवा जिरायत जमीन कमाल ५ लाख रुपये प्रति एकर व बागायत जमीन कमाल ८ लाख रुपये प्रति एकरप्रमाणे विक्री करण्यास तयार आहेत, अशा जमीन मालकांनी जमिनीचा सात-बारा व आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले.
ज्या गावात जमीन उपलब्ध होईल त्याच गावातील अनुसूचित जातीचे, दारिद्र्य रेषेखालील, भूमिहीन, त्याच गावचा रहिवासी असलेले व १८ ते ६० वयोगटातील पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
त्या गावात लाभार्थी उपलब्ध नसल्यास लगतच्या इतर गावांतील आणि तेथेही पात्र लाभार्थी नसल्यास तालुकास्तरावरील पात्र लाभार्थ्यांचा विचार करण्यात येईल. अंतिमत: परिस्थितीनुसार आवश्यक ते निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती घेईल, असेही लोंढे यांनी कळविले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.