
Nagar News : सोलापूरमध्ये एका शेतकऱ्याला ५१२ किलो कांदा (Onion) विकल्यावर १ रुपयाप्रमाणे दर (Onion Rate) मिळाला होता. त्यापैकी मोटारभाडे, हमाली, तोलाई याचे ५०९ रुपये वजा होऊन संबंधित शेतकऱ्याला केवळ २ रुपयांचा चेक मिळाला होता.
यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
नगर येथे शुक्रवारी (ता. २४) पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, की कांद्याच्या बाबतीत खरोखरच बिकट परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. कांदा, कापूस, संत्री असेल या सर्व पिकांसाठी सरकारचे धोरण परस्परविरोधी आहे.
एकीकडे कांद्याची निर्यात करण्याची मागणी केल्यानंतर सरकार कांद्याची निर्यात करीत नाही. तर दुसरीकडे कापूस आयात करणे बंद करा म्हटले तरीही सरकार कापूस आयात करते. सरकारचे हे धोरण परस्पर विरोधी आहे, असा आरोपही त्यांनी केला.
शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतरही जाग नाही
दरम्यान, या वेळी विरोधी पक्षनेते दानवे यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला. ते म्हणाले, ‘‘मागील वर्षी जुन्नर येथील एका शेतकऱ्याने कांद्याला भाव मिळत नाही म्हणून पंतप्रधानांच्या वाढदिवशी पत्र लिहून आत्महत्या केली. पण त्यानंतरही सरकार जागेवर आले नाही.
कापसाची स्थितीही त्यापेक्षा काही वेगळी नाही. तसेच बार्शी येथील शेतकऱ्याला कांदा विकल्यानंतर आडत खर्च जाऊन दोन रुपयांचा चेक मिळाला. शेतकऱ्याची ही बिकट स्थिती सरकार उघड्या डोळ्याने बघतय, पण भूमिका घेत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत केंद्र व राज्य सरकार नुसत्या खोटारड्या घोषणा करीत त्यांना रडवत आहे,’’ असा घणाघातही दानवे यांनी केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.