Buldana News : बुलडाणा जिल्ह्यात रविवारी (ता. १९) झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने कांदा, हरभरा आणि फळबागांना फटका बसला.
या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे करून अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी सोमवारी (ता. २०) मलकापूर तालुक्यातील घिर्णी, माकनेर, हरसुडा येथील वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली.
जिल्ह्यात सुमारे दोन हजार ७०० हेक्टरवरील कांदा, हरभरा, गहू तसेच केळी या शेतपिकाचे नुकसान झाले आहे.
यापैकी मलकापूर तालुक्यात एक हजार ४१६ हेक्टर पिकाचे नुकसान झाले. उपलब्ध असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून येत्या दोन दिवसांत नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे व इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी हरसुडा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
अवकाळी पावसाबाबत आधीच इशारा देण्यात आला होता. अशा इशाऱ्यांची दखल शेतकऱ्यांनी गांभीर्यपूर्वक घ्यावी आणि वेळेत पीक कापणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
नांदुरा तालुक्यात ८१ हेक्टर आणि मोताळा तालुक्यात १० हेक्टरवर नुकसान झाले आहे. याचेही तातडीने पंचनामे करावेत. तत्काळ पंचनामे केल्याने नुकसानीचा खरा अहवाल समोर येत असल्याने तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.